‘सामाजिक समरसता’ हा चर्चेचा नव्हे, जगण्याचा विषय !

भाजप नेते सुनील देवधर यांनी साजरी केली ‘समरसता दिवाळी’

    28-Oct-2022
Total Views | 81
sd


वंचितांसाठी काम करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य
 
 
 
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : भाजपचे राष्ट्रीय सचिव आणि आंध्र प्रदेश सहप्रभारी सुनील देवधर यांनी यंदा पुण्यात सेवावस्त्या, कामगार, तृतीयपंथी आणि देहविक्रय करणाऱ्या महिलांसोबत ‘समरसता दिवाळी’ साजरी केली. यावेळी ‘सामाजिक समरसता’ हा केवळ चर्चेचा नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीचा विषय असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
 
भाजपचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर हे दिल्लीत दरवर्षी मराठमोळ्या पद्धतीने ‘समरसता गणेशोत्सव’ साजरा करतात. यावेळी समाजातील सर्व थरातील लोक गणेशोत्सवामध्ये सहभागी होतात. त्याचप्रमाणे यंदा देवधर यांनी पुण्यामध्ये ‘समरसता दिवाळी’ साजरी केली. यावेळी त्यांनी पुण्यातील सेवावस्त्या, कामगारवस्त्या, काबाडकष्ट करूनही आपल्या मुलांना शिक्षण मिळण्यासाठी धडपडणाऱ्या माता – भगिनी, समाजाचाच भाग असलेले; मात्र उपेक्षेचा सामना करावा लागणारे तृतीयपंथी, देहविक्रय करणाऱ्या महिला, त्यांची मुले यांच्यासोबत मोठ्या आनंदात दिवाळी साजरी केली.
 
 
 
 
त्याविषयी बोलताना सुनील देवधर म्हणाले, पुण्यातील बुधवार पेठ परिसरामध्ये राहणारे तृतीयपंथीय, देहविक्रय करणाऱ्या महिलांसोबत दिवाळी साजरी करताना विशेष समाधान लाभले आहे. समाजाच्या वंचित घटकांसाठी काम करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. ‘सामाजिक समरसता’ साधायची असेल, तर केवळ चर्चा करून चालणार नाही. त्यासाठी ‘सामाजिक समरसता’ प्रत्यक्ष जगावी लागेल.
 
कोणत्याही प्रकारचा भेदभाव समाजाने करता कामा नये, प्रत्येकाला माणूस म्हणून वागणूक देणे गरजेचे आहे. प्रत्येक व्यक्तीचा एक सामाजिक सन्मान असतो, आत्मगौरव असतो. त्याचे रक्षण करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. त्यासाठी ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ यावर विश्वास ठेवून प्रत्येकास समान वागणूक देणे हीच माणूसकी आहे, असेही सुनील देवधर यांनी यावेळी नमूद केले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121