देवी अहिल्याबाई मातृशक्तीच्या संभाव्य क्षमतेचे सर्वात मोठे प्रतीक
सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन
31-May-2024
Total Views | 45
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : "देवी अहिल्याबाई (Devi Ahilyabai RSS) होळकर या मातृशक्तीच्या संभाव्य क्षमतेचे सर्वात मोठे प्रतीक आहे. मातृशक्तीच्या सक्षमीकरणाबद्दल आज आपण बोलत असतो. परंतु मातृशक्ती किती सशक्त आहे आणि काय काय करू शकते, याचे अनुकरण करण्याचा आदर्श आपल्या सर्वांसमोर अहिल्याबाईंनी ठेवला आहे.", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले.
पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई होळकर यांचे ३०० वे जयंती वर्ष सुरु झाले आहे. देशभरात त्यानिमित्ताने त्रिशताब्दी महोत्सव साजरा होण्यास सुरुवात झाली आहे. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी आपल्या उद्बोधनातून देवी अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याबद्दल व त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल भाष्य करत त्यांना आदरांजली वाहिली आहे. ते म्हणाले, "सध्याच्या परिस्थितीतही अहिल्याबाईंचे व्यक्तिमत्त्व आपल्यासाठी आदर्शसमान आहे. दुर्दैवाने लहान वयातच त्यांना वैधव्य प्राप्त झाले. परंतू एकटी स्त्री असूनही त्यांनी केवळ मोठे राज्य सांभाळले नाही तर ते सुराज्यच्या दृष्टीने त्याचे कार्यवहन केले."
राज्यकर्ता कसा असावा याचे अहिल्याबाई या उत्तम आदर्श असल्याचे सांगत सरसंघचालक पुढे म्हणाले, "त्यांच्या नावाच्या मागे पुण्यश्लोक हा शब्द जोडला आहे. पुण्यश्लोक त्या राज्यकर्त्यास म्हणतात, जो राज्यकर्ता आपल्या प्रजेला सर्व प्रकारच्या दुर्बलता आणि दुःखांपासून मुक्त करतो, आपले कर्तव्य पार पाडून आपल्या जनतेच्या सर्व ऋणातून मुक्त होतो. वास्तविकतः देवी अहिल्याबाई त्याकाळातील आदर्श राज्यकर्त्यांच्या फळीतील होत्या. रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी त्यांनी उद्योगांची स्थापना केली. त्या उद्योगांचा पाया इतका भक्कम केला की, महेश्वरचा कापड उद्योग आजही चालतो आहे आणि अनेकांची उपजीविका करतो आहे."
स्त्री राज्यकर्ता म्हणून अहिल्याबाई होळकर कशा होत्या याबाबत सांगताना ते म्हणाले, "विशेषत: एके काळी जे सर्वात दुर्बल आणि दुर्लक्षित होते, त्या प्रत्येकाची त्यांनी काळजी केली. आपल्या राज्याच्या करप्रणालीला त्यांनी सुसह्य केले. शेतकऱ्यांची काळजी केली. सर्वप्रकारांनी त्यांचे राज्य खऱ्याअर्थाने सुराज्य होते. आपल्या प्रजेची आईप्रमाणे काळजी करणारी राज्यकर्ता या नात्याने त्या तेव्हाच 'देवी अहिल्याबाई' ओळखल्या गेल्या असाव्यात. त्यांनी केलेले कार्य अनेक अर्थांनी विशेष आहे. आपले राज्य अगदी कुशलतेने चालवले. त्याकाळी सर्व राज्यकर्त्यांशी तिचे मैत्रीपूर्ण संबंध होते. इतकंच नव्हे तर शेजारच्या राज्यांतील सर्व राज्यकर्ते देखील त्यांनी देवी स्वरूप मानत असत. इतकी श्रद्धा व आदर त्यांच्याबद्दल समकालीन राज्यकर्त्यांमध्ये होता."
पुढे सरसंघचालक म्हणाले, "राज्यावर कुठल्याच प्रकारचे आक्रमण होऊ नये म्हणून त्या त्यांच्या धोरणात्मक कौशल्यासाठी (समरनिती) सुद्धा ओळखल्या जात होत्या. राघोबा दादा मोठी फौज घेऊन आले होते पण अहिल्याबाईंनी या संकटावर कोणताही संघर्ष न करता समरनितीने विजय मिळवला. त्यांनी केवळ आपल्या राज्याचीच नव्हे तर संपूर्ण देशाची काळजी केली. आपल्या देशाच्या संस्कृतीचा जो आधार आहे, तो मजबूत करण्यासाठी त्यांनी देशभरात अनेक ठिकाणी मंदिरे उभारली. स्वतः राज्यकर्ता असल्या तरी त्यांनी स्वतःला कधी राज्यकर्ता म्हणून संबोधले नाही. भगवान शंकराच्या आज्ञेने राज्य चालवत आहे या भावाप्रती 'श्री शंकर आज्ञेकरून' असे त्या लिहीत होत्या. देशभरातील विविध धार्मिक तीर्थक्षेत्रे आणि व्यापार मार्गांवर त्यांनी मंदिरे, नद्यांवर घाट, धर्मशाळा बांधल्या. जेणेकरून भारतातील लोक पूर्वीप्रमाणेच धार्मिक ठिकाणी सहज पोहोचू शकतील आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय त्यांचा व्यवसाय करू शकतील. यातून एकात्मता वाढत राहिल, हा त्यामागचा विचार होता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी आपल्या धार्मिक श्रद्धेसाठी दूरदर्शी कार्य केले."
"राज्यकर्ते असूनही त्या साधे जीवन जगत होत्या. प्रजेची काळजी, राज्याचे संचालन, सुरक्षा, देशाची एकात्मता-अखंडता, सामाजित समरसता, सुशिलता आणि सादगी यांचा आदर्श ठेवणारी एक आदर्श महिला राज्यकर्ता म्हणून आपल्यासमोर पुण्यश्लोक देवी अहिल्याबाईंचे चित्र आपल्यासमोर आहे. सध्याच्या परिस्थितीतही त्या आमच्यासाठी आदर्श असल्याने देशभरात त्यांच्या स्मरण निरनिराळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून केले जाणार आहे. ही आनंदाची बाब आहे.", असे म्हणत सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी त्रिशताब्दी महोत्सवास शुभेच्छा दिल्या आहेत.