एकेकाळी धावण्याच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे नाव कायम दुमदुमत ठेवणारे सुप्रसिद्ध धावपटू, ‘द फ्लाईंग सीख’ कॅप्टन मिल्खा सिंग हे चंदिगढच्या इस्पितळात काही दिवस ‘कोविड’च्या रोगाशी निकराची झुंज देत होते. परंतु, दि. १९ जून रोजी पहाटे त्यांची ही झुंज अपयशी ठरली व त्यांचे वयाच्या ९१व्या वर्षी निधन झाले. अवघ्या सहा दिवसांपूर्वीच त्यांच्या पत्नी निर्मल कौर यांचेदेखील कोरोनामुळेच निधन झाले. त्यानिमित्ताने मिल्खा सिंग यांच्या कारकिर्दीवर प्रकाश टाकणारा हा लेख...
फाळणीच्या वेळी पाकिस्तानात समाविष्ट झालेले पूर्व पंजाबातले, राजस्थानच्या सीमेजवळचे, मुझफ्फरगढ जिल्ह्यातले, गोविंदपूर तालुक्यातले कोट अड्डू हे लहानसे खेडेगाव मिल्खा सिंग यांचे जन्मगाव होते. या गावातल्या एका शीख कुटुंबात, दि. २० नोव्हेंबर, १९२९ रोजी मिल्खा सिंग यांचा जन्म झाला. त्यांना चार-पाच भाऊ आणि चार-पाच बहिणी होत्या, त्यातले काही आजारी पडून अकल्पित दगावले, तर काहींना फाळणीच्या वेळी उसळलेल्या धार्मिक दंगलीत आपला जीव नाहक गमवावा लागला. मिल्खा सिंग यांचे वृद्ध आई-वडील हेदेखील दंगेखोर जल्लादांच्या तलवारींचे बळी ठरले. पाकिस्तान समर्थक धर्मांध दंगेखोर, कसायाच्या निष्ठुरतेने, धारदार तलवारी परजत, ज्याक्षणी त्यांच्या दारी येऊन थडकले होते, त्याक्षणी मिल्खा सिंग यांच्या वडिलांनी, आपल्या पुत्राचा जीव वाचावा या उद्देशाने “भाग, मिल्खा भाग...” अशी आर्त किंकाळी फोडली आणि ती कानी पडताच, १७-१८ वर्षांचे मिल्खा सिंग सैरभैर होऊन वार्याच्या वेगाने घरातून दूरवर पळाले आणि झाडाझुडपांतून लपतछपत सरतेशेवटी भारताकडे धाव घेणार्या निर्वासितांच्या एका जथ्थ्यात मिसळून रेल्वेने थेट दिल्लीला येऊन पोहोचले.
आपल्या वडिलांची ती अखेरची आर्त किंकाळी मिल्खा सिंग यांच्या स्मरणात कायमची बसली आणि म्हणूनच रूपेरी पडद्यावर सादर झालेल्या त्यांच्या जीवनावरच्या चित्रपटाला, ‘भाग, मिल्खा भाग...’ असे शीर्षक आहे.भारतात आल्यावर मिल्खा सिंग यांनी सुरुवातीला पुरानी दिल्ली रेल्वेस्थानकावर चक्क हमाली करून कसेबसे दिवस काढले. लग्न झालेली त्यांची मोठी बहीण आधीपासूनच दिल्लीत राहत होती. तिचा ठावठिकाणा महत्प्रयासाने शोधून काढल्यावर ते तिच्याकडे जाऊन राहिले. इतकेच नव्हे, तर कुठल्याशा शाळेत नवव्या इयत्तेत प्रवेश मिळवून त्यांनी आपले अर्धवट राहिलेले शिक्षण पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न करून पाहिला. परंतु, शाळेत त्यांचे मन रमले नाही. त्यांचा एक थोरला भाऊ, माखन सिंग हा भारतीय लष्कराच्या सेवेत भरती झालेला होता. त्याच्याच सल्ल्यानुसार, मात्र तीन वेळा चाचणी परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यानंतर चौथ्या वेळी उत्तीर्ण झाल्यावर, १९५१ साली मिल्खा सिंग हे सिकंदराबाद येथे लष्करात भरती झाले. त्यांना आर्मीच्या मेसमध्ये काम देण्यात आले. मेसमध्ये काम करत असताना त्यांना धावण्याचा सराव करायची भरपूर संधी मिळाली. लष्कराने विविध ठिकाणी आयोजित केलेल्या धावण्याच्या अनेक स्पर्धांमधून ते चमकू लागले. पतियाळा येथे लष्कराने आयोजित केलेल्या ४०० मीटर्स धावण्याच्या शर्यतीत त्यांनी भाग घेतला. ते अंतर त्यांनी अवघ्या ४७.