अहिल्याबाई आणि मल्हारराव होळकर - तिहेरी गोफ

    30-May-2024
Total Views | 146
article on Ahilyabai and Malharrao Holkar


मल्हारराव आणि अहिल्याबाई होळकर या सासरा-सुनेचे भावबंध म्हणजे अपूर्व असा तिहेरी गोफ होता. ते गुरू-शिष्य होते. बाप-लेक होते आणि स्वामी-सेवकही होते. होळकरकालीन इतिहासातील काही ठळक प्रसंग, मल्हारराव आणि अहिल्याबाईंमधील पत्रव्यवहार यांच्या आधारे त्यांच्या नातेसंबंधांची वीण उलगडणारा हा लेख...

अठराव्या शतकाकडे नजर टाकली की लक्षात येते, अहिल्याबाईंच्या मागच्या-पुढच्या काळात मराठेशाहीत अनेक कर्तृत्ववान आणि चौकस स्त्रिया राजकारणात होत्या. राजारामांच्या पत्नी ताराबाई आणि नानासाहेब पेशवे यांच्या पत्नी गोपिकाबाई ही त्यातील ठळक नावे. या स्त्रिया पती-पुत्राला गादीवर बसविण्यासाठी किंवा त्यांच्या लाभासाठी अटीतटीने संघर्षात उतरल्या होत्या. त्या डावपेच खेळल्या होत्या. त्यांनी किल्ले लढविले होते. कधी यशस्वी झाल्या होत्या. कधी पराभूत झाल्या होत्या. कधी बळी ठरल्या होत्या. पण, त्या सत्तेच्या केंद्राभोवतीच घुमत राहिल्या होत्या. अहिल्याबाईंचे राज्यकारभारात येणे मात्र वेगळे होते. त्यांची गुणवत्ता लक्षात घेऊन त्यांच्या सासर्‍यांनी - मल्हारराव होळकरांनी त्यांना राज्यकारभारात आणले होते. इतर जणींपेक्षा अहिल्याबाई याबाबतीत सुदैवी होत्या. त्यांच्या गुणांची कदर करणारे सासरे त्यांना लाभले होते. त्यामुळे त्यांचा राजकारणात सहजपणे प्रवेश झाला आणि कारभाराचे शिक्षणही मिळाले. अहिल्याबाईंचे फार मोठे श्रेय हे की, अहिल्याबाईंनी राज्यकारभारात स्वार्थी ढवळाढवळ केली नाही. पुत्रप्रपौत्रांना सत्ता मिळवून देण्यासाठी त्या राजकारण खेळल्या नाहीत.

मराठ्यांचा वेढा कुंभेरीच्या किल्ल्याभोवती पडला होता. आतमध्ये सुरजमल जाटाचे सैन्य. दोन्ही बाजू तुल्यबळ होत्या. कोणीच मागे हटत नव्हते. दि. 17 मार्च 1754. दुपारची वेळ. मल्हाररावांचे पुत्र अहिल्याबाईंचे पती खंडेराव होळकर भोजन करून मोर्चाच्या निशाणापाशी आले आणि अचानक फिरत्या तोफेतून गोळा आला. त्याने खंडेराव जागीच गतप्राण झाले. एकच हलकल्लोळ उडाला. मल्हारराव होळकर जागीच मटकन बसले. पाठोपाठ वार्ता आल -अहिल्याबाई सती जाणार आहेत. भग्न हृदयी मल्हारराव अहिल्याबाईंच्या डेर्‍यात पोहोचले. म्हणाले, “बाई माझी सारी दौलत, राज्याचा कारभार तूच माझा खंडू म्हणून तुझ्यावर घालत होतो. तू आहेस तर अहिल्या मेली आणि खंडू जीवंत आहे मला भरवसा. माझे भाग्य ठेवणे, तुझ्या हाती आहे. या म्हातार्‍याची तुला दया येऊ दे.” अहिल्याबाईंची दोन मुले लहानच होती. समोर महापराक्रमी सासरा अगतिक होऊन बसलेला. मुलांची माया. सासर्‍यांची विनंती. अहिल्याबाईंचा ‘सती’ निर्णय बदलला. त्या जीवनाकडे परत आल्या.

