मराठी विश्वकोशाच्या पहिल्या महिला अध्यक्षा, चतुरस्र लेखिका व अवघ्या महाराष्ट्राच्या लाडक्या साहित्यिका डॉ. विजया वाड यांना १८ जानेवारी रोजी वयाची ८० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा परिचय करुन देणारा हा लेख...
शरद पौर्णिमेच्या शीतल चांदण्यासारखे पवित्र ज्ञान डॉ. विजया वाड यांच्या अमृततुल्य शब्दांतून सतत प्रसृत होत असते. लेखनासाठी आवश्यक असलेले शब्द हाच त्यांचा श्वास आहे, असे त्या म्हणतात. त्यामुळेच ते कागदावर सरसर उतरतात. आपण शिक्षिका झाल्यामुळेच आपले जीवन सार्थकी लागले, असे त्यांना वाटते व शिक्षक असल्याचा त्यांना मनस्वी अभिमानही आहे. विद्यार्थ्यांच्या उमलत्या वयाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन अतिशय सकारात्मक आहे. माणसाचे रुप नव्हे, तर त्याचे कर्तृत्वच त्याला खरी ओळख मिळवून देते, हा विचार स्वतःच्या उदाहरणाने पटवून देतात. मातृभाषेचा कधीच न्यूनगंड बाळगू नका, तर मातृभाषेतूनच शिक्षण घ्या, असे विद्यार्थ्यांना ठणकावून सांगतात. त्यांच्या लिखाणातून नेहमीच कोणता न कोणता संस्कार वाचकांच्या मनावर होत असतो. शिक्षिका म्हणून व लेखिका म्हणूनही त्यांनी नवीन पिढी घडविण्याचे महत्त्वाचे काम केले आहे. आणि त्यांचे अजूनही एक सांगणे आहे की, ज्यांचे मुलांवर प्रेम आहे, त्यांनीच शिक्षक व्हावे, अन्यथा नाही. डॉ. विजया म्हणतात की, दुसर्याचं दुःख न बघवणं, हा संस्कार आहे व आपण त्यासाठी काय करू शकतो, हा विचार रुजवला की या विचारातूनच विद्यार्थ्यांत माणुसकीचा संस्कार होतो व तेथूनच माणुसकी जपणं सुरू होतं. हा संस्कार शिक्षिका म्हणून कृतीतून, वक्तृत्वातून व लेखनातून करण्याचा त्यांनी सतत प्रयत्न केला आहे. सर्वांप्रति जिव्हाळा हे त्यांच्या यशस्वीतेचे गमक आहे.
स्त्रियांना कर्तृत्वाची संधी मिळालीच पाहिजे, तिला धडपडू द्या. स्वतः व्यक्त होऊ द्या. तिला स्वतःला उमलायचं असतं,फुलायचं असतं म्हणून तिच्या सुप्त गुणांना वाव मिळेल, अशी संधी द्या. समर्थ स्त्री ही राष्ट्राची अर्धीशक्ती आहे. विद्यार्थीप्रिय शिक्षिका व प्रथितयश साहित्यिका म्हणून त्यांचा खूप नावलौकिक आहे. बाल साहित्यकार म्हणूनही त्यांची विशेष ओळख आहे. त्यामुळेच बालकुमार साहित्य संमेलनाच्या २००७च्या त्या अध्यक्षा होत्या. ‘आकाशवाणी व दूरदर्शन यांचे शालेय शिक्षणातील स्थान’ या विषयात त्यांना ‘डॉक्टरेट’ मिळाली आहे. आकाशवाणी व दूरदर्शनवर त्यांच्या कथांवर आधारित चित्रपट तयार झाले आहेत. मराठी भाषा प्रकल्प, भाषाशुद्धी प्रकल्प, प्रमाणभाषा प्रकल्प, वाचनवेग प्रकल्प असे अनेक प्रकल्प त्यांनी विद्यार्थ्यांसाठी राबविले. गतिमान काळाची पाऊले ओळखून बालकोशही त्यांनी ऑडिओ स्वरुपात तयार केला व नवीन पिढीसाठी खुला केला. ‘सावित्रीच्या लेकी’ यामध्ये अनेक कर्तृत्ववान स्त्रियांच्या कार्याचा आलेख मांडला आहे. त्यांच्या अनेक पुस्तकांना महाराष्ट्र सरकारचे व इतरही अनेक पुरस्कार मिळाले आहेत. कारण, त्यांची साहित्यसंपदाच फार मोठी आहे. डॉ. वाड या मराठी विश्वकोशाच्या माजी अध्यक्षा आहेत. त्यांच्या कार्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष गौरव करून सन्मानित केले.
