महाराष्ट्र ही खरोखरच महान भूमी आहे. इथे अनेक नररत्ने जन्मली आणि त्यांनी संपूर्ण भारतवर्षावर आपला ठसा उमटवला. त्या महाराष्ट्राचा आणि मराठी भाषेचा सर्वांना असणारा अभिमान सार्थच आहे. मात्र, त्यातच गेल्या काही वर्षांपासून मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवणे या एकमेव ध्येयाने पछाडलेले लोक महाराष्ट्रात दिसू लागले आहेत. त्यांनी यासाठी एक मोहीमच सुरू केली आहे. त्यामुळे अनेक मराठी भाषकांना आपल्या भाषेला अभिजात दर्जा मिळाला की आपण कृतकृत्य होऊन जाऊ, असा सुखवाद साद घालतो आहे. आता या सगळ्या कुंद वातावरणात आपण हा प्रश्न नेमका काय आहे, हे समजून घेण्याचा प्रयत्न करू या.
सर्वप्रथम आपण ‘अभिजात भाषा’ हा वैशिष्ट्यपूर्ण भाषेला भारत सरकारद्वारे दिला जाणारा एक दर्जा आहे, हे लक्षात घेऊ. यासाठी केंद्र सरकारने काही निकष ठरवलेले आहेत. त्यानुसार-
१) भाषा प्राचीन असावी आणि त्यात श्रेष्ठ दर्जाचे साहित्य निर्माण झालेले असावे.
२) त्या भाषेचे वय दीड ते अडीच हजार वर्षांचे असावे.
३) त्या भाषेला भाषिक आणि वाड्मयीन परंपरेचे स्वयंभूपण असावे.
४) प्राचीन भाषा आणि तिचे आधुनिक रूप यांचा गाभा कायम असावा.
हे चार निकष जी भाषा पूर्ण करेल, त्या भाषेला हा अभिजाततेचा दर्जा मिळेल, असे घोषित करण्यात आले. त्यानुसार आतापर्यंत प्रारंभी म्हणजे २००४ मध्ये तामिळ आणि संस्कृत भाषेला असा दर्जा मिळाला. त्यानंतर तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि उडिया याही भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे.
मुळात एखाद्या भाषेला हा अभिजात दर्जा वगैरे देणे, त्यासाठी निकष ठरवणे हेच कमालीचे अनैसर्गिक आहे. त्यातून वर दिलेले निकष मुळातच भाषिक अभ्यासाच्या विसंगत आहेत, वादग्रस्त आहेत. भाषाविज्ञान हे आधुनिक शास्त्र अशा प्रकारच्या कोणत्याही श्रेणीबद्धतेला थाराच देत नाही, हे आपण लक्षात घ्यायला हवे. कोणत्याही भाषेचे मूळ प्रयोजन हे संवाद साधणे आणि आपले मत व्यक्त करणे, हेच असते. भाषेच्या या प्राथमिक गरजपूर्तीनंतर तो विशिष्ट समाज स्थिरावल्यावर मग त्यात साहित्याची निर्मिती होते. ज्ञानाचा प्रसार होतो. ही स्वाभाविक प्रक्रिया आहे. परत भाषिक परिसर विकसण्याची किंवा संकोचण्याची कारणे विविध सामाजिक, राजकीय आणि भौगोलिक घटनांमध्ये सामावलेली असतात. उदाहरणार्थ, एखाद्या ठिकाणी मोठा दुष्काळ पडल्यावर, सामाजिक अशांतता निर्माण झाल्यावर मोठा समूह स्थलांतर करतो आणि दुसऱ्या अपरिचित ठिकाणी जाऊन स्थायिक होतो. ११-१२व्या शतकातील मोठ्या दुष्काळानंतर बंगालमधून हजारो कुटुंबे महाराष्ट्रात विशेषत: कोकण आणि गोव्यात स्थायिक झाली. हजारो वर्षांपूर्वी राजकीय कारणांमुळे ज्यू समाज महाराष्ट्रात - कोकणात आणि पारशी समाज गुजराथमध्ये स्थायिक झाला किंवा १९९० नंतर काश्मीरमधील हिंदू जम्मू अथवा दिल्लीत स्थायिक झाले. मराठ्यांच्या लढवय्या स्वभावामुळे अखंड भारतभर अगदी कराचीपासून कन्याकुमारीपर्यंत मराठी भाषक समाज त्या त्या ठिकाणी स्थायिक झालेला आहे. अशा विविध कारणांमुळे भाषिक समाजाचे एकजिनसीपण नष्ट होते. त्याचा अन्य भाषकांशी सहवास-संवाद वाढतो आणि त्यातून एका वेगळ्याच भाषिक संस्कृतीचा जन्म होतो. दक्षिणेकडील मराठी हस्तलिखिते - तंजावर, मद्रास इ.ठिकाणी आढळतात. त्याचा अभ्यास केल्यावरही आपल्याला भाषिक पार्श्वभूमी कळायला लागते.