मल्हारराव आपल्या शब्दाला जागले. 1754 नंतर अहिल्याबाईंचे नाव कागदोपत्री सगळीकडे दिसू लागले. पानिपतात मराठ्यांचा पराभव झाल्यानंतर भोवतालची परिस्थिती बिघडली. राजपुतान्यातील मराठ्यांची ठाणी उठवून, माळव्यावर चढाई करण्याचा माधव सिंग यांचा प्रयत्न सुरू झाला. नजीबखान दिल्लीचा सर्वेसर्वा बनला. रोहिल्यांनी अंतर्वेदीतून मराठ्यांना हुसकावून लावले. पंजाबमध्ये शिखांचा जोर वाढला. इंग्रज जिकडे तिकडे मुसंडी मारू लागले. या भोवतालच्या विपरित परिस्थितीत अहिल्याबाई मल्हाररावांचा कारभार काटेकोरपणे सांभाळत होत्या. एकीकडे कुलदैवताचे नित्याचे धर्मकर्म पार पाडत होत्या. दैनंदिन कारभारातील लहानसहान गोष्टी आणि लढाया, युद्ध यांसारख्या मोठ्या घटना सर्वच बाबतीत अहिल्याबाई मल्हाररावांच्या साहाय्यक होत्या. मल्हारराव स्वार्‍यांमध्ये गुंतलेले होते. कधी पुणे, कधी दिल्ली, कधी राजस्थान असे त्यांचे दौरे सुरू होते. सर्व ठिकाणांहून ते अहिल्याबाईंना पत्रे लिहून सूचना देत असत. त्यानुसार अहिल्याबाई सर्व जबाबदार्‍या पार पाडत असत.

आधी लहान कामांची उदाहरणे पाहू. पुणे येथून मल्हाररावांनी अहिल्याबाईंना पत्र (दि. 6 सप्टेंबर 1762) लिहिले- “सोनपत पानपत लढाईवर जातेवेळी भविष्य सांगण्याबद्दल हरिप्रसाद भट परसाई, यांना 25 दिघे जमीन आणि चार आणेप्रमाणे रोजींदा करून द्यावा.” वास्तविक पानिपतच्या युद्धाला दीड वर्ष उलटले होते. पण, मल्हारराव तेव्हाचे बाकी असलेले हिशोब चुकते करत होते. यातून उशीर झाला, तरी आर्थिक व्यवहार चोखपणे पार पाडायचे, हे धोरण अहिल्याबाईंच्या मनात झिरपत होते. मल्हाररावांच्या व्यवहाराचा चोखपणा अहिल्याबाईंमध्ये उतरला होता, हे ठिकठिकाणी जाणवते. सुलतानपूर परगण्याच्या कमाविसदाराला अहिल्याबाईंनी आज्ञा केली- “सरकारच्या पागेसाठी 14 दिवसांचा शिधा पाठवावा.” आज्ञा अगदी काटेकोर होती. “घोड्यांची हजेरी पाहून घेणे. मग तूप आणि कणीक 1 खंडी, 17 मण, 2 शेर इतका माल इतक्या घोड्यासाठी पोहोचता करणे. माल पोहोचल्यावर सरकारातून पावती घेणे. म्हणजे नंतर रक्कम सरकारातून मंजूर होईल.”

एवढा मोठा कारभार करताना पैशाच्या अफरातफरी होणार नाहीत, याबद्दल सावध असावे लागे. माणसे टिकवून ठेवावी लागत, ती दुखावली जाणार नाहीत याची काळजी घ्यावी लागत असे. अहिल्याबाईंची ही सावधानता, काळजी, तत्परता काही प्रसंगी दिसून येते. जेजुरी नैवेद्याची व्यवस्था पाहाणारे संतावाबाबा तसे विश्वासाचे होते. लोक त्यांचे ऐकतही असत, तरीही नैवेद्याच्या बाबतीत काहीतरी गडबड अहिल्याबाईंच्या कानावर आली. पुजारी मंडळी अशी थोडी गडबड करीतच असत. संतावाबाबाच्या हातून थोडे दुर्लक्ष झाले असावे, अशी अहिल्याबाईंना शंका आली. संतावाबाबा भला माणूस. अपमान करून चालणार नव्हते. तसेच भीड ठेवूनही चालणार नव्हते. मग अहिल्याबाईंनी संतावाबाबांना पत्र लिहिले. त्यात आणखी इतरही दोन-तीन कामे लिहिली. त्यामुळे पत्र कडक झाले नाही. अहिल्याबाईंनी लिहिले, “श्रींच्या नैवेद्यासाठी ऐवज मिळत नाही, असे आम्हाला कळले. खरे म्हणजे नैवेद्यासाठी वर्षाची रक्कम बांधून दिली आहे. तरी हल्ली असे होण्याचे कारण काय? मुद्दाम चौकशीसाठी हे पत्र लिहिले आहे. नेमणुकीप्रमाणे ऐवज पोहोचवून पावती घेत जाणे. वेदशास्त्रसंपन्न शंकरभट यांना कळविले आहे की, श्रावणमासात अनुष्ठानास दोन ब्राह्मण बसवावेत. ते श्रींचे माहात्म्य सांगून प्रदक्षिणाही घालतील. त्याचे एकूण 36 रुपये तुमच्याकडून दिले जावेत. तो ऐवज तुम्ही श्रींच्या कारखान्याच्या ऐवजातून घ्यावा. पूजेसाठी बागेतील फुले तोडून पाठवून द्यावीत. नैवेद्यासाठी रोज केळीची पाने देत जाणे.”

