भाजपची ताकद सध्या वाढलेली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मनात आगामी निवडणूक स्वबळावर लढण्याची इच्छा आहे. भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. कार्यकर्त्यांच्या इच्छा आणि परिस्थितीनुसार नेतृत्वाने घेतलेला निर्णय या सर्वांचा परिपाक म्हणजे भाजपचा महापौर महापालिकेत बसेल, असा विश्वास भाजपचे आजी आणि माजी जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी आणि शशिकांत कांबळे यांनी व्यक्त केला.
⦁ भारतीय जनता पक्षाला केंद्राप्रमाणे राज्यातही घवघवीत यश मिळाले. तुमच्या मते या यशाचे गमक काय आहे?
- भाजपने केंद्रात आणि राज्यात घवघवीत यश मिळविले आहे. हे यश पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विधानसभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर जनतेने विश्वास ठेवल्यामुळे मिळाले आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात ‘फेक नॅरेटिव्ह’ पसरविला जात होता. लोकसभा निवडणुकीच्या काळात चुकीच्या पद्धतीने भाजपला बदनाम करण्यात आले. भाजपची सत्ता देशात आली, तर देशाचे संविधान बदलतील किंवा आरक्षण रद्द करतील, असे पसरविण्यात येऊ लागले. दरम्यानच्या काळात जनतेच्या ही गोष्ट चुकीची असल्याचे लक्षात आले. गेली दहा वर्षे बहुमतात असलेल्या पक्षांनी संविधान बदलण्याची भाषा कधीही केली नाही. संविधानाचा सन्मान हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. चुकीच्या पद्धतीचे काम फार दिवस टिकत नाही. तसेच खोटे फार काळ टिकले नाही. लोकसभेचे खोटे विधानसभेपर्यंत टिकले नाही. भाजपच्या कार्यकत्यांनी रा. स्व. संघाच्या सेवकांनी केलेली मेहनत फळाला आली.
⦁ ‘कल्याण-डोंबिवली महानगरपालिका’ निवडणुकीत भाजपचे जिल्हाध्यक्ष नात्याने आपले उद्दिष्ट काय असणार आहे?
- ‘कडोंमपा’त भाजपचा महापौर बसविणे हेच मुख्य उद्दिष्ट आहे. भाजपची ताकद वाढलेली आहे. कार्यकर्त्यांच्या मनात ऊर्जा निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा महापालिका निवडणूक स्वबळावर लढली पाहिजे आणि त्यांची तयारी कार्यकर्ते स्वतःहून करतात. संघटन पर्वाच्या माध्यमातून ‘शतप्रतिशत भाजप’ अशी वाटचाल सुरू आहे. भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. त्यामुळे भाजपमध्ये कार्यकर्त्यांच्या भावना आणि नेतृत्वाने घेतलेला निर्णय यांची सांगड घालून निर्णय परिस्थितीनुसार घेतला जाईल. पण, महापालिकेत महापौर हा भाजपचाच बसेल.
⦁ कल्याण-डोंबिवलीत भाजपची किती सदस्य नोंदणी आतापर्यंत झाली आहे?
- आतापर्यंत जिल्ह्यात दीड लाख सदस्य नोंदणी झाली आहे. यापुढेही सदस्य नोंदणी सुरू राहणार आहे. आमचे उद्दिष्ट ३ लाख, ५० हजार सदस्यांचे आहे. भाजपचे सर्व कार्यकर्ते हे उद्दिष्ट पूर्ण करतील, असा विश्वास आहे.
⦁ महायुतीमध्ये ठाणे जिल्ह्यात भाजप मोठा भाऊ बनला आहे, आगामी पालिका निवडणुकीत जागावाटपामध्ये त्याचा कसा फायदा होईल?
- निवडणुका आल्यानंतर भाजपला जागावाटपात कसा फायदा होईल, ते समजेल. नेतृत्वाने घेतलेल्या निर्णयाचा सन्मान करणारा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. कार्यकर्त्यांचा विश्वास असेल की, स्वबळावर निवडणूक जिंकू शकतील, तर त्याचा सन्मान नेतेही करतील. जो निर्णय सर्वानुमते ठरेल, त्यानुसार कार्यकर्ते नेत्याचा आदेशसुद्धा मानतात. या सगऴ्यांची सांगड घालून अंतिम सत्य महापालिकेत भाजपचा महापौर बसविणे, हेच असेल.
⦁ अद्याप महापालिकेत हरिश्चंद्र पाटील वगळता एकही व्यक्ती भाजपची महापौर झाली नाही. मग यावेळी नेमकी कोणती रणनीती असणार आहे?
