साहित्य संमेलन अध्यक्षपदाचा गौरव वाढविणारे स्वा. सावरकर

    04-Dec-2021
Total Views | 225
 
savrkar 2.jpg_1 &nbs



१९३८ साली मुंबई येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मानदेखील त्यांना प्रदान करण्यात आला. यंदा तर एक सुवर्णयोग जुळून आलेला आहे. त्याच स्वातंत्र्यवीरांच्या जन्मभूमी व कर्मभूमी असलेल्या नाशिकनगरीत मराठी साहित्य संमेलन संपन्न होत आहे. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचा व त्यांच्या साहित्य क्षेत्रातील कामगिरीचा जागर होणे, हे ओघाने आलेच. तसेच ८२ वर्षांपूर्वी त्यांनी अध्यक्षीय भाषणात ज्या अपेक्षा व्यक्त केल्या होत्या, त्या अपेक्षा व आजची परिस्थिती यांचादेखील लेखाजोखा सर्वांसमोर मांडणे अगत्याचे आहे. त्यानिमित्ताने हा लेखप्रपंच...


 
आपणा सर्वांच्या मायबोली मराठी भाषेतील साहित्याचा प्रचार-प्रसार व्हावा, विविध परिसंवाद व्हावेत, चर्चासत्रे व्हावीत व भाषा समृद्धीसाठी आणि साहित्य क्षेत्राच्या वाढीसाठी अखिल भारतीय स्तरावर मराठी ‘साहित्य संमेलन’ आयोजित केले जाते. त्यानुसार यंदा ९४ व्या अखिल भारतीय मराठी ‘साहित्य संमेलना’साठी नाशिक या पुण्यनगरीस यजमान पद मिळालेले असून आपल्या या भूमीत मायबोली मराठीचे साहित्य संमेलन भरते आहे, ही अत्यंत आनंदाची बाब आहे.


 
खरंतर हे संमेलन नाशिक येथे होण्यास आद्य साहित्यिक, कवी, स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जन्मभूमी, कुसुमाग्रज, वसंत कानेटकर या सर्वांचे एक वलय आहे. हे सर्वांना ज्ञात आहेच आहे. त्यापैकीच एक नाशिकचे भूमिपुत्र स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे राष्ट्रीय साहित्यिक, विचारवंत, कवी, लेखक, भाषाशुद्धीकार, उत्कृष्ट वक्ते असे बहुआयामी व्यक्तिमत्व. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकार्‍यांबरोबरच अनेक ग्रंथ, कादंबर्‍या, पोवाडे, काव्यसंग्रह, वार्तापत्रे, इतर पुस्तकांचे अनुवाद, इतिहासलेखन, भाषाशुद्धी सर्व क्षेत्रात अद्वितीय कामगिरी केली.




त्यांच्या या कार्यामुळेच १९३८ साली मुंबई येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मानदेखील त्यांना प्रदान करण्यात आला. यंदा तर एक सुवर्णयोग जुळून आलेला आहे. त्याच स्वातंत्र्यवीरांच्या जन्मभूमी व कर्मभूमी असलेल्या नाशिकनगरीत मराठी साहित्य संमेलन संपन्न होत आहे. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचा व त्यांच्या साहित्य क्षेत्रातील कामगिरीचा जागर होणे, हे ओघाने आलेच. तसेच ८२ वर्षांपूर्वी त्यांनी अध्यक्षीय भाषणात ज्या अपेक्षा व्यक्त केल्या होत्या, त्या अपेक्षा व आजची परिस्थिती यांचादेखील लेखाजोखा सर्वांसमोर मांडणे अगत्याचे आहे. त्यानिमित्ताने हा लेखप्रपंच...


साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळणे म्हणजेच त्या साहित्यिकाने साहित्यक्षेत्रात दिलेल्या मोलाच्या योगदानाचा सर्वोच्च गौरव असतो. असे असताना देखील जेव्हा सावरकरांची अध्यक्षपदावर निवड करण्यात आली, तेव्हा ’ज्ञानप्रकाश’ या वृत्तपत्रात असे म्हटले गेले होते की, “स्वातंत्र्यशाहीर सावरकरांना अध्यक्षपद देऊन त्यांचा गौरव करण्यात आलेला नसून, त्यांच्या नियुक्तीने साहित्य संमेलन अध्यक्षपदाचा गौरव झालेला आहे.”


संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने परंपरेप्रमाणे अध्यक्षीय भाषण छापणे आवश्यक असल्याने, तेव्हा मोजक्या पाच दिवस आधी आयोजकांनी तात्यारावांची भेट घेऊन अध्यक्षीय भाषण लिहायला सांगितले. त्यानुसार त्यांनी अनेक सहकार्‍यांच्या सूचना मागवून अवघ्या चार दिवसांत ४५ पृष्ठांचे अध्यक्षीय भाषण लिहून तयार केले. हेच भाषण पुढे नभोवाणीवरून देखील प्रसारित करण्यात आले. त्यांचे हे भाषण विशेषतः तरुणांनी ‘लेखण्या मोडून, बंदुका हाती घ्याव्यात’ या प्रचंड हलकल्लोळ माजविणार्‍या वाक्यामुळे प्रचंड गाजले. परंतु, या भाषणातील अनेक महत्त्वपूर्ण उल्लेख हे अजूनही काही प्रमाणात दुर्लक्षितच राहिले आहेत.

 
 
सर्वसाधारणपणे अध्यक्ष हे साहित्य क्षेत्रातील चांगल्या गोष्टींबद्दल आपले मत प्रदर्शित करणे, त्यावर ऊहापोह करणे, काही विषयांवर संवाद घडविणे व साहित्य क्षेत्रासाठी शुभेच्छापर भाषणे करीत असत. परंतु, या सर्व गोष्टींना न छेदतील ते सावरकर कसले? आणि घडलेही तसेच! त्यांनी सुरुवातीलाच सांगून टाकले, “कुणाला प्रिय वाटो अथवा नवा वाटो, मी साहित्यविषयक सुधारणांवर बोलणार आहे आणि सांगणार आहे.” असे सांगून त्यांनी तसेच केलेही! त्याचप्रमाणे तात्यारावांनी ‘भाषाशुद्धी’सारख्या विषयाचा आपल्या भाषणात समावेश करू नये, अशी अनेक ज्येष्ठ सहकार्‍यांनी इच्छा व्यक्त केली असतानाही, सर्वांचा विरोध डावलून भाषाशुद्धीबाबत अत्यंत परखडपणे व मार्मिकपणे सावरकरांनी आपले विचार संमेलनामध्ये मांडले.




अनेक क्रियापदांच्या मागे शब्द लावावे लागतात ते आपण बदलायला हवे, त्याचप्रमाणे देवनागरी लिपीला राष्ट्रीय लिपीचे सर्वोच्च स्थान प्राप्त करून देण्यासाठी व तिला इंग्रजीपेक्षाही मुद्रणसुलभ, शास्त्रशुद्ध व शिक्षण सुलभ करण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवे, असे सांगून त्यासाठी त्यांनी भाषाशुद्धीची दोन महत्त्वाची सूत्रेदेखील या भाषणात सर्वांसमोर मांडलेली होती. त्याचप्रमाणे ‘संस्कृतनिष्ठ परिभाषा’ ठाम करण्याचे कार्य या परिषदेने करण्यासाठी अहोरात्र झटावे, असा मोलाचा सल्लादेखील त्यांनी सर्वांना दिला. मराठी भाषेच्या विकासासाठी व प्रगतीसाठी महाराष्ट्र विद्यापीठाची अत्यंत आवश्यकता असून ते पुणे येथे करणे आवश्यक असल्याचे, तसेच त्यासाठी एक मोठी चळवळ उभारून हे कार्य तडीस नेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगून, त्याचे महत्त्वदेखील सर्वांना पटवून दिले होते. त्याचप्रमाणे मराठी भाषा जागतिक स्तरावर जाण्यासाठी साहित्यिकांनी चांगल्या मराठी ग्रंथांचे इंग्रजी व अन्य भाषांमध्ये भाषांतरेदेखील करायला हवीत, अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली होती.


 
या भाषणाच्यावेळी त्यांनी जेव्हा ‘साहित्य’ व ‘शस्त्र’ या दोन विरुद्ध टोकाच्या गोष्टींचे मिश्रण करून व त्यास ऐतिहासिक संदर्भ देऊन त्याची आवश्यकता प्रतिपादित केली, तेव्हा खर्‍या अर्थाने त्यांच्यातील क्रांतिकारक साहित्यिक सर्वांनी डोळे भरून अनुभवला असेल. तेव्हा त्यांनी असे म्हटले की, “आपले हे एवढे विस्तीर्ण भारतीय राष्ट्र जगात एक निर्माल्यवत होऊन पडले आहे, ते आपले साहित्य उणे म्हणून नव्हे, तर आपले शस्त्रबळ उणे म्हणून. ही गोष्ट साहित्यिकहो सर्वात आधी तुमच्या लक्षात यायला हवी. म्हणून सगळ्यात आधी तुम्हीच गर्जुन उठा की, आजच्या परिस्थितीत आमचे राष्ट्रीय साहित्य म्हणजे शस्त्रबळ, साहित्य चर्चा नव्हे; जे थोडेबहुत साहित्य हवे ते चाळीशी पुढे गेलेले लोकही पुरवतील. परंतु, जे तरुण, ज्या तरुणी, तसेच जी पाठीचा कणा ताठ असलेली पिढी आहे, त्यांना माझा असा आदेश आहे की, राष्ट्रास आज साहित्यिक नकोत, सैनिक हवेत! राष्ट्र रक्षणार्थ प्रथम ‘रायफल क्लब’मध्ये घुसा!! रडगाण्यांच्या आणि रडकथा यांच्या साहित्य संमेलनात नंतर वेळ मिळाल्यास साहित्यासाठीसुद्धा आज साहित्याच्या पोथ्या गुंडाळून सैन्याच्या शिबिराकडे वळले पाहिजे. कारण जे राष्ट्र खुरटे, दुबळे त्यांचे साहित्यही खुरटे व दुबळे असणार. ज्या दुबळ्यांच्या राष्ट्राला परक्यांची प्रबळ दारू आग लावते!