दि. 21 ऑक्टोबर 1764 रोजी इंग्रजांनी अलाहाबादचा किल्ला काबीज केला. मल्हाररावांनी ओळखले, इंग्रज पेटले आहेत. लढाया अटळ आहेत. रणक्षेत्राच्या जवळ सुरक्षित ठिकाणी तोफखाना तयार ठेवणे आवश्यक आहे. अहिल्याबाई त्यावेळी देवदर्शन घेत तीर्थक्षेत्री फिरत होत्या. मल्हाररावांनी त्यांना निरोप पाठवला, “ग्वाल्हेर जवळ जाऊन लष्कराची तयारी करावी. दारूगोळ्याचा कारखाना लावून तोफखाना सिद्ध करावा.” अहिल्याबाईंनी देवदर्शन आवरते घेतले. दारूगोळ्याच्या कारखान्याचा व्याप प्रचंड होता! कारखान्यासाठी जागा निवडण्यापासून तोफा वाहून नेणार्‍या बैलांपर्यंत सर्व व्यवस्था (पान 2 वरून) पाहायची होती. बैलांच्या चारापाण्याची सोय करायची. शेकडो माणसे लागत. किती प्रकारचे सामान लागत असे. सुतार, लोहार, बाणांचे कारागीर, गाडीवान, गोलंदाज, संदुकांचे हवालदार, दगड फोडणारे, खोगीर, लगाम, कातडी सामान तयार करणारे, पखालवाले, परीट, बेलदार, गार्दी, शिंपी, कलाल, सांडणीस्वार इत्यादी. तोफांचे गोळे सात ते 20 शेरांपर्यंत असत. तोफखान्यावर तोफंदाज, देगंवाज, बंदानीखारखे गोलंदाज हे नोकर असत. शिवाय, पगार देण्याकरिता दिवाण, मुजुमदार, फडणीस हे अधिकारी असत. पगार दर चांदरातीस होत असे. तोफा ओढण्यास 125 ते 150 बैल लागत असत.

कारखान्याच्या कामाचा दणका सुरू झाला. तशी या कामात वाकबगार असलेली, कामधंद्याच्या शोधात फिरणारी माणसे, अहिल्याबाईंभोवती गोळा होऊ लागली. सर्वच माणसांची ताबडतोब गरज नव्हती. अहिल्याबाई माणसे निवडत होत्या. माणसांचा तुटवडा पडू नये म्हणून आधीच थोडा पगार देऊन माणसे बांधूनही ठेवत होत्या. रोजंदारीचे पैसे घेतलेले सर्वचजण अहिल्याबाईंच्या लवाजम्याबरोबर निघण्यासाठी तयार झाले. कोणाला पुढे न्यावे, कोणाला मागे ठेवावे, याचा अहिल्याबाईंना निर्णय घेता येईना. शिवाय रोजचे पाहुणेरावळे होतेच. या पाहुण्यांभोवती राजकारण होतेच. शत्रूंशी उघड सामना होता. पण, गरज म्हणून मैत्री ठेवलेल्यांशीही सावधपणे वागावे लागत होते. गाजुदिखान हा असाच मित्र होता. त्याचे कुटुंब काही दिवसांसाठी अहिल्याबाईंकडे राहात होते. आता गाजुदिखानाची एक स्त्री आणि उमदा बेगम, या दोघींनाही भरतपूरला राहाणे सोयीचे नव्हते. म्हणून गाजुदिखान या दोघींनाही अहिल्याबाईंकडे पोहोचवावे, या विचारात होता. अहिल्याबाई साशंक झाल्या, यामागे काही राजकारण शिजते आहे की काय? गाजुदिखानाची विनंती लगेच मान्य करावी की नाही? अहिल्याबाईंनी मल्हाररावांना पत्र पाठवले.