भाषेचा नेमका जन्म कधी झाला, या प्रश्नाचे उत्तर देणे तर ब्रह्मदेवाला पण शक्य नाही. कारण, भाषा ही काही माणसासारखी जैविक एकक नाही. त्यामुळे एका विशिष्ट भाषेपासून एखादी भाषा अमुक वर्षी अस्तित्वात आली, हे कोणीही सांगू शकत नाही. त्यासाठी विविध उपपत्ती मांडाव्या लागतात आणि सगळ्याच मर्यादित अर्थाने खऱ्या अथवा खोट्या ठरतात. जगातल्या कोणत्याही नैसर्गिक भाषेचे उगमस्थान, वय इ. तपशील कोणीही छातीठोकपणे सांगू शकणार नाही. त्यामुळे भाषेचे विशिष्ट वय असावे, हा निकष अगदीच सामान्य स्वरूपाचा आहे. भाषेला भाषिक आणि वाड्मयीन परंपरेचे स्वयंभूपण असावे, या तिसऱ्या निकषाचा विचार करता, भाषा ही सामाजिक वस्तू असल्याने हे स्वयंभूपण कधीही सिद्ध करता येणार नाही. कोणत्या ना कोणत्या स्वरूपात शेजारपाजारच्या भाषिक समाजाचा-संस्कृतीचा नकळत ठसा आपल्या भाषेवर उमटलेला असतोच. भोज राजाच्या दरबारात एकपाठीपासून संतापाठीपर्यंत विद्वानांची फौज उभी असल्याने तो ज्याप्रमाणे प्रत्येक काव्याला जुनेच काव्य असे सांगू शकत होता, त्याप्रमाणेच भारतातीलच नव्हे, तर जगातील प्रत्येक भाषा एकमेकांच्या प्रभावात असतेच. त्यातच महाराष्ट्राच्या भारतातील मध्यवर्ती भौगोलिक स्थानामुळे मराठी भाषेवर कन्नड, तामिळ, तेलुगू, हिंदी, इंग्रजी, पोर्तुगीज, फारसी, अरबी इत्यादी भाषांचा संस्कार कालौघात झालेला आहे, हे आपण जाणतोच. त्यामुळे असे स्वयंभूपण पुन्हा एका मर्यादेतच शक्य असते.
प्राचीन भाषा आणि तिचे आधुनिक रूप यांचा गाभा कायम असावा, हा निकष तर एकदमच पोकळ आणि मोघम आहे. सातवाहनकालीन ‘गाथासप्तशती’मधील कोणतीही ओवी (गाथा) आजच्या आपल्या ओवीशी आणि भाषेशी अजिबात जुळत नाही आणि जुळते, अशा दोन्ही सिद्धता मांडता येतात. त्यामुळे भाषेचे प्राचीनत्व आणि आधुनिक रूप यांचे नाते कसे जोडायचे, हा प्रश्न उभा राहतोच. त्यामुळे मग हा निकष पूर्ण करण्यासाठी ओढून-ताणून आपण ‘गाथासप्तशती’ या सामान्यत: इसवी सन चौथ्या-पाचव्या शतकातील संकलित ग्रंथातील ‘माहाराष्ट्री प्राकृत’ ही भाषा मराठीचे आद्यरूप आहे, असे सिद्ध करण्याचा वृथा खटाटोप करत आहोत आणि यातील विसंगती म्हणजे हे नाते जोडण्यासाठी आपल्याला संस्कृतचाच आधार घ्यावा लागतो, त्याशिवाय त्या ओव्या कळता कळत नाहीत.
