समीक्षकांचे समीक्षक : डॉ. सुधीर रसाळ‘

    21-Dec-2024
Total Views | 26
 
डॉ. सुधीर रसाळ
 
देर आये दुरुस्त आये’ असे यंदाच्या ‘साहित्य अकादमी पुरस्कारां’बाबत म्हणावे लागतेय. डॉ. सुधीर रसाळ यांना ‘विंदांचे गद्यरूप’ या समीक्षा ग्रंथासाठी पुरस्कार मिळाला, याचा सर्वसामान्य वाचकालाही आनंद झाला, ही लक्षणीय गोष्ट आहे. यापूर्वी समीक्षक रा. ग. जाधव यांची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली, तेव्हा असाच सर्व थरांतून लोकांनी आनंद व्यक्त केला होता. कोणत्याही कंपूत, गटात, वादात सामील नसलेल्या, स्व-धर्म निष्ठेने आणि कसोशीने पाळणार्‍या अशा अगदी मोजक्या माणसांचे कर्तृत्व फारसे माहिती नसले, उत्सवी स्वरूपाचा त्यांचा वावर नसला तरी त्यांच्याविषयीचा आदर समाजात असतोच. त्याचीच प्रचिती या निमित्ताने पुन्हा आली.
 
सम्यक समीक्षादृष्टीचे, साक्षेपी विवेचन करणारे आणि सुलभतेने आकलन मांडणारे समीक्षक म्हणून डॉ. सुधीर नरहर रसाळ यांची साहित्य क्षेत्राला ओळख आहे. 1954 साली सर ‘बी.ए.’ झाले. हैदराबादच्या ‘उस्मानिया विद्यापीठा’तून 1957 साली प्रथम श्रेणीत प्रथम क्रमांकाने ते ‘एम.ए.’ उत्तीर्ण झाले. औरंगाबादच्या शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयात अधिव्याख्याता म्हणून तीन वर्षे अध्यापन केल्यावर 1959 साली ‘मराठवाडा विद्यापीठा’त मराठी विभाग सुरु झाला, तेव्हा ते तिथे अधिव्याख्याता म्हणून रुजू झाले. प्रसिद्ध समीक्षक वा. ल. कुलकर्णी आणि संत साहित्याचे अभ्यासक यू. म. पठाण हे त्यांचे सहकारी होते. निवृत्त होईपर्यंत याच विभागात ते प्रपाठक-प्राध्यापक या पदांवर 34 वर्षे कार्यरत होते. ‘मराठवाडा साहित्य परिषदे’च्या ‘प्रतिष्ठान’ या मासिकाचे ते 20 वर्षे संपादक म्हणून कार्यरत होते. त्यांचे बरेचसे समीक्षा-लेख त्यातून प्रसिद्ध झाले आहेत.
 
वा. ल. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ‘काव्यातील प्रतिमा सृष्टी : मराठी काव्याच्या संदर्भात’ या विषयावर ‘पीएच.डी’चा प्रबंध सिद्ध केला. पुढे त्याचा ‘कविता आणि प्रतिमा’ हा ग्रंथ 1982 साली प्रसिद्ध झाला. सरांचा अतिशय गाजलेला हा मीमांसाग्रंथ.
‘प्रतिमा’ ही संकल्पना, तिचे काव्यातील महत्त्व आणि कार्य यांची सांगोपांग मांडणी करणारा दुसरा ग्रंथ आजही मराठीत नाही. या ग्रंथात त्यांनी पहिल्या भागात कवितेचे स्वरूप, दुसर्‍या भागात कवितेची भाषा आणि निर्मितीप्रक्रिया, तिसर्‍या भागात प्रतिमेचे स्वरूप आणि चौथ्या भागात मराठीतील विविध साहित्यप्रकार आणि त्यांतील प्रतिमा, अशी अगदी विस्तृत आणि सोदाहरण मांडणी केली आहे. कवितेतील प्रतिमांच्या बरोबर त्यांनी कथात्म साहित्य आणि नाटक या साहित्य प्रकारांतील प्रतिमा उलगडून दाखवल्या आहेत. व्यामिश्र संज्ञा-संकल्पना सुबोध भाषेत स्पष्ट करणे हे सरांच्या शैलीचे वैशिष्ट्य. मर्ढेकरांची कविता, ना. घ. देशपांडे, पु. शि. रेगे यांच्या कवितांवर त्यांनी स्वतंत्र लेखन केले आहे. ‘कविता निरुपणे’, ‘काव्य लोचना’ ही त्यांची पुस्तके त्याची साक्ष देतात.
 
