संत हे नाव उच्चारलं की डोळ्यांपुढे उभी राहते, ती पंढरीची वारी, आळंदीच्या घाटांवर वाहणारी भावनांची लाट, पैठणच्या गोदातीरी उमटलेली भक्तीची आर्त हाक आणि देहूच्या वाळवंटात उमललेली ज्ञानेश्वरीची फुले. संतांच्या चरणांनी पावन झालेली ही महाराष्ट्र भूमी म्हणजे भक्तिरसाने न्हालेली एक अखंड तपश्चर्येची वाटचाल. विठ्ठलाच्या नामस्मरणात हरवलेल्या या संतांचं जीवन सुख-समृद्धीचं नव्हतं. त्यांना रोज कष्टाचा डोंगर आणि समाजाच्या अवहेलनेचा काटेरी मार्ग पार करावा लागायचा. पण तरीही, कडक उन्हात सावली बनावं, तसं विठूनामाचा आधार त्यांच्या प्रत्येक श्वासात सामावलेला असायचा.
संतकुळात जन्मलेले निवृत्तीनाथ, सोपानदेव, संत ज्ञानेश्वर आणि संत मुक्ताबाई यांचे जीवन म्हणजे त्याग, तपश्चर्या आणि कठोर संघर्षाची अखंड साक्ष. बालवयातच अपमान, उपेक्षा आणि समाजाच्या अन्यायकारक रूढींना सामोरे जात, त्यांनी आध्यात्मिक साधनेच्या वाटेवर अविचलपणे वाटचाल केली. या संत बंधु-भगिनींनी केवळ आत्मोद्धाराचाच नव्हे, तर समस्त समाजाच्या उन्नतीचा मार्ग शोधून दिला.
उचला रे वारकरी हो,
टाळ चिपळ्या मृदुंग पताका
बोलवतो विठू हरी,
नाम नामात दंग होऊनी
वेढा रे वेढा पंढरी, वेढा रे वेढा पंढरी
॥राम कृष्ण हरी॥
त्यांच्या या विठ्ठलमय जीवनप्रवासाला अधिक व्यापकपणे भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न प्रसिद्ध दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी केला आहे. ’संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी ज्ञानेश्वरीतून वाहणार्या भक्ती, प्रेम आणि त्यागाच्या अमृतसिंधूला चित्रभाषेत उतरवले आहे.
चित्रपटाची कथा उलगडू लागते ती पवित्र आळंदी नगरीतून, जिथे प्रत्येक वारकरी आपापल्या दैनंदिन कार्यांत मग्न असतो. परंतु, अंतःकरणात अखंड विठ्ठलभक्तीची धून चालू असते. अशाच एका सकाळी वयोवृद्ध यशोदा हळूहळू चालणार्या स्मृतिप्रवासीसारखी आपल्या काठीच्या आधाराने मंदिराकडे वाटचाल करत असते. परंतु, अचानक आकाशाचं रुप पालटतं. निळसर आभाळ काळ्या घोंगडीसारखं पसरत जातं आणि अंगावर आदळणारा मुसळधार पाऊस संपूर्ण परिसर व्यापून टाकतो. पावसाच्या त्या गर्जनेत यशोदा मंदिराच्या आधाराने थबकते. तिचं मन आभाळाकडे पाहताना एका खोल आठवणीत हरवून जातं.
त्या क्षणातच प्रेक्षकांच्या नजरेसमोर उलगडते, ती चार तेजस्वी भावंडांची निवृत्ती, सोपान, ज्ञानेश्वर आणि मुक्ताई यांची विलक्षण आणि प्रेरणादायी जीवनगाथा.
‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटात समीर धर्माधिकारी, मृणाल कुलकर्णी, अजय पुरकर, मनोज जोशी, योगेश सोमण, अवधूत गांधी, स्मिता शेवाळे, साहिल धर्माधिकारी, मानस बेडेकर, अभिर गोरे, ईशमिता जोशी, तेजस बर्वे, अक्षय केळकर, नेहा नाईक आणि इतर कलाकारांची मांदियाळी दिसून येते. समीर विठ्ठलपंत आणि मृणाल रुक्मिणी यांच्या अभिनयातला सच्चेपणा केवळ वाक्यांतून नाही, तर डोळ्यांमधून व्यक्त होणार्या भावनेतून दिसून येतो. संत ज्ञानेश्वरांची भूमिका साकारणार्या तेजस बर्वेने वाचिक, आंगिक अभिनयावर घेतलेली मेहनत स्पष्ट दिसून येते. नेहा नाईक हिने मुक्ताईची भूमिका साकारली असून, ‘मुक्ताई’ या शब्दाचा अर्थ जी केवळ आईप्रमाणे माणसांना, पशु-पक्ष्यांना, वनस्पतींना माया लावणारी आई म्हणजेच ’मुक्ताई’. स्पष्ट उच्चार, आवजातला चढ-उतार, शब्दफेक त्याप्रमाणे केलेले हावभाव पाहताना नेहाने हे पात्र केवळ चित्रपटापुरते साकारलेले नसून, ती ते आयुष्य जगली आहे, हे दिसून येते.