उदा.
अवलंबिअ-माण-परम्मुहीऍ एंतस्स
माणिणि! पिअस्स।
पुट्ठ-पुलउग्गमो तुह कहेइ संमुहटिठ्अं
हिअअं॥१:८७॥
(हे मानिनी! प्रियकर आल्याबरोबर तू क्रोधाने पाठ फिरवलीस; परंतु तुझ्या पाठीवर उभे राहिलेले रोमांच तुझे हृदय त्याच्या सन्मुख आहे, असे दाखवितात). (vishwakosh.marathi.gov.in/२२२३५/)
उपरोक्त गाथेचा अर्थ लावण्यासाठी आपल्याला संस्कृतचा आधार घ्यावा
लागतो, म्हणजेच या माहाराष्ट्री प्राकृताचा आणि मराठीचा सांधा थेट जोडता येत नाही. त्यासाठी संस्कृतचा संदर्भ आवश्यक ठरतो. तसेच एक समांतर उदाहरण ‘मिसळपाव’ या संकेतस्थळावर मिळते. तेथे कोणा प्रचेतस नामक व्यक्तीने पुण्याजवळ मावळ तालुक्यातील बेडसे लेणीतील इसवी सन सुमारे २००० वर्षांपूर्वीचा प्राकृत भाषेतील शिलालेख आपल्यासमोर उदाहरणासाठी ठेवला आहे.
भाषा -प्राकृत संस्कृत रूप
सिधं धेनुकाकडे वायवस सिद्धम्।धेनुकाकटे वास्तव्यस्य
हालकियस कुडुबिकस उसभ हालिकीयस्य कुटाम्बकस्य ऋषभ-
णकस कुडुबिणिय सिअगुत णकस्य कुटुम्बिन्या: श्रीयगुप्ति -
णिकाय देयधमं लेणं सह पुते निकाया देयधर्मो लयनम् सह पुत्रे
ण णंद गहपतिणा सहोण नंद गृहपतिना सहो॥
मराठी अर्थ : सिद्धी असो, धेनुकाकट इथे वास्तव्य करणारी ऋषभणकाची पत्नी श्रीयगुप्ती हिने घरमालक असलेल्या पुत्र नंदासह दान दिलेले हे लेणे. आता हा शिलालेख मराठीपेक्षा संस्कृत भाषेला खूप जवळचा आहे हे तर दिसतेच आहे.( www.misalpav.com/node/२३८९६)
इसवी सन बाराव्या शतकातील महानुभाव वाङ्मयाचे एक उदाहरण पहा. - ‘नरींद्रबासां भेटि: अनुसरणः नरेंद्र कवि: साल कवि: नृसिंह कवि’ हे तिघे भाऊ: नृसिंह कविन नलोपाख्यान केले: साल कविन रामायण केले: ते आपुलाले रामदेवरायापुढां म्हणितले: तेथ नरेंद्र कवि बैसले होते: (ते त्यांना म्हणाले) यैसा द्वारकेचा रामहाठु वर्णितेती तरी तुमचेया पापा पुरश्चरण होते: ऐसे रायांदेखतां निभर्षिले:
या लीळेतील सर्व शब्दांचा अर्थ नक्कीच कळत नाही. पण, मराठीच बोलतोय इतपत तरी नक्कीच समजते. कुवलयमालेत मराठी बोलल्याचा उल्लेख दिण्हले, गहिल्ले असा आहे, तो समजून घेता येऊ शकतो. पण, माहाराष्ट्री प्राकृताला हे इतके लागू पडत नाही. तो लेण्यांतील शिलालेख असो किंवा गाथासप्तशतीतील कविता असो.( www.misalpav.com/comment/४५९४३१comment-४५९४३१)