‘साहित्य : अध्यापन आणि प्रकार’ या ग्रंथाचे सहसंपादन सरांनी केले असून यातील ‘ललित साहित्याचे अध्यापन’ आणि ‘वा. ल. कुलकर्णी समीक्षक आणि अध्यापक’ हे दोन महत्त्वपूर्ण लेख सरांनी लिहिले आहेत. ‘मराठी साहित्य प्रेरणा आणि स्वरूप’ या ग्रंथातील त्यांचा ‘मराठी समीक्षा’ हा लेखही त्यांच्या व्यासंगाची, चिंतनाची साक्ष देतो.
 
सरांचे आजवर 17 समीक्षाग्रंथ प्रकाशित झाले आहेत. महत्त्वाची संपादने आणि 100 पेक्षा जास्त संशोधनपर निबंध त्यांनी लिहिले आहेत. ‘मराठवाडा साहित्य परिषद’, ‘मराठी साहित्य महामंडळ’, ‘विश्वकोश निर्मिती मंडळ’, ‘साहित्य अकादमी’ या मान्यवर संस्थांमध्ये विविध जबाबदारीची पदे त्यांनी भूषवली आहेत. राज्य पुरस्कारांसह अनेक संस्थांचे 24 पुरस्कार त्यांना लाभले आहेत. गेल्याच वर्षी ‘डॉ. निर्मलकुमार फडकुले जीवनगौरव पुरस्कारा’ने त्यांना सन्मानित करण्यात आले.
 
‘विंदांचे गद्यरूप’ या रसाळसरांच्या पुस्तकाला हा पुरस्कार मिळाला. हे पुस्तक म्हणजे विंदांच्या समग्र अभ्यासाच्या प्रकल्पातले पहिले पुस्तक आहे. या पुस्तकात त्यांनी विंदा करंदीकर यांची समीक्षा आणि त्यांचे लघुनिबंध यांचा उहापोह केला आहे. म्हणजेच ही समीक्षेची समीक्षा ‘मेटॅसमीक्षा’ आहे. पुस्तकाच्या मनोगतामध्ये सर म्हणतात, “मराठीमध्ये वाङ्मयाच्या सैद्धांतिक समीक्षेचा अभाव आहे. वाङ्मयविषयक सर्व जटील प्रश्नांची उत्तरे देणार्‍या आणि वाङ्मयकृतीच्या अस्तित्त्वाचा आणि तिच्या सर्व घटकांच्या परस्परसंबंधांचा उचित अर्थ सांगून तिच्या मूल्यमापनासंबंधीचे योग्य निकष देणार्‍या भूमिकेचा नव्याने शोध घ्यावा, ही प्रेरणा मराठी समीक्षेत दिसून येत नाही.” सरांच्या अभ्यासाची प्रेरणा यावरून सहज लक्षात येते. पण, त्याचबरोबर असे का झाले असावे, असाही प्रश्न उभा राहतोच. वि. का. राजवाडे यांचा 1902 सालामधला ‘कादंबरी’ हा निबंध किंवा ‘महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण’ हा 1928 सालामधला केतकरांचा ग्रंथ यांचा प्रभाव त्या काळातील साहित्यावर, साहित्यविचारावर आणि समीक्षेवर पडला नाही. इतका मूलगामी परामर्श आपल्याला झेपत नाही की काय, असंही मनात येते.
 