९ सेकंदांच्या विक्रमी वेळात पार करून सर्वांनाच चकित केले. लष्कराच्या सेवेत असल्यामुळेच मिल्खा सिंग यांना ‘सदर्न कमांड’चे मुख्यालय असलेल्या पुणे शहरात तब्बल सहा वर्षे राहायची संधी मिळाली आणि ते पुण्याच्या प्रेमातच पडले. त्यांनी स्वतःच तसे बोलूनही दाखवले आहे.
लष्कराच्या शिफारसीमुळे मिल्खा सिंग यांना १९५६ साली ऑस्ट्रेलियातल्या मेलबर्न शहरात झालेल्या ‘ऑलिम्पिक’मध्ये ४०० मीटर्स धावण्याच्या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. या स्पर्धेत ५० हून अधिक देशांचे सुमारे १०० धावपटू सहभागी झाले होते. या धावपटूंची आठ गटांत विभागणी करून शर्यतीच्या आठ प्राथमिक स्पर्धा घेण्यात आल्या. प्रत्येक गटातल्या पहिल्या तीन विजेत्यांना चारपैकी एका उपउपांत्य फेरीत सहभागी होण्याची संधी मिळाली. भारताचे प्रतिनिधित्व करत असलेले मिल्खा सिंग हे प्राथमिक स्पर्धेत ४०० मीटर्स अंतर ४८.९ सेकंदात पार करून त्यांच्या गटात चौथा क्रमांकावर आले. त्यामुळे ते कुठल्याच उपउपांत्य फेरीसाठी पात्र ठरले नाहीत. तरीही त्यांनी आपले हे अपयश भविष्यातल्या आपल्या भव्य यशाची पहिली पायरी आहे, असा विचार केला आणि अंतिम स्पर्धा संपताक्षणी या ‘ऑलिम्पिक’मध्ये ४०० मीटर्स अंतर ४६.७ सेकंदात धावून सुवर्णपद मिळवलेल्या चार्ल्स जेनकिन्स या अमेरिकेच्या धावपटूंची भेट घेतली आणि त्यांच्याच तोंडून त्यांच्या यशाची नेमकी कारणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. चार्ल्स जेनकिन्स यांना मिल्खा सिंग यांनी एकप्रकारे गुरू मानले आणि त्यांनी केलेल्या मौल्यवान सूचनांचे तंतोतंत पालन करण्याचा दृढनिश्चय करून ते भारतात परतले.ओडिशाची तत्कालीन राजधानी कटक येथे १९५८ साली राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धा झाल्या. त्यांत २०० मीटर्स आणि ४०० मीटर्स धावण्याच्या शर्यतींमध्ये मिल्खा सिंग यांनी सुवर्ण पदके मिळवून पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. त्याच वर्षी ‘कार्डिफ’ या वेल्सच्या राजधानीत ‘कॉमनवेल्थ गेम्स’मध्ये ४४० यार्ड अंतराच्या शर्यतीत मिल्खा सिंग यांनी सुवर्ण पदक पटकावून भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी करून दाखवली. ‘कॉमनवेल्थ गेम्स’मध्ये अर्थात राष्ट्रकुल सदस्य देशांच्या स्पर्धांमध्ये असे घवघवीत यश भारताला प्रथमच मिळाले. साहजिकच त्याच वर्षी म्हणजे १९५८ साली जपानची राजधानी टोकियो येथे होऊ घातलेल्या आशियाई देशांच्या स्पर्धेत मिल्खा सिंग यांचा सहभाग सुनिश्चित झाला.
