मुंबई : 'दापूर ते दिल्ली' या शीर्षकाच्या तीन शब्दांत साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कारप्राप्त लेखक एकनाथ आव्हाड यांचा साहित्यिक प्रवास डोळ्यांसमोर येतो. त्यांचे साहित्य खऱ्या अर्थाने राष्ट्रीय पातळीवरचे आहे", असे गौरवद्गार प्रा. डॉ. नरेंद्र पाठक यांनी काढले. "दापूर ते दिल्ली" या जेके मीडिया प्रकाशित लेखिका ज्योती कपिले संपादित पुस्तकाचे नुकतेच एनसीपीए च्या गोदरेज डान्स थिएटरमध्ये प्रकाशन झाले. सदर सोहळा एनसीपीए तर्फे आयोजित केला होता.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना सुप्रसिद्ध अभिनेत्री चिन्मयी सुमित म्हणाल्या, 'एका बालसाहित्यिकाने दुसऱ्या बालसाहित्यिकावर संपादीत केलेल्या पुस्तकामुळे आव्हाड यांच्या साहित्याचा एकत्रित परिणाम खूप छान जाणवतो. ते एक मुक्तहस्त लेखक असून त्यांनी साहित्यातील विविध प्रकारांवर लेखन केलेले आहे. तसेच मंगेश पाडगावकर, विश्वास वसेकर, रेणू दांडेकर, अनुराधा नेरूरकर यांसारख्या मान्यवर लेखकांनी त्यांच्या साहित्याची केलेली समीक्षा या पुस्तकात वाचताना आपण नक्कीच थक्क होतो. आव्हाड यांचे लिखाण हे सर्व वयोगटातील लोकांना आवडणारे, भावणारे आहे, हे लक्षात येते."
या प्रसंगी दापूर ते दिल्ली या पुस्तकाच्या संपादक ज्योती कपिले आपल्या मनोगतात म्हणाल्या, "आजच्या पिढीपर्यंत बालसाहित्यकार आव्हाड यांचे सर्वच सकस साहित्य पोहचावे, सरांच्या लेखनाचा आवाका लक्षात यावा या उद्देशाने दापूर ते दिल्ली या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली."
यावेळी एनसीपीए चे सिद्धार्थ देशपांडे यांनी एकनाथ आव्हाड यांची घेतलेली मुलाखत अतिशय रंगतदार झाली. आव्हाड यांचा साहित्यिक प्रवास या मुलाखतीतून अधिकाधिक उलगडत गेला. कार्यक्रमाच्या समारोपात आव्हाड यांच्या कविता डॉ.सुमन नवलकर, सदानंद पुंडपाळ, विद्या प्रभू, राजेंद्र वाणी यांनी सादर केल्या तर संगीतकार हेमंत साने यांनी आव्हाड यांच्या दोन कवितांचे सुमधूर गायन केले.
सदर शानदार सोहळ्यास प्रसिद्ध उद्योगपती डॉ.सुधीर निरगुडकर, अनेक साहित्यिक, शिक्षक, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एनसीपीएच्या ग्रंथपाल सुजाता जाधव यांनी कार्यक्रमाचे नियोजन आणि सूत्रसंचालन केले.