मराठ्यांच्या पराक्रमी इतिहासाच्या प्रत्येक पानाचा साक्षीदार असणारा विशाळगड हा किल्ला कोल्हापूरच्या वायव्येस अवघ्या 76 किमी अंतरावर आहे. नावाप्रमाणेच विशाल असे याचे स्वरूप, बघताच क्षणी कोणालाही मोहिनी घालणारे. हा प्राचीन किल्ला अनुस्कुरा घाट व आंबा घाट, कोकणातील बंदरे व कोल्हापूरची बाजारपेठ यांना जोडणार्या घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी व संरक्षणासाठी बांधला गेला असावा. विशाळगड म्हटले की, आपल्याला सर्वांना आठवतो तो सिद्धीचा वेढा, छत्रपती शिवाजी महाराजांनी चातुर्याने सिद्धीला दिलेली मात, बाजीप्रभू देशपांडे यांच्यासहित अनेक शूरवीर मावळ्यांचा पार्थपराक्रम... असा इतिहासच डोळ्यासमोरून झरझर निघून जातो.
पण, प्रत्यक्षात विशाळगडाचा इतिहास हा जवळपास अकराव्या शतकात सुरु होतो. हा किल्ला शिलाहार वंशातील राजाने बांधला. त्यावेळी या गडाचे ‘खिलगील’ किंवा ‘खेळणा’ असे नाव होते. त्यानंतर 1209 मध्ये देवगिरीच्या यादवांनी हा किल्ला शिलाहारांकडून जिंकून घेतला. पुढे अल्लाउद्दीन खिल्जी याने देवगिरीचा राजा रामचंद्र याचा पराभव करून विशाळगड जिंकला. त्यानंतर पुढे गंगू बहमानी हा स्वतंत्र झाला. इसवी सन 1347 मध्ये हा किल्ला बहमानी सुलतानी राज्याचा भाग झाला. त्यानंतर दीर्घकाळ हा किल्ला विजयनगरच्या बलशाली राज्याचा भाग होता. मात्र, विजयनगरच्या बलशाली राज्याचा पाडाव झाल्यावर मात्र स्थानिक मराठा राजा शंकराव मोरे याने हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. त्यानंतर बहमानी सुलतानांकडून हा किल्ला जिंकण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरु झाले. त्यांनी मलिक उत्तुजार या बहमानी सरदाराला खेळण्यावर स्वारी करण्यास सांगितले. या स्वारीवर असताना उत्तुजारने पन्हाळ्यावरच्या शिर्क्यांना जेरीस आणले. शिर्के यांनी उत्तुजार याला खेळणा किल्ल्याचे दिवास्वप्न दाखवले आणि त्याला भुललेला उत्तुजार याने खेळण्यावर स्वारी करण्याचे ठरवले.
शिर्क्यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तुजारची सात हजारांची फौज खेळण्याच्या अवतीभोवती असलेल्या निबिड अरण्यात दाखल झाली. पण, यावेळी शिर्क्यांनी सुरुवातीला अतिशय सरळ असणार्या मार्गाने या सैन्याला दिशा दाखवली, नंतर मात्र अतिशय बिकट रस्त्यावरून या सैन्याला जावे लागले. त्यामुळे बहमानी सैन्य प्रत्यक्ष युद्धाच्या आधीच गलितगात्र झालेले होते. यातच उत्तुजार आजारी पडला. अशाच वेळी खेळण्याच्या मोर्यांशी संधान बांधून, शिर्क्यांनी मोरेंच्या साथीने उत्तुजारच्या सैन्यावर आक्रमण करून त्यांचा पराभव केला. या झालेल्या आक्रमणात मलिक उत्तुजारही मारला गेला. पुढे हा किल्ला ताब्यात घेण्यासाठी सुलतानाने मलिक रेहान याला स्वारी करण्यास सांगितले. त्याने सहावेळा प्रयत्न करूनही त्याला हा किल्ला जिंकता आला नाही. अखेर सातव्या प्रयत्नात नऊ महिन्यांच्या निकराच्या प्रयत्नाने त्याला हा किल्ला ताब्यात घेतला. या मलिक रेहानच्या नावाचा दर्गा या किल्ल्यावर आहे. त्यातील फारशी शिलालेखात वरील उल्लेख आढळतो. यानंतर जवळजवळ पावणेदोनशे वर्ष हा किल्ला बहामनी आदिलशाही या मुस्लीम सत्तांकडे होता.