मिल्खा सिंग यांनीही आपली निवड योग्य असल्याचे सिद्ध करून दाखवले. टोकियोतल्या ‘एशियन गेम्स’मध्ये २०० मीटर्स अंतराची शर्यत २१.६ सेकंदांत, तर ४०० मीटर्स अंतराची शर्यत केवळ ४७ सेकंदांत पार करून मिल्खा सिंग यांनी भारतासाठी दोन सुवर्ण पदके प्राप्त केली. विशेष म्हणजे, जागतिक कीर्तीचा पाकिस्तानी धावपटू अब्दुल खालिक याला त्यांनी २०० मीटर्सच्या शर्यतीत, एक दशमांश सेकंदाच्या फरकाने का होईना, मागे टाकून ती शर्यत प्रथम क्रमांकाने जिंकली. अब्दुल खालिक याचा १०० मीटर्स आणि २०० मीटर्स या कमी अंतराच्या शर्यतींमध्ये प्रचंड दबदबा होता. त्याने 1954 साली फिलिपाईन्सची राजधानी मनिला येथे झालेल्या ‘एशियन गेम्स’मध्ये 100 मीटर्स अंतराची शर्यत १०.४ सेकंद या विक्रमी वेळात आणि २०० मीटर्स अंतराची शर्यत अवघ्या २१.४ सेकंदात लीलया जिंकली होती. त्यावेळी यजमान देशाचे अर्थातफिलिपाईन्सचे पंतप्रधान रॅमन मॅगेसेसे आणि भारताचे पंतप्रधान पंडित नेहरू हे उपस्थित होते. नेहरूंनी आपल्या भाषणात अब्दुल खालिक याची तुलना अतिवेगाने उडणार्या पक्ष्याशी करत त्याला ‘फ्लाईंग बर्ड ऑफ एशिया’ असे संबोधले होते. तेव्हापासून तो स्वतःला आणि सारे जग त्याला तसेच संबोधू लागले होते. ही पार्श्वभूमी लक्षात घेतली तर मिल्खा सिंग यांनी टोकियोतल्या ‘एशियन गेम्स’मध्ये २०० मीटर्स अंतराच्या शर्यतीत, अब्दुल खालिक या पाकिस्तानी धावपटूवर मात करून त्याचे एक प्रकारे गर्वहरण केले होते!
पंडित नेहरू यांच्या संकल्पनेतून १९५६ साली दिल्लीमध्ये प्रथमच भारत-पाक क्रीडा स्पर्धा पार पडल्या होत्या. त्याच धर्तीवर पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जनरल अयूब खान यांनी १९६० साली लाहोरमध्ये पाक-भारत क्रीडा स्पर्धा घेण्याचे नक्की केले. या स्पर्धेत भाग घ्यायला आणि त्यासाठी पाकिस्तानला जायला, मिल्खा सिंग बिलकूल तयार नव्हते. तरीही “पाकिस्तानच्या प्रेक्षकांसमोर पाकिस्तानी क्रीडापटूंवर मात करून भारतासाठी विजयश्री खेचून आणण्याची उत्तम संधी या निमित्ताने तुमच्याकडे चालत आली आहे, ती दवडू नका,” असे जेव्हा पंडित नेहरू यांनी स्वतः मिल्खा सिंगांना आपल्या निवासस्थानी बोलावून सांगितले, तेव्हा कुठे ते पाकिस्तानला जायला तयार झाले. पाकिस्तानात मिल्खा सिंग यांच्या नावाचा प्रचंड बोलबाला झालेला होता. तथापि, पाकिस्तानी धावपटू अब्दुल खालिक हाच मिल्खा सिंग यांच्यापेक्षा वरचढ ठरणार, असे तमाम पाकिस्तानी प्रेक्षक गृहित धरून चालले होते. मिल्खा सिंग यांनी त्यांच्या या भ्रमाचा भोपळा फोडला. अवघ्या २०.७ सेकंदात २०० मीटर्स अंतर धावून त्यांनी अब्दुल खालिक याला मागे टाकत ही शर्यत प्रथम क्रमांकाने जिंकून सुवर्ण पदकावर आपले आणि भारताचे नाव कोरले. ही शर्यत पाहण्यासाठी खास उपस्थित असलेले, पाकिस्तानचे सर्वेसर्वा जनरल अयुब खान हे बक्षीस समारंभप्रसंगी मिल्खा सिंग यांच्याकडे कौतुकाने बघत उद्गारले, “मिल्खा सिंग वॉज नॉट रनिंग, ही वॉज फ्लाईंग... ही इज ए फ्लाईंग सीख!” बस्स! तेव्हापासून मिल्खा सिंग यांना ‘फ्लाईंग सीख’ ही आगळीवेगळी ओळख मिळाली.