आता इसवी सन १२९० मधील ज्ञानेश्वरीतील कोणतीही एक ओवी निवडा आणि आपल्या परिसरातील कोणाही मराठी माणसाला ऐकवा. त्याला त्या ओवीचा अर्थ सांगता येतो का ते पाहा. बऱ्याचदा ओवीच्या स्वरूपावर त्या ओवीतील विशिष्ट शब्द अथवा त्यांचे व्याकरण कळले तर अंदाज लावण्याचे काम अशी व्यक्ती करेल. म्हणजेच महानुभाव किंवा ज्ञानेश्वरीतील मराठी भाषेचा आजच्या मराठी भाषेशी जसा अनुबंध लावता येतो, तसा गाथा सप्तशती, बेंडसा लेणीतील शिलालेख यांतील मराठी भाषेचा आजच्या भाषेशी अनुबंध लावणे म्हणजे वडाची साल पिंपळाला नेऊन लावण्याप्रमाणे होईल, म्हणूनच कोणीतरी ठरवलेले चुकीचे निकष पूर्ण करण्यासाठी आपण काहीतरी पुरावे शोधत बसायचे, हा सगळा खटाटोप टाळायला हवा होता.
२००४ मध्ये जेव्हा तामिळ भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकारने दिला, तेव्हाची भारतातील राजकीय स्थिती आपण लक्षात घ्यायला हवी. द्रमुक या तामिळनाडूतील महत्त्वाच्या राजकीय पक्षाच्या पाठिंब्यावर तत्कालीन कॉँग्रेस सरकार तरले होते. तामिळभाषक आपल्या भाषेविषयी अतिशय जागरूक असल्याने त्यांनी आपल्या भाषेच्या विकासाच्या नावाने केंद्र सरकारकडून निधी मिळवण्यासाठी एक योजना आखली आणि ती पाठिंब्याच्या बळावर यशस्वी केली. कोणतीही मागणी नसताना, कोणतीही योजना आखलेली नसताना, कोणताही भाषिक संशोधनाचा आधार नसताना, त्यांनी आपल्या भाषेला अभिजात दर्जा मिळवून घेतला आणि केंद्र सरकारकडून विशिष्ट निधी मिळवला. (दरवर्षी अंदाजे ५ ते २० कोटी) या निधीतून तिथे केंद्र सरकारने एक संस्था सुरू केली. (www.CICT.in) यात प्रामुख्याने प्राचीन तामिळ भाषेच्या विकासाचे प्रकल्प सुरू केले गेले आहेत. नवीन पिढीला ही जुनी भाषा शिकवणे, त्या भाषेतील विविध साहित्यकृती आधुनिक रूपात रूपांतरित करणे इत्यादी कारणांसाठीच हा निधी खर्च करावा लागतो. कन्नड भाषेच्या अशा केंद्राला प्रस्तुत लेखकाने २०१८ मध्ये प्रत्यक्ष भेट दिली असता ते म्हैसूर येथील ‘भारतीय भाषा संस्थान’ या केंद्र सरकारच्या संस्थेत सुरू होते. त्यांना त्या आर्थिक वर्षात १.५ कोटी निधी प्राप्त झाला होता आणि त्यांचेदेखील जुन्या कन्नड भाषेचे प्रशिक्षण वगैरेंसारखे उपक्रम सुरू होते.
