सेनापती म्हणून अत्यंत कुशल नेतृत्व मराठी फौजेला देत छत्रपतींच्या राज्याचे साम्राज्यात रूपांतर करणारा, कर्तृत्ववान पेशवा असा ठसा उमटवणारा शाहू महाराजांचा विश्वासू सेवक. वयाच्या १९व्या वर्षी पेशवेपदाची सूत्रे हातात घेऊन सर्व प्रकारच्या अंतर्गत विरोधाला तोंड देत छत्रपतींच्या राज्याचा दिल्लीपर्यंत विस्तार करणारा सेनानायक. अवघ्या २२ वर्षांच्या कार्यकाळात ४० लढाया लढणारा आणि सर्व लढलेल्या युद्धात विजय मिळवणारा धुरंधर सेनापती म्हणजे बाजीराव पेशवे. पण, आज महाराष्ट्र मात्र बाजीराव पेशव्यांची ‘सेनापती’ म्हणून असलेली ओळख विसरतो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमीकाव्याच्या युद्धकलेला हालचाल प्रधान युद्धात परावर्तित करणारा व्यूहरचनाकार अशा पहिल्या बाजीराव पेशव्यांची २८ एप्रिल ही पुण्यतिथी असते. त्यानिमित्ताने बाजीरावांच्या सेनापतीत्वाचा पाच लेखांमधून मागोवा घेण्याचा हा प्रयत्न. त्या लेखमालेतील हा पहिला लेख...
दि. २८ एप्रिल ही तारीख म्हणजे पहिले बाजीराव पेशवे यांची पुण्यतिथी. वयाच्या २०व्या वर्षी पेशवे पदाची जबाबदारी खांद्यावर घेणारा कर्तृत्ववान पुरूष. अवघे ४२ वय असताना मृत्युमुखी पडलेला आद्य पेशवा. खरंतर सगळ्या कर्तृत्ववान पेशव्यांना अल्पायुषी राहण्याचा शाप होता, असं म्हणावं लागेल. बाजीराव, नानासाहेब, माधवराव, हे सगळे कर्तृत्ववान पेशवे अल्पायुषी ठरावे, हे मराठीशाहीचे दुर्दैवचं! त्या सगळ्यांनी गाजवलेली तलवार आणि त्यांच्या बुद्धीचा तथाकथित पुरोगामी महाराष्ट्राला फक्त ते ब्राह्मण होते म्हणून तिटकारा वाटावा आणि त्यांचा हेतुपुरस्सर विसर पडावा, हेही दुर्दैवच! खरंतर वंशपरंपरागत पेशवेपदावर भट घराण्यातील बाळाजी विश्वनाथ यांची थोरली पातीच आरूढ व्हावी, अशी व्यवस्था शाहू महाराजांनीच केलेली होती. या घराण्यातील सुरुवातीच्या चार पिढ्यांनी आपल्या कर्तृत्वाने शाहू महाराजांचा हा विश्वास सार्थ ठरवला. परंतु, मुळातून कोणत्याच गोष्टींचा अभ्यास न करणारा भारतीय आणि विशेषत्वाने महाराष्ट्रातील समाज, पेशवाईकडे आणि पेशवे घराण्यातील पुरुषांकडे फक्त कलुषित नजरेनेच पाहायला शिकला. त्यात इंग्रजी राजवटीने पेरलेल्या जातीवादी विषाने, आम्ही, निखळ कर्तृत्वाचेदेखील खुल्या दिलाने कौतुक करणं विसरून गेलो आहे. कोणतेही कर्तृत्ववान घराणे कधीतरी अस्ताला जातच असते. पेशव्यांच्या घरात बाळाजी विश्वनाथ, बाजीराव बाळाजी, बाळाजी बाजीराव (नानासाहेब), आणि माधवराव या चार पेशव्यांनी मराठी सत्तेला उत्तुंग शिखरावर नेऊन ठेवले. पण, इंग्रजी भेदनीती, या भारतवर्षातील संस्थानिकांची स्वार्थी वृत्ती आणि आपल्याच घरातील धाकट्या पतीची (रघुनाथराव) अस्थायी महत्त्वाकांक्षा या सगळ्या गोष्टींचा अपरिहार्य परिणाम म्हणजे पेशव्यांचा पराभव होय. इंग्रजी फौजेशी टक्कर देण्यासाठी तयारी करणार्या शेवटच्या बाजीरावाला संपूर्ण प्रयत्न करूनही शिंदे, होळकर, भोसले या कोणत्याही सरदारांनी साथ दिली नाही. या वस्तुस्थितीकडे संपूर्ण दुर्लक्ष करण्याची आजकाल फॅशनच रूढ झालेली दिसते. परिणाम, बोन्साय झालेले राजकारणी आणि खुजी विचारधारा म्हणजेच पुरोगामित्व आणि खरे कर्तृत्व, असे काहीसे सामाजिक आकलन झाले आहे.