साहजिकच, मिल्खा सिंग हे जेव्हा इटलीच्या रोम शहरात १९६० साली झालेल्या ‘ऑलिम्पिक’मध्ये ४०० मीटर्स धावण्याच्या स्पर्धेत सहभागी झाले, तेव्हा ते भारतासाठी सुवर्ण पदक नक्कीच घेऊन परततील अशीच सर्व भारतीयांना खात्री वाटत होती. मिल्खा सिंग यांनीही उपउपांत्य फेरीत ४०० मीटर्स अंतर ४६.५ सेकंदात, तर उपांत्य फेरीत तेच अंतर ४५.९ सेकंदात पार करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत निम्मे अंतर पार करेपर्यंत मिल्खा सिंग हेच सर्वांच्या पुढे धावत होते. मात्र, एका क्षणी त्यांना काय वाटले कुणास ठाऊक, त्यांनी अन्य धावपटूंच्या स्थितीचा अंदाज घेण्यासाठी दोन्ही बाजूंना वळून पाहिले. परिणामतः त्यांचा वेग किंचित मंदावला. त्याचा फायदा त्यांच्या तीन प्रतिस्पर्ध्यांना मिळाला आणि निमिषार्धात ते मिल्खा सिंगांच्या पुढे निघून गेले. डेव्हिस ओलीस हे अमेरिकेचे धावपटू, ४४.९ सेकंदांत ४०० किलोमीटर्स अंतर पार करून सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले, तर कार्ल काऊफमन हे जर्मनीचे धावपटू ४४.९ सेकंदांतच ते अंतर पार करूनही, अन्य मापदंडानुसार दुसर्या क्रमांकाच्या रौप्यपदकाचे धनी ठरले. दक्षिण आफ्रिकेचे माल्कम स्पेन्सर यांना तेच अंतर पार करायला ४५.५ सेकंद लागल्याने तिसर्या क्रमांकाच्या कांस्यपदकावर त्यांना समाधान मानावे लागले. भारताचे मिल्खा सिंग यांनी ते अंतर पार करण्यासाठी ४५.६ सेकंद इतका अवधी घेतल्याने, अवघ्या एक दशमांश सेकंदाच्या फरकाने ते चौथ्या क्रमांकावर गेले आणि कांस्यपदकाला देखील मुकले.