शिवरायांनी देखील ‘युगधर्म’ ओळखून सरस्वतीच्या रक्षणार्थ सरस्वतीकडे काही काळ पाठ फिरवून शुंभ-निशुंभ मर्दिनीची उपासना केली. लेखणी टाकून भवानी उचलली; म्हणून तर आज सारस्वत महाराष्ट्र जीवंत दिसतो आहे. म्हणूनच सावरकरांनी तरुणांना आवाहन केले होते की, “तुम्हीही लेखण्या मोडा आणि बंदुका हाती घ्या. भलेही पुढील दहा वर्षे सुनीते रचणारा तरुण निर्माण झाला नाही, वेळप्रसंगी साहित्य संमेलने झाली नाहीत तरी चालतील. परंतु, दहा हजार वीर सैनिकांचा चमू खांद्यावर नवीन बंदुका टाकून राष्ट्राच्या मार्गातून व शिबिरातून टप-टप करीत संचलन करताना दिसायला हवा.” ग्रंथालयांसारखी सैनिकी विद्यालय व्हावीत, असे प्रखर व देशभक्तीचे, राष्ट्राला नवी दिशा देणारे विचार सावरकरांनी साहित्य संमेलनात मांडून आज ८० वर्षांपेक्षा अधिक कालावधी उलटून गेलेला आहे. त्यामुळे त्यांच्या या कर्मभूमीत साहित्य संमेलनाच्या माध्यमातून त्यांच्या या राष्ट्रासाठी पूरक असलेल्या विचारांची पुन्हा एकदा उजळणी होणे आवश्यक आहे.



ज्याप्रमाणे स्वातंत्र्यवीरांनी अध्यक्षपदावर असतानाही समाजाला आवडेल, जनतेला आवडेल, साहित्यिकांना आवडेल, त्यांना रुचेल व आपली वाहवा होईल, या उद्देशाने आपले विचार न मांडता देशासाठी, समाजासाठी, साहित्यासाठी, भाषाशुद्धीसाठी, राज्याच्या विकासासाठी आवश्यक असणारे परखड विचार, भलेही ते कुणाला आवडो अथवा न आवडो, त्यांनी अत्यंत स्पष्टपणे व कोणत्याही टीकाटिप्पणीचा विचार न करता मांडले आणि त्यातून खरोखरच देशाला व समाजाला एक नवी दिशा प्राप्त झाली. आजही त्यांचे विचार अनेक वर्षांनंतर सिद्ध झाल्याचे आपण पाहतो आहोत. म्हणूनच सावरकरांची अध्यक्षपदी नेमणूक केल्यानंतर तो त्यांचा कलेचा गौरव नसून साहित्य संमेलनातील अध्यक्षपदाचा तो गौरव असल्याचे खर्‍या अर्थाने सिद्ध झाले होते. वर्तमान आणि भविष्यातही साहित्य संमेलनात साहित्यिकांनी यातून बोध घेतला, तर खर्‍या अर्थाने साहित्य संमेलन संपूर्ण होईल.



- मंगेश कचरू मरकड








 
 
अग्रलेख
जरुर वाचा
डिजिटल व्यवहारविश्वात हवे सायबर खबरदारीचे भान

डिजिटल व्यवहारविश्वात हवे सायबर खबरदारीचे भान

जगभरात भारताच्या डिजिटल प्रगतीची प्रशंसा केली जाते. ‘युनिफाईड पेमेंट इंटरफेस’ (यूपीआय)ची सेवा जगभरातील काही देशांनी स्वीकारली आहे. भारताची डिजिटल क्षेत्रातील ही प्रगती विकसित भारताच्या दिशेने टाकलेले हे स्मार्ट पाऊल म्हणावे लागेल. मोदी सरकारला नुकतीच ११ वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, सरकारच्या अनेक उपलब्धींपैकी एक असलेल्या डिजिटल व्यवहार प्रणालीचेही विशेषत्वाने कौतुक करण्यात आले. पण, अशापद्धतीने व्यवहार करताना बँक ग्राहकांनी ‘यूपीआय’ आणि ‘डिजिटल वॉलेट’ पेमेंट सिस्टममधील फरक समजून घेण्याबरोबरच खबरदारी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121