समीक्षक या व्यक्तीचा दबदबा का क्षीण झाला असावा, समीक्षा इतकी उपेक्षित का राहिली असावी, याचा विचार करताना गणित या विषयासारखा तिचा विनाकारण बागुलबुवा निर्माण झाला की काय, अशीही शंका येते. रसिकतेने करण्याचा तो बौद्धिक व्यापार आहे, याची जाणीव भल्याभल्या लेखकांनाही दिसत नाही. ‘आम्ही समीक्षा वगैरे काही मानत नाही, वाचकांची खुशीपत्रे आम्हाला अधिक मोलाची आहेत,’ असे ते जाहीरपणे म्हणत असतात. (दुसरीकडे मनातून मात्र आमच्या लेखनाची समीक्षक दाखल घेत नाहीत, ही तक्रार असते, ते सोडा.)
 
मुळात समीक्षा हे अत्यंत जबाबदारीने करायचे काम. ‘समीक्षेची समीक्षा’ तर दुप्पट जबाबदारीचे काम. अधिक आव्हानात्मक. वर्तमानपत्रात पुस्तकांचे परिचय (परीक्षण देखील नाही!) लिहिणार्‍यांना समीक्षक समजणार्‍या वातावरणात रसाळसरांसारखे समीक्षक आपले काम शांतपणे करत असतात आणि तोच मोठा आधार आहे, दिलासा आहे. आशा आहे.
 
म्हणणे असे असते की, समीक्षा वाचून कोणी लिहीत नाही, की समीक्षा वाचली म्हणून लेखनाची गुणवत्ता वाढत नाही. पण, हे लक्षात घ्यायला हवे की, समीक्षा त्यासाठी नाहीच, ती तर साहित्याची अनुगामिनी आहे. म्हणजे साहित्य आधी आणि नंतर तिची समीक्षा. पण, समीक्षा तुम्हाला साहित्यकृतीच्या मूल्यमापनाचे निकष देत असते. म्हणजे ती श्रेष्ठ की कनिष्ठ, याचे निकष देते. मुळात एखादी लेखनकृती साहित्यकृती आहे की नाही, हे ती सांगत असते. साहित्य आणि जीवनाचा संबंध लावत असते. आपल्याकडे अशा निकषांची चर्चा क्वचितच होते, मग त्यांचे उपयोजन जवळ जवळ नाहीच आढळले तर नवल काय?
 
अनेक वर्षं मराठी समीक्षा पाश्चात्य मीमांसेकडे नजर लावून बसली होती. तरी ती ‘पुरेशी परपुष्ट’ नाही, असाही निष्कर्ष निघाला होताच! त्या पार्श्वभूमीवर समीक्षेचा संकल्पनाव्यूह मराठीमध्ये रचणे, इतरांनी रचलेल्या व्यूहांची चिकित्सा करणे, ही महत्त्वाची गोष्ट आहे. आजपर्यंत झालेली महत्त्वाची समीक्षा ही कशा प्रकारची समीक्षा आहे, हे सरांनी आपल्या अभ्यासातून दाखवून दिले आहे. त्यांच्या विवेचनातील सूक्ष्मता आणि आकलन-अवलोकन यांचा आवाका विलक्षण आहे. रा. भा. पाटणकर यांच्या ‘आस्वादक समीक्षा ही समीक्षाच नव्हे’, या विधानावरून वाद उद्भवला असता गंगाधर गाडगीळांच्या आस्वादक समीक्षेमागील भूमिकेचे अतिशय यथार्थ विवेचन रसाळांनी ‘गंगाधर गाडगीळ : निवडक समीक्षा’ या ग्रंथात केले आहे. त्यांची समीक्षा आक्रमक नाही, पण स्पष्ट आणि परखड आहे. उदा. ‘मर्ढेकरांचा प्रभाव असण्यापेक्षा त्यांचे दडपण अधिक होते,’ हे त्यांचे विधान पाहा.
 