या निकालाने मिल्खा सिंग व्यक्तिशः तर हादरलेच, त्याशिवाय त्यांच्याकडे डोळे लावून बसलेले तमाम भारतीय निराशेच्या खाईत लोटले गेले. त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट इतकीच होती की, मिल्खा सिंग यांचे या ‘ऑलिम्पिक’मध्ये कांस्यपदक हुकले असले तरी त्यांनी त्यापूर्वीच्या सगळ्या ‘ऑलिम्पिक’ स्पर्धांमध्ये ४०० मीटर्स अंतराच्या शर्यतीत सुवर्ण पदक मिळवलेल्या सगळ्या विजेत्यांपेक्षा कमी अवधीत हे अंतर पार केले होते. ‘ऑलिम्पिक’मधला तेव्हापर्यंतचा प्रस्थापित विक्रम ४६.९ सेकंदांचा होता, जो १९६०च्या रोम ‘ऑलिम्पिक’मध्ये पहिले तीन क्रमांक मिळवलेल्या धावपटूंसकट चौथ्या क्रमांकावर राहिलेल्या मिल्खा सिंग यांनीही मोडीत काढला होता, हे विशेषच म्हणायला हवे! मिल्खा सिंग यांनी पुढे दोन वर्षांनी इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे १९६२ साली झालेल्या आशियाई देशांच्या स्पर्धेत, ४०० मीटर्स अंतराची शर्यत ४६.९ सेकंदात पुरी करून सुवर्ण पदक जिंकले. त्याच वेळी भारताचे माखन सिंग यांनी दुसर्या क्रमांकाने येऊन रौप्य पदक जिंकले. त्या शर्यतीशिवाय, प्रत्येक संघात चार धावपटूंचा सहभाग असलेली ४०० मीटर्स रिलेची सांघिक शर्यतदेखील भारताने जिंकून सुवर्ण पदक प्राप्त केले. भारताच्या या संघात मिल्खा सिंग, माखन सिंग, दलजित सिंग आणि जगदिश सिंग हे चार धावपटू होते.
आशिया खंडातले पहिले ‘ऑलिम्पिक’ १९६४ साली, जपानची राजधानी टोकियो येथे झाले. या ‘ऑलिम्पिक’मध्ये सहभागी होण्यासाठी मिल्खा सिंग अजिबात उत्सुक नव्हते, तरीही निवड समितीने मिल्खा सिंग यांच्याकडे ४०० मीटर्स रिले शर्यतीसाठी भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी सोपवली. मिल्खा सिंग यांच्या व्यतिरिक्त या संघात माखन सिंग, अजमेर सिंग आणि अमृत पाल हे धावपटू होते. हा संघ ‘ऑलिम्पिक’मध्ये प्राथमिक निवडीच्या शर्यतीसाठी ज्या गटात समाविष्ट होता, त्याच गटात अमेरिका, सोव्हिएत रशिया, फ्रान्स, जपान आणि सेनेगल या देशांच्या मातब्बर संघांचा समावेश होता. भारताचा संघ या गटाच्या प्राथमिक शर्यतीतच मुळी चौथ्या क्रमांकावर आल्याने पुढील शर्यतींसाठी त्याचे दरवाजेच बंद झाले. भारतीय संघाच्या नशिबी अशी नामुष्की आल्याने मिल्खा सिंग दुखावले. त्यानंतर ते स्वतः कुठल्याच स्पर्धांमध्ये उतरले नाहीत. पंजाब सरकारने ‘क्रीडा निदेशक’ अर्थात ‘डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स’ या पदावर त्यांची नियुक्ती केली. पुढे अनेक वर्षे ते त्या पदावर कार्यरत होते. मध्यंतरीच्या काळात ते निर्मल कौर सैनी यांच्याशी विवाहबद्ध झाले. निर्मल कौर यांचाही जन्म पूर्व पंजाबमधल्या शेखपुरा नावाच्या अशा गावात झाला होता, जे गाव फाळणीच्या वेळी पाकिस्तानात गेले होते. परिणामी, निर्मल कौर सैनी या आठ वर्षांच्या असताना निर्वासित होऊन आपल्या कुटुंबासह भारतात आल्या होत्या. पंजाब विद्यापीठातून त्यांनी राज्यशास्त्र या विषयात एमए केले होते. त्या व्हॉलीबॉल उत्तम खेळत असत. राष्ट्रीय दर्जाच्या विविध व्हॉलीबॉल सामन्यांत त्यांनी नेत्रदीपक कामगिरी बजावली होती. भारताच्या पहिल्या अधिकृत महिला व्हॉलीबॉल संघाच्या त्या पहिल्या कर्णधार होत्या. त्यांची आणि मिल्खा सिंग यांची प्रथम भेट श्रीलंकेत झाली. त्यांचा प्रेमविवाह १९६२ साली झाला.