या चित्रपटातील शेवटचा प्रसंग विशेष अधोरेखित करावासा वाटतो. जेव्हा संत ज्ञानेश्वर संजीवन समाधी घेतात, तेव्हा संत कान्होपात्रा, संत चोखोबा, गोरा कुंभार, संत सावता महाराज, संत नरहरी सोनार, संत विसोबा खेचर हे सगळे एकत्र येऊन अभंग गात ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी शरण जातात, तो प्रसंग पाहताना हृदय पिळवटून निघते. आता कुठे चारही भावंडांना सन्मानाने जगायला मिळणार होते; इतक्यात ‘आपले कार्य एवढेच’ म्हणत चारही भावंडे समाधी घेतात, तो प्रसंग पाहताना अश्रू अनावर होतात आणि इथे विजय होतो, तो प्रत्येक कलाकाराचा आणि त्यांच्या अभिनयाचा!
चित्रपटातली कथा, अभिनय जेवढे आपल्याला विषयाच्या जवळ नेतात, त्याहून अधिक चित्रपटाच्या पार्श्वसंगीतातून आनंद, दुःख, वीर, शांत, रौद्र या रसांचा अनोखा परिचय होतो. ‘कानोबा, कानोबा...’ हे गाणं सुरू होतं आणि त्याच क्षणी आपल्या काळजावर एक हलकी फुंकर मारल्यासारखं वाटतं. अवधूत गांधी यांचा आवाज म्हणजे एक विशुद्ध आध्यात्मिक साद. त्याच्या गूढ, भावनांनी भरलेल्या स्वरांनी जणू आपल्याला आळंदीच्या पवित्र मातीमध्ये अलगद उतरवलं जातं. त्या आलापात आणि स्वरात इतकी शक्ती आहे की, डोळे मिटले तरी त्या ओव्यांमधून उभं राहतं एक संपूर्ण विश्व, विठोबाचं, माऊलीचं आणि मुक्ताईचं. अवधूत गांधी यांचा आलाप जसा खोलवर जातो, तसतसं आपल्याला केवळ गाणं ऐकतोय असं वाटत नाही, तर तो एक अनुभव बनतो, गूढतेने आणि भक्तीने भारावलेला. हा अनुभव म्हणजे केवळ चित्रपटाची सुरुवात नाही, तर त्या आध्यात्मिक यात्रेचा शुभारंभ आहे. जिथून मुक्ताईच्या जगातला प्रवेश सुरू होतो. तिच्या वेदनेपासून ते तिच्या ‘ज्ञाना’पर्यंतचा प्रवास!
या संतप्रवासाची निर्मिती करताना ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटातील छायाचित्रण आणि संपादन खरोखरीच कौतुकास्पद केले आहे, असे म्हणण्यात काही वावगे ठरणार नाही. संपादनात ‘व्हीएफएक्स’ मुख्य विषयाला अजिबात बाधा आणत नाही.
आपल्या खोट्या अहंकारापुढे विसोबा आणि 1 हजार, 400 वर्षे आयु असणारे चांगदेव महाराजदेखील त्या तेजस्वी भावंडांच्या चरणी जातात. इथे एक संदेश मिळतो की, स्वतःप्रमाणे देवाशीसुद्धा प्रामाणिक राहिले की, सत्याच्या बळावर संपूर्ण जग जिंकता येते, ते असे. पण आपल्या भावनांवर, इंद्रियांवर ताबा मिळवणे फार गरजेचे आहे. ते शक्य झाले, तर या महाराष्ट्रभूमीत पुनः एकदा ’संतनगरी’ निर्माण होईल, हे मात्र खरं...
लेखक आणि दिग्दर्शक : दिग्पाल लांजेकर
कलाकार : समीर धर्माधिकारी, मृणाल कुलकर्णी, अजय पुरकर, मनोज जोशी, योगेश सोमण, अवधूत गांधी, स्मिता शेवाळे, साहिल धर्माधिकारी, मानस बेडेकर, अभिर गोरे, ईशमिता जोशी, तेजस बर्वे, अक्षय केळकर, नेहा नाईक आणि इतर