- भाजपचा महापौर महापालिकेत बसेल, हीच रणनीती असणार आहे. युती म्हणून असलो, तरी त्यात काही करार असतात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपचा महापौर ‘कडोंमपा’त बसेल, असा शब्द दिला होता. तो शब्द आता ते पूर्ण करतील. त्यांचा आम्हाला पाठिंबा मिळेल.
⦁ ‘संविधान गौरव अभियान प्रदेश समिती’च्या महामंत्री आणि अनुसूचित जाती मोर्चाच्या सहसंयोजकपदी आपली नुकतीच नियुक्ती झाली आहे? त्याविषयी काय सांगाल?
- काँग्रेसने आतापर्यंत परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांचा फक्त वापर केलेला आहे आणि त्यांचा वापर करूनच मतांचे राजकारण केलेले आहे. त्यामुळे लोकसभेमध्ये ‘फेक नॅरेटिव्ह’ सेट करून त्यांनी भारतीय जनता पक्ष घटना बदलणार, असा खोटा अपप्रचार केला आणि काही प्रमाणात त्या गोष्टीला जनताही बळी पडली. परंतु, ज्यावेळेस लक्षात आले की, आपण लोकसभेला चूक केली आहे काँग्रेसला मतदान करून, त्यावेळेस येणार्या विधानसभेमध्ये आपण संविधानाचा गौरव करणार्या भारतीय जनता पक्षालाच निवडून द्यायचे, असा चंग महाराष्ट्रातील मतदारांनी बांधला होता आणि म्हणून खूप मोठ्या प्रमाणात विजय महाराष्ट्रामध्ये महायुतीला मिळाला. लोकांच्या मनामध्ये शंका अशी होती हे लोकसभेत चालवलेले मुद्दे नगरपालिकेला पण चालवतील आणि घटना बदलतील. घटना बदलतील, असा प्रचार करतील, त्यामुळे काँग्रेसला मतदान करायचे नाही, असे मतदार राजांनी ठरवले होते.
आता महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने ज्या प्रमाणात ‘संविधान गौरव अभियान’ चालू केले आहे, त्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी सर्व जातीधर्मांतील नागरिक सहभागी झालेले आहेत आणि परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांचा गौरव भारतीय जनता पक्षच करतो, बाबासाहेबांचा सन्मान भाजपच करतो, हे लोकांना पटलेले आहे. किंबहुना, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे नवीन संसद भवन आहे, त्यालासुद्धा ‘संविधान सदन’ असे नाव दिले. यावरून परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांचा खरा सन्मान कोण करतात, हे जनतेच्या लक्षात आले. दि. २६ नोव्हेंबरला ‘संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो. तोही नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्येच साजरा करण्यास सुरुवात झाली. अशा अनंत गोष्टी ज्या परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांचा गौरव आणि सन्मान वाढवणार आहेत, त्या भारतीय जनता पक्षाने आणि नेतृत्वाने केले. परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर इंग्लंडमध्ये ज्या ठिकाणी शिक्षण घेत होते, ज्या ठिकाणी राहात होते, ते घर काँग्रेसच्या काळात लिलावात निघाले होते. परंतु, देवेंद्रजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना ते घर आपण मिळवले. अनेक गोष्टी इथे सांगता येतील. काँग्रेस चुकीच्या गोष्टी पसरवत आहे. त्यासाठी भाजपच्या पक्षनेत्यांनी ठरविले की, ‘संविधान गौरव समिती अभियान’ पुन्हा एकदा कार्यरत करावे. त्यासाठी दि. ११ जानेवारी ते दि. २६ जानेवारीपर्यंत सर्व वस्ती, महाविद्यालयात जाऊन ‘संविधान गौरव समिती’चे कार्यक्रम होणार आहेत.
⦁ भारतीय जनता पक्षाने देशभरात ‘सदस्यता नोंदणी अभियान’ सुरू केले आहे. कल्याण-डोंबिवलीत त्याला कसा प्रतिसाद मिळतो आहे?