अभिजात दर्जा मिळाल्यावर मिळणाऱ्या निधीवरून तर महाराष्ट्रात ५०० कोटी वगैरे सारखे तोंडाला फेस आणणारे आकडे आपल्या तोंडावर फेकणारे विचारवंत उभे राहिले आहेत. मात्र, वस्तुस्थिती तशी नाही, हेदेखील आपण लक्षात घ्यायला हवे. अभिजात दर्जामुळे मराठीची भाषिक प्रतिष्ठा वाढेल, मराठी शाळा बळकट होतील, त्यांना भरपूर अनुदान मिळेल, मराठी माध्यमातून शिकलेल्यांसाठी रोजगार निर्मिती होईल, वाचन संस्कृतीचा विकास होईल, बृहन्महाराष्ट्रातील साहित्य संस्था, तज्ज्ञ, विद्यार्थी यांना पाठबळ मिळेल, मराठीच्या ५२ बोलींचे संशोधन मार्गी लागेल, श्रेष्ठ मराठी ग्रंथ रास्त किमतीत उपलब्ध करून देता येतील आणि यांसारखे इतर अनेक उपक्रम यांना अभिजातमुळे बळकटी येईल, असे बरेचसे मुद्दे मराठीप्रेमी मंडळी मांडताना दिसतात. मात्र, अभिजात दर्जा मिळाल्यानंतरही शासकीय व्यवहारात या उपक्रमांना काडीचीही किंमत मिळत नाही, हे तामिळ, कन्नड या दोन प्रमुख भाषांना अभिजात दर्जा प्राप्त झाल्यानंतरच्या परिस्थितीवरून कळून येईल.
वास्तविक पाहता, आपण सर्व मराठीप्रेमींनी अभिजात दर्जा वगैरे देऊन भाषा-भाषांमध्ये भेदभाव निर्माण करणाऱ्या तामिळ नीतीच्या विरोधात ठामपणे उभे राहायला हवे. त्याऐवजी केंद्र सरकारने भारतातील सर्वच भाषांच्या विकासासाठी जाणीवपूर्वक केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना बळ द्यायला हवे. अनेक जण भाषाप्रेमापोटी आपापल्या भाषेसाठी काही ना काही करत आहेत आणि करू इच्छितातही. या सर्वांना आपले म्हणणे मांडण्यासाठी आणि अशा समानधर्मी लोकांना एकत्र आणून भाषिक विकासाच्या विविध उपक्रमांना चालना द्यायला हवी. अन्य भाषांत चाललेला एखादा चांगला उपक्रम आपल्या भाषेत कसा राबवता येईल, यासाठी एका समान व्यासपीठाची निर्मिती करावी. म्हैसूरमध्ये भारतीय भाषांच्या विकासासाठी स्थापन झालेली ‘भारतीय भाषा संस्थान’ ही संस्था रडतखडत सुरू राहते आणि त्याच वेळेस हैदराबाद येथे सुरू झालेली इंग्रजी आणि अन्य परदेशी भाषांच्या विकासासाठी स्थापन झालेली संस्था मात्र एका मोठ्या विद्यापीठाचे रूप धारण करते, हा विरोधाभास दूर व्हायला हवा. त्यासाठी कोणतेही राजकारण अथवा स्वार्थ नसणाऱ्या भाषाप्रेमींनी एकत्र येऊन प्रयत्न करायला हवेत.
थोडक्यात मराठी भाषा दिन - २०२१च्या निमित्ताने आपण काही गोष्टी चांगल्याच लक्षात ठेवू या.
१) अभिजात वगैरे दर्जा मिळणे यामुळे भाषेचे आजचे रूप, आजची अवस्था बदलणार नाही.
२) अभिजात दर्जा मिळाला तर भाषेच्या विकासासाठी जो काही निधी मिळेल, त्यातून जास्तीतजास्त २०-२५ लोकांना रोजगार मिळतील आणि प्राचीन मराठी भाषेचा अभ्यास करण्याचे उपक्रम सुरू होतील.
३) अभिजात दर्जा मिळाल्यावर ५०० कोटी वगैरे निधी मिळणार नाही.
४) अभिजात दर्जा मिळाल्यावर आत्ताच्या भाषेसाठी, भाषकांसाठी कोणतेही उपक्रम राबवता येत नाहीत.