निदान आता तरी ज्या माणसाने मराठेशाहीची तलवार गाजवली, त्याच्याबद्दल कोणताही जातीय अभिनिवेश न ठेवता फक्त त्याच्या कर्तृत्वाला सलाम करावा. पण, आमच्या रगारगात जातीयवाद भरलेला असताना साडेतीन टक्क्यांची बुद्धी आणि मनगटातला जोर मान्य करण्याची दानतदेखील हा तथाकथित पुरोगामी महाराष्ट्र घालवून बसला आहे. शिंदे, होळकर, पवार, गायकवाड, भोसले हे सर्व बाजीरावाने उभे केलेले सरदार. पंतप्रतिनिधी व सेनापती चंद्रसेन जाधव, उदाजी चव्हाण यांची मिरासदारी मोडून काढण्यासाठी त्यांनी तयार केलेली ही स्वता:ची टीम होती. या टीमचा आघाडीवर राहून लढणारा कर्णधार बाजीराव पेशवाच होते. या साथीदारांना बरोबर घेऊन बाजीराव पेशव्यांनी मुघल सुलतानतीच्या मुळावरच घाव घातले. दक्षिणेतील मराठीशाहीला सतत जेरीस आणणारा निजाम, बाजीरावाचा कट्टा शत्रू होता. बादशाहाच्या विश्वासास पात्र असलेला निजाम स्वतः धुरंधर सेनानी होता. या निजामाला एकदा नव्हे, तर तीनदा बाजीरावाने ‘सपशेल’ पराभूत केले. शरण यायला भाग पाडले. पण, इतिहास न वाचता, न समजून घेता, फक्त संख्येने कमी आहेत म्हणून आणि आजही त्यांना दाबून टाकणे दुरापास्त आहे, हे समजून ब्राह्मण वर्गाचा फक्त टोकाचा द्वेष करणे, एवढाच काही लोकांचा उद्योग झालेला आहे.
भारताबाहेरील अनेक युद्ध व संरक्षणतज्ज्ञ (उदा. जनरल मांटगोमेरी) ज्याचा अत्यंत आदराने उल्लेख करतात, त्या बाजीराव पेशव्यांची निंदा करण्यात अनेकांना आनंद वाटतो, हे या पुरोगामी महाराष्ट्रचे आज वैशिष्ट्य ठरते आहे. बाजीरावाचे सेनापती म्हणून असलेले कर्तृत्व आठवण्याऐवजी आम्हाला मस्तानी आठवावी, हे या देशाचे दुर्दैव! पेशवे त्यांच्या कर्तृत्वासाठी आठवू नयेत, यासाठी मराठी सारस्वतांच्या एका पिढीनेच शौर्याला, धैर्याला, व्यूहरचना करणार्या बुद्धीला आणि अखंड उद्योगशीलतेला महत्त्व न देता प्रणयाला प्राधान्य देणार्या कादंबर्यांमागे कादंबर्या लिहाव्यात, हे मराठी इतिहास आणि साहित्याचे अपयश म्हणावे लागते. त्यातही ज्याने अनेक कर्तृत्ववान धडाडीच्या व्यक्तींना ओळखून, आकार देत, मराठी साम्राज्याचे आघाडीचे शिलेदार म्हणून नावारूपाला आणले, मराठी राज्याचे साम्राज्यात रूपांतर केले, त्या बाजीराव पेशव्यांची ओळख ‘मस्तानीच्या प्रेमपाशात गुरफटलेला एक प्रियकर’ म्हणून महाराष्ट्राला व्हावी, हा दैवदुर्विलासच म्हणावा लागेल. म्हणून आणि केवळ म्हणूनच हा लेखन प्रपंच आहे. पाच स्फूट लेखांच्या माध्यमातून जिगरबाज बाजीरावाने लढलेल्या आणि जिंकलेल्या मोहिमांचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न आहे. हे लेख लिहिताना लेफ्टनंट जनरल शशिकांत पित्रे आणि आघाडीचे इतिहास संशोधक कौस्तुभ कस्तुरे तसेच