पंजाब प्रांताच्या क्रीडा निदेशक (महिला विभाग) म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले. मिल्खा सिंग आणि निर्मल कौर यांचा सुपुत्र चिरंजीव हा आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त गोल्फ खेळाडू आहे. ‘जीव मिल्खा सिंग’ या नावाने तो अधिक ओळखला जातो. ‘पद्मश्री’ पुरस्कार आणि ‘अर्जुन’ पुरस्कार यांनी तो सन्मानित आहे. मिल्खा सिंग आणि निर्मल कौर यांना तीन कन्या आहेत. त्यांपैकी सोनिया ही पेशाने डॉक्टर असून न्यूयॉर्कला असते. ‘द रेस ऑफ माय लाईफ’ हे आत्मचरित्र लिहिण्यासाठी मिल्खा सिंग यांना तिची खूपच मदत झाली होती. मिल्खा सिंग यांचे एकेकाळचे लष्करातले सहकारी आणि परममित्र बिक्रम सिंह हे कारगिल युद्धात, टायगर हिलवर धारातीर्थी पडले, तेव्हा अनाथ झालेल्या त्यांच्या परमजित सिंह नावाच्या मुलाला मिल्खा सिंग यांनी दत्तक घेऊन वाढवले आहे. मिल्खा सिंग यांना ५० वर्षांहून अधिक काळ साथ सोबत देत आलेल्या त्यांच्या पत्नी, निर्मल कौर यांचे अलीकडेच, वयाच्या ८३व्या वर्षी, १३ जून रोजी कोरोनावरील उपचारादरम्यान मोहाली येथील इस्पितळात निधन झाले. त्यावेळी मिल्खा सिंग हे स्वतः चंदिगढ येथील इस्पितळाच्या अतिदक्षता विभागात, कोरोनावर उपचार घेत होते.
आजवर कोणत्याही एतद्देशीय खेळाडूला ‘अॅथलेटिक्स’मध्ये ‘ऑलिम्पिक’ मेडल मिळवता आलेले नाही, ही गोष्ट मिल्खा सिंग यांच्या मनाला कायम खटकत होती. ब्रिटिशांच्या काळात १९०० सालच्या पॅरिस ‘ऑलिम्पिक’मध्ये नॉर्मन गिल्बर्ट प्रिचार्ड या युवकाने २०० मीटर्स आणि २०० मीटर्स (हर्डल्स) या दोन प्रकारच्या धावण्याच्या शर्यतीत भारताला दोन रौप्य पदके मिळवून दिली होती. तो युवक भारतात जन्मला असला तरी तो ब्रिटिश आईबापांच्या पोटी जन्मला होता. स्वातंत्र्योत्तर काळातल्या ‘ऑलिम्पिक’मध्ये ‘अॅथलेटिक्स’ प्रकारात मोडणार्या धावण्याच्या शर्यतीत भारताचे फक्त चार धावपटू अंतिम फेरीत पोहोचले होते. १९६०च्या रोम ‘ऑलिम्पिक’मध्ये मिल्खा सिंग, १९६४च्या टोकियो ‘ऑलिम्पिक’मध्ये गुरुबचन सिंह रंधावा, १९८४च्या ‘लॉस एंजेलिस ऑलिम्पिक’मध्ये पी. टी. उषा आणि २००४च्या ‘अथेन्स ऑलिम्पिक’मध्ये अंजू बॉबी जॉर्ज; परंतु यांच्यापैकी कुणीही पहिल्या तीन क्रमांकात आले नसल्याने त्यांच्या हाती कुठलेही पदक लागले नाही. मिल्खा सिंग यांना हेच शल्य कायम डाचत होते. ‘अॅथलेटिक्स’मध्ये भारताला एक तरी ‘ऑलिम्पिक मेडल’ मिळालेले आपल्याला पाहता यावे, अशी इच्छा ते वारंवार व्यक्त करत असत.