५) अभिजात दर्जा मिळाल्यामुळे मराठी शाळा सक्षम करण्यासाठी अनुदान मिळणार नाही.
आपल्या या गैरसमजुती दूर केल्यावर मग आपल्याला आपली भाषा सुदृढ करण्यासाठी काय काय करावे लागेल, याचीही खूणगाठ मनाशी बांधू या.
१) आपली भाषा विकसित करायची असेल तर सर्व माध्यमांवर आपण प्रभावी पद्धतीने आपली भाषा मांडत राहायला हवी.
२) तंत्रज्ञान आजच्या काळातील सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, हे लक्षात घेऊन सर्व प्रकारच्या तांत्रिक आविष्कारात आपली भाषा वापरली जाईल, यासाठी आपण दक्ष राहायला हवे.
३) मराठीचे संगणकीय मुद्रितशोधक यंत्र तयार व्हायला हवे.
४) बोललेले लिहिणारे आणि लिहिलेले बोलणारे मराठी संगणकीय साधन तयार व्हायला हवे.
५) ‘विकिपीडिया’ या मुक्त ज्ञानकोशावर प्रत्येक मराठी माणसाने दरवर्षी किमान १ तरी नोंद लिहावी किंवा भाषांतरित करावी.
६) उत्तमोत्तम मराठी साहित्यकृती सर्व भारतीय आणि जागतिक भाषांत भाषांतरित करण्यासाठी आपण मिळून प्रयत्न करावेत.
७) आपली भाषा सर्वत्र विनासंकोच, विना अडथळा वापरता येण्याइतपत तिचा विकास व्हायला हवा, असा ध्यास आपण धरायला हवा.
८) सर्व प्रकारचा कुशल संगणकीय व्यवहार मराठी भाषेतून व्हायला हवा. तशी मुक्तस्रोत साधने निर्माण व्हायला हवी.
९) आपल्या भारतीय भाषांत एकमेकांच्या भाषिक आणि साहित्यिक कृतींची चर्चा करणे, समजून घेणे, भाषांतर करणे, असे उपक्रम वाढीस लागणे.
१०) इस्रायली लोकांनी ज्याप्रमाणे प्राणपणाने आपली ‘हिब्रू’ भाषा जगवली, विकसित केली आणि आज सर्व व्यवहार त्याच भाषेत होतील यांची काळजी घेतली, तशी आपणही घ्यायला हवी. प्रत्येक मराठी माणसाने त्यासाठी ‘याचसाठी केला होता अट्टाहास’ हे पुस्तक नक्की वाचावे.
जर आपल्याला आपल्या भाषेविषयी खरोखरच तळमळ असेल तर आपण अभिजात दर्जा मिळवण्याच्या मागे न लागता भाषेचे उपयोजन अधिक चांगल्या गुणवत्तेचे करण्यावर भर दिला तर आपले अनेक प्रश्न सुटतील आणि मराठी माणूस खऱ्या अर्थाने अभिजात होईल, असे वाटते.
संदर्भ :
१) www.misalpav.com/node/४७६७३
२) www.misalpav.com/node
३) मर्हाठी संस्कृती काही समस्या -शं. बा. जोशी
४) संमत विचार - विश्वनाथ खैरे
५) भाषाशुद्धी - विनायक दामोदर सावरकर
६) www.ccit.com
७) www.ciil.org
८) marathi.gov.in/wp-content/uploads/२०१८/१२/अभिजात-मराठी-भाषा-अहवाल-२०१३.PDF
९) याचसाठी केला होता अट्टहास - भारतीय विचार साधना प्रकाशन
१०) भारतीय व्यवहार कोश - वि. द. नरवणे - भारतीय विचार साधना प्रकाशन
- आनन्द काटीकर
(लेखक फर्ग्युसन महाविद्यालयात मराठी भाषेचे प्राध्यापक असून
मराठी अभ्यास परिषद पत्रिका भाषा आणि जीवन’चे संपादक आहेत.)