पुढे 1659च्या आसपास छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळा जिंकला, तेव्हाच हा खेळणासुद्धा जिंकला. त्यावेळी या किल्ल्याचे नाव बदलून ‘विशाळगड’ ठेवण्यात आले. 1660च्या आसपास सिद्दी जौहारने पन्हाळ्याला वेढा घातला. त्याचवेळी जसवंतराव दळवी व शृंगारपूरचे सूर्यराव सूर्वे विशाळगडाला वेढा घालून बसले होते. पन्हाळ्याच्या वेढ्यातून बाहेर पडून विशाळगडाकडे जाताना महाराजांनी हा वेढा फोडून काढला व छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडावर सुखरुप पोहोचले. याच लढाईत बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्या निवडक़ तीनशे मावळ्यांनी पार्थ पराक्रमाने घोडखिंड अडवून धरली होती. शिवरायांनी विशाळगडाच्या डागडुजीकरिता पाच हजार होन खर्च केल्याचा उल्लेख ऐतिहासिक दस्ताऐवजात आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी देखील विशाळगडावर अनेक नवीन बांधकामे केली. शिर्क्यांचे बंड मोडून काढण्यासाठी संभाजी महाराजांनी कविकलशांना पाठवले होते. मात्र, त्यात कविकलशांना यश आले नाही. पुढे याच विशाळगडाकडून रायगडी जाताना, संभाजी महाराजांना घातपाताने कैद करण्यात आले व नंतर त्यांच्या अमानुषपणे हत्याही औरंगजेबाने केली.
संभाजी महाराजांच्या पश्चात राजाराम महाराजांच्या काळात विशाळगड मराठ्यांच्या हालचालींचे प्रमुख केंद्र होता. रामचंद्रपंत अमात्यांनी विशाळगडालाच आपले मुख्य ठिकाण केल्यामुळे, विशाळगडाला राजधानीचा दर्जा प्राप्त झाला. पुढे राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या तृतीय पत्नी अंबिकाबाई विशाळगडावरच सती गेल्या. पुढे 1701 मध्ये विशाळगड घेण्याच्या इर्शेने औरंगजेब विशाळगडावर कूच करून गेला. मात्र, विशाळगडाचे किल्लेदार परशुराम प्रतिनिधी यांनी सहा महिने हा किल्ला जिंकण्यासाठी औरंगजेबाला झुंजायला लावले. सैन्यास अभयदान आणि स्वराज्यकार्यासाठी दोन लाख रुपये घेऊन किल्ल्याचा ताबा औरंगजेबाला दिला. औरंगजेबाने त्याचे नाव बदलून ‘सरवरलना’ असे ठेवले. विशाळगड जिंकून पन्हाळ्याला परत जाताना औरंगजेबाच्या सैन्याला सह्याद्रीने झुंजवले. विशाळगड ते पन्हाळा हे अंतर पार करायला त्यांना तब्बल 37 दिवस लागले. पुढे ताराराणी यांनी मुघलांकडून विशाळगड पुन्हा जिंकून घेतला. नंतर विशाळगड कोल्हापूरच्या मराठ्यांच्या गादीकडे गेला. त्यांनी तो पंतप्रतिनिधींना दिला. 1844 साली इंग्रजांनी विशााळगडावर त्यांचा ‘युनियन जॅक’ फडकावला आणि गडावरील सगळी बांधकामे पाडून टाकली.
सध्या गडावर भगवंतेश्वर मंदिर पाहायला मिळते, तसेच या किल्ल्यावर आपल्याला प्रधानांच्या वाड्यांचे जोतं (चौथरे) पाहायला मिळतात. तसेच या किल्ल्यावर एक भुयारी मार्ग असून, एक गोलाकार विहीरदेखील आहे. या किल्ल्यावर टकमक टोकदेखील आहे. सिद्धीशी लढताना आपल्या रक्ताने घोडखिंड पावन करणार्या बाजीप्रभूंची समाधी देखील याच किल्ल्यावर पाहायला मिळते. (संकलन : कौस्तुभ वीरकर)