आपले जडशरीर मरणसमयी जरी नष्ट झाले, तरी त्यात वसत असलेला जीवात्मा उर्वरित देह, मन, बुद्धी पंचज्ञानेंद्रिये घेऊन बाहेर निघून जातो आणि कर्मगतीला जेव्हा वाट मोकळी होते, तेव्हा पुनः सुयोग्य जडशरीराद्वारे जीवात्मा मातृगर्भात आपोआप ओढला जातो. गीतेचा श्लोक हेच सांगतो.
ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः।
मनः षष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति॥ (श्लोक ७, अ. १५)
म्हणजे आपण ज्याला मरण समजतो, ते पूर्णत्वाने मरण नसून अंशात्मक मरण आहे. खरे विशाल जीवन मृत्यूनंतरच अनुभवायला मिळू शकते. जडशरीरानंतरच्या विशाल जीवनाचे ज्ञान प्राप्त करून देणारा संधिकाल वा द्वार म्हणजे मृत्यू होय. म्हणून उपनिषदे म्हणतात, “असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतं गमय.” आम्ही अज्ञानाने या जडजीवनालाच जीवनसर्वस्व मानतो, परंतु मृत्यूपश्चातच्या दिव्य जीवनाचा आम्ही कधीच शोध घेत नसल्याने त्या भव्य-दिव्य जीवनापासून आपण सदा वंचित असतो. जडशरीर हे जीवात्म्याचे कार्य करण्याचे उपकरण होय. हे विसरल्यामुळे एका भयानक विस्मृतीच्या गर्तेत आपण जन्मजन्मांतरीच्या फेर्यातून गटांगळ्या खात असतो. जीवदशेच्या चक्रात मोहाने सापडणार्या आत्मदशेला ‘जीवात्मा’ म्हणतात आणि विश्वात्मक चालक अशा आत्म्याला ‘परमात्मा’ असे म्हणतात. म्हणून ‘जीवात्मा’ हे परमात्म्याचे अंशात्मक स्वरुप होय. खोलीतील हवा व बाहेरील हवा एकच असते. परंतु, खोलीतील हवेला चार भिंतींच्या आत राहावे लागत असल्याने तिच्यात कालांतराने कुंदपणा व दुषितपणा उत्पन्न होतो. तद्वत् जीवात्म्याचे आहे. परमात्मा क्रमागत जीवात्मा बनतो. एरव्ही जशी हवा सर्वत्र एकच, तव्दत् जीवात्मा परमात्माच होय. गीता तेच म्हणते.
जडशरीर व सूक्ष्मशरीर एकमेकात मोठ्या विलक्षण रीतीने गुंतून राहतात. बर्फात पाणी, पाण्यात वाफ व वाफेत उद्जन आणि प्राणवायू संलग्न असतात. तद्वत् महाकारण, कारण व सूक्ष्मदेह या जडशरीरात संयोग पावून राहतात. परंतु, त्यांचे अस्तित्त्व स्वतंत्र असते. जड-सूक्ष्म शरीरांचा संयोग इतका स्पष्ट असतानासुद्धा मृत्यूच्या वेळी आम्हाला इतक्या वेदना वा भय का वाटावे? याचे कारण, सततच्या सहवास संस्कारामुळे उत्पन्न झालेली माया होय. परंतु, ही माया इतकी प्रबल का? घराच्या बांधकामाचे उदाहरण घेतल्यास याचे कारण स्पष्ट लक्षात येईल. सिमेंट-काँक्रिटचे बांधकाम करण्यास सिमेंट, विटा, रेती, लोहशलाका आणि पाणी यांची आवश्यकता असते. वरील पदार्थ वेगळे ठेवून त्यापासून मजबूत काँक्रिट बांधकाम उत्पन्न होणार नाही. त्या सर्व वस्तूंना विशिष्ट प्रमाणात एकत्रित करून लोहशलाकांचा त्यायोग्य सांगाडा तयार करून त्यात वरील मिश्रण पाण्याच्या मायेने ओले करून काही दिवस त्याच अवस्थेत ठेवल्यास ते काँक्रिट बांधकाम हत्तीलासुद्धा उभे करण्याइतके मजबूत होऊ शकते.सतत पाण्याच्या मायेने त्या बांधकामाला सिंचित न करता, ते तसेच उघडले तर त्यातील शलाका, रेती इत्यादी पदार्थ आपण वेगवेगळे करू शकतो. पण, पाणी व काळ यांच्या संस्काराच्या मायेने झालेल्या काँक्रिट बांधकामाला आवश्यक त्या योग्य कालानंतर आम्ही तोडतो म्हटल्यास तुटणार नाही. जडवस्तूंच्या एकत्रीकरणावर पाणी व काळ यांचा संस्कार होऊ दिल्यास त्या जडवस्तू जर इतक्या एकजीव होऊन जातात, तर आपला जडदेह, सूक्ष्मदेह व जीवात्मा सतत एकत्र राहिल्यास त्या एकत्रीकरणाने जीवात्मा या जडदेहात विलक्षण मायेने गुंतून राहिल्यास नवल ते काय?