- महाराष्ट्रभर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली ‘सदस्यता नोंदणी अभियान’ सुरू झाले. तसे हे ‘सदस्य नोंदणी अभियान’ यापूर्वीच झाले आहे. महाराष्ट्रात निवडणुका असल्याने थोडाफार अवधी दिला होता. विधानसभा निवडणुका झाल्यानंतर हे ‘सदस्य नोंदणी अभियान’ पुन्हा सुरू झाले आहे. महाराष्ट्रात संघटन पर्वाचे प्रभारी म्हणून रविंद्र चव्हाण यांची निवड झाली आहे. त्यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात संघटनात्मक बैठका घेऊन, प्रत्येक नेत्याला बोलावून प्रत्येक मोर्चा आघाडीला प्रकोष्ठाच्या बैठका घेतल्या. युवा मोर्चाला महाराष्ट्रात २५ लाखांचे लक्ष्य आहे. महिला मोर्चाला २५ लाख सदस्य नोंदणीचे लक्ष्य आहे. त्यामुळे प्रत्येक घरोघरी जाऊन ऑनलाईन सदस्य नोंदणी करत आहेत. मोबाईलवर अर्ज भरून सदस्य होणार आहे. कल्याण, डोंबिवली आणि अंबरनाथ येथे मोठ्या प्रमाणात ‘सदस्य नोंदणी अभियान’ सुरू आहे. भाजप एक परिवाराचा पक्ष नाही. हजारो लाखो कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. कर्तृत्व चांगले असेल, तर भाजप तुम्हाला न्याय देतो. कार्यकर्त्यांलर फक्त काम करणे माहीत असते. काँग्रेसमध्ये सरंजामशाही आहे. तसे भाजपमध्ये नाही.
⦁ केंद्रात आणि राज्यातील निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळविले तेव्हा कार्यकर्ता म्हणून या विजयाकडे कसे बघता?
भाजपतील कार्यकर्ता राजकारणासाठी काम करत नाही. भाजप एक विचारधारा आहे. ही विचारधारा समाजात रुजली, तर ती देशाच्या हिताची विचारधारा आहे. कोणती निवडणूक आहे, हे पाहून काम करत नाही. शतप्रतिशत भाजप असे काम करतो. आम्ही नेहमी तयार असतो. एखाद्या कार्यकर्त्याकडेही मतदारांची यादी मिळेल. त्याला दिलेले काम तो प्रामाणिकपणे करतो. मुख्यमंत्री देवेंद्रजी म्हणतात, ताकदीने यायचे आणि ताकदीने पुढे जायचे, रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात निवडणुका लढलो आहे. त्यांच्या शब्दकोशात ‘यश’ आणि ‘येस’ हेच शब्द आहे.
⦁ कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांच्या विकासकामांच्या अपेक्षा अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. पालिकेत भाजप सत्तेत आल्यास आपली भूमिका काय असणार आहे?
- नागरिकांच्या अपेक्षा असणे साहजिकच आहे. नागरिकांच्या अपेक्षांची पूर्तता करतो की नाही, हे सर्वच पक्षांनी पाहिले पाहिजे. इतर पक्षापेक्षा भाजपचा कार्यकर्ता हा महापालिका कार्यालयात किंवा छोट्या छोट्या समस्या सोडविण्यासाठी धावलेला दिसतो. कार्यकर्त्याकडे समस्या सोडविण्यासाठी फक्त इच्छा शक्ती असण्याची गरज आहे.
⦁ पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांना काय सल्ला द्याल?
- भाजपमध्ये पूर्वीपासूनच संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले जातात. आम्ही कोणाला आवाहन करावे, यासाठी कोणता कार्यकर्ता वाटच पाहात नाही. भाजपमध्ये ‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी’मध्ये तीन-तीन दिवसांचा अभ्यासवर्ग होतो. प्रत्येक जिल्ह्यात आणि मंडलाचाही अभ्यासवर्ग होतो. वार्डात जाऊन त्यांची माहिती दिली जाते. भाजपा बैठकीत जे ठराव होतात, ते जिल्ह्यात मग मंडलात राबविले जातात. कार्यकर्त्यांसाठी पूर्वीपासून रचना तयार केलेली आहे. महाराष्ट्रात आणि देशात भाजपची सत्ता आहे. भाजपचा कार्यकर्ता कधीही हुरळून जात नाही. काम केल्यानंतर यश मिळते. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्ता काम करत असतो. त्यांना आपण देशासाठी काम करतो, असे वाटते. देशासाठी आपण काहीतरी योगदान देतो, असे त्यांना वाटते. भाजपमध्ये संघटनावाढीसाठी एक मोठी फळी आहे. भाजपची वेगळी घटना आहे आणि त्या घटनेप्रमाणे सर्व रचना चालते. आमचा पक्ष सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा आहे. आमचा नेता सर्वसामान्यांना सहज भेटतो आणि कार्यकर्ता हाकेला धावून जातो, हेच भाजपच्या यशाचे गमक आहे. जनतेचे समाधान हेच आमचे यश आहे.