मिल्खा सिंग यांना १९५९ साली राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते ‘पद्मश्री’ प्रदान करून भारत सरकारने गौरवले होते. त्यानंतर तब्बल ४१ वर्षांनंतर त्यांना ‘अर्जुन पुरस्कार’ जाहीर झाला. स्वाभिमानी मिल्खा सिंग यांनी तो स्वीकारण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला. त्या नकाराला त्यांच्याकडे सबळ कारणे होती. ते जेव्हा ‘अॅथलेटिक्स’मध्ये वेगवेगळे विक्रम करत होते, त्याच काळात १९६१ साली ‘अर्जुन पुरस्कार’ द्यायला सुरुवात झाली. पहिल्याच वर्षी नव्वदपेक्षा अधिक खेळाडूंना हा पुरस्कार देण्यात आला, तेव्हा मिल्खा सिंग यांच्या नावाचा विचार झाला नव्हता. त्यानंतर पुढील ४० वर्षांत सुमारे ५००खेळाडू या पुरस्काराचे मानकरी झाले. त्यात मिल्खा सिंग नव्हतेच. मिल्खा सिंग यांच्या कामगिरीच्या तुलनेत फारच कमी कामगिरी केलेल्या अनेक जणांना या पुरस्काराचा मान मिल्खा सिंग यांना पुरस्कार जाहीर होण्यापूर्वी कितीतरी आधी मिळाला होता. या परिस्थितीत वयाची सत्तरी गाठलेले बुजुर्ग आणि स्वाभिमानी खेळाडू मिल्खा सिंग हे ‘अर्जुन पुरस्कार’ न स्वीकारण्याच्या आपल्या निर्णयावर ठाम राहिले. ज्या लष्कराच्या सेवेत असताना त्यांनी भारताला अनेक पदके जिंकून दिली होती, त्या लष्कराने त्यांच्या कर्तृत्वाची वेळीच दखल घेऊन त्यांना सन्माननीय ‘कॅप्टन’चा हुद्दा या आधीच बहाल केला होता.
पंजाब विद्यापीठाने त्यांच्या एका दीक्षांत समारंभात, विद्यापीठाचे कुलगुरू आणि भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते मिल्खा सिंग यांना ‘खेलरत्न’ हा खिताब बहाल केला होता. मुंबईतल्या ‘नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया’च्या शामियानावर संपन्न झालेल्या शानदार समारंभात, ‘इंडिया स्पोर्ट्स अॅवॉर्ड-२०१९’चा ‘जीवन गौरव’ पुरस्कार मिल्खा सिंग यांना प्रदान करण्यात आला. त्यासाठी ‘ऑलिम्पिक’ आणि अन्य जागतिक स्पर्धांमध्ये तब्बल २२ सुवर्ण पदकांचे मानकरी ठरलेले, ‘फिल्ड अॅण्ड ट्रॅक स्पोर्ट्स’मधील विश्वविख्यात अॅथलेट कार्ल लुईस हे अमेरिकेहून खास आले होते.मिल्खा सिंग यांनी आपल्या मुलीच्या मदतीने लिहून प्रसिद्ध केलेल्या ‘द रेस ऑफ माय लाईफ’ या आत्मचरित्रपर पुस्तकाच्या आधारे तयार झालेला ‘भाग, मिल्खा भाग...’ हा हिंदी चित्रपट भारतातच नव्हे, तर इतर अनेक देशांत लोकप्रिय ठरला. या चित्रपटाचे मूळ कथालेखक म्हणून मिल्खा सिंग यांनी नाममात्र एक रुपया मानधन घेतले होते.मिल्खा सिंग हे भारतासाठी अभिमानमूर्ती होते. देश-विदेशातल्या धावपटूंसाठी ते एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक होते. ‘फिल्ड अॅण्ड ट्रॅक स्पोर्ट्स’च्या विश्वातले ते हिमालयाच्या उंचीचे ‘अॅथलेट’ होते. त्यांच्या निधनाने क्रीडाविश्वातले एक अत्यंत चैतन्यदायी, प्रेरणादायी आणि आदरणीय व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड कायमचे गेले आहे.
-प्रवीण कारखानीस