आपण राहतो ते घर, आपण वापरतो ते कपडे आणि इतर वस्तू यांच्याशी सततचा सहवास व स्वामित्वाच्या भानामुळे आपण मायाबध्द होतो. तर जीवात्म्याचा सर्व संसार चालविण्यास अत्यंत आवश्यक असे जे शरीर त्या जीवात्म्याला मरणसमयी सोडताना विलक्षण वेदना आणि भय उत्पन्न झाल्यास नवल नाही. मायेचेच हे प्रकार आहेत. त्याचे यथायोग्य ज्ञान झाल्यास मरणसमयी वा इतरवेळीसुध्दा आपल्याला जडदेहाची आसक्ती राहणार नाही. सर्व कार्याकरिता जडशरीररुप उपकरण आवश्यक आहे, पण शेवटी ते उपकरण आहे हे लक्षात असू देणे, आवश्यक आहे. म्हणून म्हटले आहे, ‘शरीरम् आद्यं खलु धर्मसाधनम्’. इष्ट कर्तव्यकर्म करण्याकरिता जडशरीराची आवश्यकता असते. त्यामुळे शरीराचे व्यर्थ लाड वा त्रास देणे कर्मयोग्याला आवश्यक नाही. पण, आपण शरीर नाही, याची जाणीव सर्वदा असणे आवश्यक आहे. वरील सत्यज्ञान नसल्यास देहधारी व्यक्ती मरणसमयी आपण आता सर्वस्व गमावून बसलो आहोत, असे लटकेच मानते व मरणाचे भय धरून शोक करीत बसते. त्याचे ते भय मरणाचे नसून कल्पनेचे असते. मृत्युयातना ती हीच व मृत्युभय ते हेच होय!
प्रतिसंस्काराव्दारे मुक्ती
जडसूक्ष्म शरीराची गुंतावळ जर सततच्या संस्कारामुळे झाली असेल, तर प्रतिसंस्काराद्वारे ती गुंतावळ आम्ही अवश्य कमी करू शकू. योग्य अशा साधनेद्वारे तसले प्रतिसंस्कार केले जाऊ शकतात. असल्या मायेच्या पूर्व संस्कारांना शिथिल करण्याच्या साधनांना क्रमशः शिथिलासन, योगनिद्रा, शवासन व हंसजय म्हणतात. सदर्याची बाही आपण उलटी करतो तद्वत् आपण आपल्या जडशरीरातून स्वतःचा प्राण व लिंगशरीर बाहेर काढू शकतो. अशा प्राणावर व लिंगशरीरावर जय मिळविण्याच्या साधना साध्य होण्याकरिता सतत संस्कारांची आवश्यकता असते. तेव्हा कोठे इष्ट साधना फलरुप होत असतात. अशा माया नष्ट होऊन स्वशरीर सोडताना म्हणजे बाह्यार्थाने मरताना उलट आनंद वाटतो. पोहणे शिकणार्या नवशिक्याला जबरदस्तीने पाण्यात लोटले, तर तो कसेतरी हातपाय आपटीत पाण्याच्या वर येण्याचा प्रयत्न करेल आणि पोहणे शिकण्याकरिता त्याच्या कंबरेला जो दोर बांधतात, त्या दोराला धरून स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न करताना दिसेल.
त्याच्या मनात पाण्याबद्दल मृत्युसमान भय असते. परंतु, पोहण्याच्या सतत अभ्यासामुळे त्याचे पाण्याचे भय क्रमशः कमी होऊन त्याऐवजी तोच पाण्यात पोहताना आनंद व्यक्त करतो. आवश्यक तेवढे पोहणे जमल्यावर ती व्यक्ती पाणी पाहिल्यावर आनंदित होते आणि पूर्वीच्या मरणप्राय वाटणार्या पाण्यावर नानातर्हेच्या कोलांटउड्या मारून त्याच पाण्यावर उत्तम तर्हेने पोहण्याची कला संपादन करण्याचा प्रयत्न करीत असते. भयाची कल्पना आता कौशल्याने, कलेने घेतली जाते. अभ्यासाचे एवढे महत्त्व मानवी जीवनात आहे. जिवंतपणी जडशरीरातून बाहेर पडण्याचा अभ्यास वाढविल्यास कथित मृत्यू पावताना साधकाला आनंद प्राप्त होऊन मरणोत्तर जीवनातील अद्वितीय, दिव्य जीवनरहस्ये तो हस्तगत करू शकतो. अशा मृत्यूंजय साधकाला शरीरत्याग म्हणजे भय न वाटता तो अनुभव त्याच्याकरिता आनंद व अमरता यांचा एक अध्याय बनेल.
(क्रमशः)
योगिराज हरकरे
(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)