डॉ. विजया वाड यांनी काळाची वेगवान पाऊले वेळीच ओळखली होती. डिजिटायझेशनचे युग असल्यामुळे आणि नवीन पिढीपर्यंत विश्वकोशाची माहिती पोहोचावी, म्हणून त्यांनी एक ते १७ खंडांची सीडी तयार केली. शिवाय, त्यांच्याच कारकिर्दीत विश्वकोशाचे संकेतस्थळही तयार झाले. विश्वकोश हा कोषातच न राहता, तो विश्वव्यापी व्हावा, म्हणून ‘विश्वकोश ग्रंथवाचन स्पर्धा’ व्यापक प्रमाणात आयोजित केल्या. शाळा, महाविद्यालये, पोलीस खाते, हरसुल जेल अशा १८० ठिकाणी ‘विश्वकोश ग्रंथवाचन स्पर्धा’ घेतल्या. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोकांनी विश्वकोश विकत घेतले. अशा प्रकारे विश्वकोश कोषातून बाहेर येऊन सार्वजनिक झाला. हा विश्वकोश १०५ देश व १५ लक्ष लोकांनी वाचला, ही खूप मोठी सफलता होती. त्यासाठी डॉ. विजया वाड यांनी अपार परिश्रम घेतले. त्यासाठी त्यांना त्यांचे पती विजय वाड यांनी खूप प्रोत्साहन दिले. एक ते १७ खंडांच्या (विश्वकोशाच्या) सीडी तयार केल्याबद्दल त्यांना महाराष्ट्र सरकारचा ‘ई-गव्हर्नन्स पुरस्कार’ मिळाला आहे. तसेच, ‘कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया’चा राष्ट्रीय पुरस्काराही प्राप्त झाला आहे. शिवाय, मंथन आशियाई मानांकनही मिळाले आहे. त्याबद्दल डॉ. विजया वाड यांचे सर्व स्तरांवरून खूप कौतुक झाले.
श्रीलंकेतील ‘इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ कॉम्प्लिमेंटरी मेडिसिन’ या संस्थेतर्फे ‘डी.लिट’ ही पदवी त्यांना २०१८ मध्ये सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आली. सामाजिक बांधिलकी जपणार्या विजया यांनी सामाजिक क्षेत्रातही अंध, कर्णबधीर आणि आदिवासी विद्यार्थ्यांसाठी खूप मोठे कार्य केले आहे. दरवर्षी एक हजार आदिवासी विद्यार्थिनींना त्या दत्तक पालक मिळवून देण्याचे मोठे कार्य करतात. बालक-पालक समुपदेशन, माता मेळावे, यशाचे रहस्य या विषयांवर त्यांनी भारतासह १४ देशांमध्ये व्याख्याने दिली आहेत. त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून किंवा एक पाऊल पुढेच म्हणता येईल, असे कार्य त्यांची धाकटी कन्या व सर्वगुणसंपन्न अभिनेत्री डॉ. निशिगंधा करीत आहे. १९९५ साली त्यांनी उदयाचल हायस्कूल, विक्रोळी येथे असताना त्यांनी ‘स्वच्छ सुंदर हिरवे विक्रोळी स्थानक’ हा पर्यावरण प्रकल्प राबवला. या प्रकल्पाला कॅथे पॅसिफिक एन्व्हरायमेंट वार्डने गौरविण्यात आले. मराठी बालकुमार साहित्याचा त्यांना जीवनगौरव पुरस्कार मिळाला. दुसर्यांना सतत आनंद वाटणार्या डॉ. विजया वाड यांचा प्रवास असाच आनंददायी व्हावा व आम्हालाही आनंदाची पर्वणी अशीच मिळत राहो, हीच सदिच्छा. आणि त्यांना यापुढे आरोग्य संपन्न दीर्घायु लाभो, हीच प्रार्थना.
स्वाती वैद्य