रियासतकार सरदेसाई यांच्या पुस्तकांचा आधार घेतलेला आहे. इतिहासाकडे नजर टाकली तरी निजामाला दोन वेळा गनिमीकाव्याचे नेहमीचेच तंत्र वापरून बाजीरावाने परास्त केले, तेव्हा तो स्वत: आघाडीवर होता आणि इतर सरदारांना त्यांनी डावी-उजवीकडे ठेवले होते, हे लक्षात येते. सेनापतीचे पहिले आणि सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे नियोजन व युद्धभूमीची निवड करणे व आपल्या सैन्याच्या दृष्टीने योग्य अशा वेळी योग्य अशा ठिकाणी लढाई करणे, शत्रूला भिडणे हे होय. बाजीरावाने लढलेल्या सर्व लढायांमध्ये सेनापती तोच होता व हे सेनापतीचे काम त्याने सतत आघाडीवर राहून पूर्ण केले. त्याच्या टिमची त्यांच्यावर पूर्ण निष्ठा होती व त्याने दिलेल्या प्रत्येक आज्ञेचे ते पूर्ण निष्ठेने पालन करीत अंमलबजावणी करीत हेही खरेच!
मोहम्मद बंगशला नाक मुठीत धरून शरण येण्यास भाग पाडताना बाजीरावाने केलेल्या हालचाली आणि व्यूहरचना केवळ अप्रतिम. त्याचप्रमाणे, सादतखानाने होळकर, पवार यांना सपाटून मार दिल्या नंतर उद्भवलेल्या गंभीर स्थितीतही बाजी उलटवणारी, दिल्लीला जाऊन भिडण्याची जिगरबाज खेळी फक्त बाजीराव पेशवेच करू जाणे. त्या एका खेळीने त्याने संपूर्ण मोहीम आपल्या बाजूने फिरवून घेतली. छत्रसालाच्या मदतीला केलेल्या मोहिमेत कोणतेही मोठे सरदार त्यांच्याबरोबर नव्हते. संपूर्ण मोहीम त्याने स्वत:च्या जिगरीवर आणि रणकौशल्यावर विजयी केली. दर मोहिमेत अत्यंत विचारपूर्वक आणि फक्त आपल्यालाच अनुकूल अशा युद्धभूमीची निवड करणे, तसेच शत्रूला घेरताना आणि खदेडतांनाची तत्परता केवळ अतुलनीय ठरते. तोफखाना वगैरे अवजड सामान वेगवान हालचाली करण्यात सगळ्यात मोठा अडथळा ठरतो, हे लक्षात घेऊन त्यांनी घोडदळाला आपले शक्तिस्थान बनवले, आणि केवळ वेग व वेगवान हालचाली प्रधान युद्धतंत्राचा वापर करून आपल्या प्रत्येक शत्रूचा पराभव केला. खरंतर अद्ययावत तोफखान्याचा त्या काळी कचरा करणारा एकमेव सेनापती म्हणून बाजीराव पेशव्यांचेच नाव घ्यावे लागते. निजाम असो की मोहम्मद बंगश असो, शत्रूच्या तोफखान्यांना दर लढाईमध्ये फक्त आपल्या कल्पकतेच्या जोरावर बाजीराव कुचकामी ठरवत राहिले. अवघ्या २२ वर्षांच्या कारकिर्दीत ४०-४२ लढाया लढणारा आणि लढलेली प्रत्येक लढाई जिंकणारा, सतत आपल्या सैनिकांबरोबर राहणारा, आपल्या सैन्याच्या वेगवान हालचाली करून शत्रूला आश्चर्यचकीत करणारा, आपले सैनिक मुघल सेनेपेक्षा जास्त निष्ठावान व लढवय्ये सैनिक असावेत म्हणून कर्जबाजारीपणा स्वीकारूनही सैनिकांना जास्त मोबदला देणारा बाजीराव हा निःसंशय जगातील सर्वोत्तम सेनापतींपैकी एक ठरतो. अशा रणबहादूर बाजीराव पेशव्यांना शत शत प्रणाम! (क्रमशः)