बा. सी. मर्ढेकरांनी जो ‘लय सिद्धांत’ मांडला, तो सर्वच ललित कलांच्या आंतररचनेसंबंधी आहे. विंदांनी त्यातून वाङ्मयकला बाजूला काढून तिचे वेगळेपण अधोरेखित करणारा ‘जीवनवेधी कले’चा सिद्धांत मांडला. परंतु, त्याची दखल मराठीत घेतली गेली नाही. ’विंदांचे गद्यरूप’ या पुस्तकात रसाळसरांनी विंदांच्या सैद्धांतिक भूमिकेची आणि त्यांनी उभारलेल्या समग्र काव्यशास्त्राची मीमांसा केली आहे. विंदांच्या लघुनिबंधांचा परामर्शही घेतला आहे. पौर्वात्य आणि पाश्चात्य साहित्यशास्त्र यांचा सुमेळ घालत, रस, अलंकार, व्यंग्यार्थ या प्राचीन काव्यशास्त्रातील संज्ञा रसाळसर आवर्जून वापरतात.
 
साहित्यकृतीच्या रुपाची, आशयाची, तिच्यातून सूचित होणार्‍या जीवनार्थाची मर्मदृष्टी सर्जनशील समीक्षेत असते, असावी लागते. ‘सैद्धांतिक समीक्षा’ आणि ‘उपयोजित समीक्षा’ हे दोन्ही प्रकार साहित्याच्या अभिरुचीचे संवर्धन करत असतात. साहित्यकृतींची प्रत्यक्ष समीक्षा होणे म्हणजे ‘उपयोजित समीक्षा’ आणि समीक्षा हे शास्त्र म्हणून त्याचा संकल्पना व्यूह रचणे ही ‘सैद्धांतिक समीक्षा.’ रसाळ सरांनी दोन्ही प्रकारची समीक्षा करुन समीक्षेला उंची दिली. प्रस्थापित समीक्षेचा सुनियोजित अभ्यास होणे, त्यावर चर्चा होणे ही निकोप साहित्य व्यवहारासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट असते. रसाळ सरांसारख्या व्रतस्थ वृत्तीने कार्यरत असणार्‍या ज्येष्ठ समीक्षकांमुळे साहित्य व्यवहाराचा तोल सांभाळला जातो.
 
त्यांच्या पिढीच्या कोणालाही स्वतःचे घोडे दामटण्याची सवय आणि गरज नव्हती. म्हणूनच अकादमी पारितोषिक मिळायला त्यांच्या वयाची नव्वदी आली. सुरुवातीच्या काळात सरांनी कथालेखन केले असले तरी आज समीक्षक, समीक्षकांचेही समीक्षक म्हणून सरांचा लौकिक आहे. अकादमी पुरस्काराने त्यावर राजमान्यतेची मोहोर उमटली आहे.
 
सर्जनशील साहित्यिक समीक्षेची उपेक्षा करतात, सर्वसामान्य वाचक समीक्षेपासून चार हात दूर राहतात आणि प्रकाशक आस्था दाखवत नाहीत, ही आजची समीक्षाक्षेत्राची स्थिती आहे. काही अपवाद अर्थात आहेत. या सन्मानाच्या निमित्ताने आपली साहित्यविषयक भूमिका तपासून पाहावी, सखोल व्यासंगाशिवाय समीक्षेला हात घालू नये, उठसूठ होणार्‍या शेरेबाजीला समीक्षा म्हणू नये, इतके भान निर्माण झाले, तरी बरेच काही हाती आले म्हणायचे!
 
सध्याच्या एकूण साहित्य व्यवहारात आपल्या वेगळेपणाने, निर्लेप वृत्तीमुळे सतेज राहिलेल्या रसाळ सरांना मिळालेला हा सन्मान मराठी वाचकांना आनंदाचा वाटतोय, त्याचे मनःपूर्वक स्वागत होते, ही बदलाची सुचिन्ह मानावीत का? निकोप समीक्षेचे पर्यावरण पुन्हा निर्माण होण्यासाठी या सन्मानाचे निमित्त व्हावे.

डॉ. वंदना बोकील कुलकर्णी 
अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121