मल्हाररावांचे उत्तर आले - “ढालाईत, कामाठी, बारूवान साज, परवानगी न घेताच रोजमुरा घेऊन तुमच्याबरोबर निघाले. ढालाईताना ताबडतोब कामावरून दूर करणे. बारूदसाजांना परत आमच्याकडे पाठविणे. कामाठ्यांमधील तेलंगे घेणे. बाकीच्यांना परत पाठविणे. वजीर गाजुदिखनाचा मजकूर कळला. भरतपूरच्या उमदा बेगम आणि वजीराची स्त्री तुमच्याकडे येऊन राहाणार. तुमच्याकडे त्यांचे आधीचे कुटुंब आहेच. ते आणि भरतपूरहून येणारे हे दुसरे कुटुंब दोन्हीही मथुरेहून आग्र्याला जाणार. तेथून फराक्काबादेस जाणार. म्हणून तुम्हास लिहित आहे. तुम्ही शहाणा मनुष्य 25 राऊत देऊन भरतपूरला पाठविणे. त्या ठिकाणी एखादा दिवसाचा मुक्काम करून, वजीराकडील कुटुंबकबिले सन्मानाने आपल्यापाशी आणणे. त्यांना आपल्याबरोबर सांभाळून आग्र्यापर्यंत नेणे. आग्र्याला जाताना एक मुक्काम मथुरेला जरूर करावा. एका मुक्कामाखेरीज जास्त मुक्काम न करणे. मग वजीराच्या कुटुंबाला आग्रा येथे पोहोचते करावे. तेथून ते फराक्काबादेच्या मार्गे रवाना होतील. तुम्ही ढवळपूराहून दरमजल पुढे ग्वाल्हेरीकडे जाणे. वजीराकडील कुटुंबास किंवा त्यांच्या कोणाही गृहस्थास आपणास फराक्काबादेची गोष्ट माहीत झाल्याचे तीळमात्र कळू न देणे. (दि. 25 जानेवारी 1765).”

अहिल्याबाईंना देवादिकांचा मोह अनिवार होता. त्यामुळे गाजुदिखानाच्या कुटुंबाला आग्र्याला पोहोचविताना, मथुरेचा मुक्काम अधिक करण्याचे त्यांनी योजलेच. ही वार्ता लगेच मल्हाररावांपर्यंत पोहोचलीच. यानंतर दि. 31 जानेवारी 1765 या एकाच दिवशी मल्हाररावांनी अहिल्याबाईंना दोन स्वतंत्र पत्रे लिहिली. यातील एक पत्र अहिल्याबाईंच्या कर्तृत्वावर गाढ विश्वास असणार्‍या सत्ताधारी मल्हाररावांचे होते. दुसरे पत्र आपलं न ऐकणार्‍या तरुण लेकसुनेवर चिडलेल्या वडीलधार्‍या मल्हाररावांचे होते. पहिल्या पत्रात ते लिहितात, “तुम्हाला दरमजल करीत ग्वाल्हेरला जाण्याविषयी अगोदर लिहिले आहेच. त्याप्रमाणे ग्वाल्हेरला जाणे. तेथे पाच-सात मुक्काम करावे. थोरल्या तोफेचे हजार-पाचशेपर्यंत गोळे करवून घ्यावेत. जंबुरियाचे गोळे जितके होतील तितके तयार करवावेत. शेरभर दारू मावेल अशा बाणांच्या पालेका उत्तम निवडून घेणे. ग्वाल्हेरी पलीकडे तुम्ही जाल, तेव्हा तोफखान्याच्या खर्चाची एक महिन्याची बेगमी करून मग पुढे जाणे.”

दुसर्‍या पत्रात ते लिहितात, “तुम्हास जाताना कळविले होते, मथुरा अगर आग्रा येथे मुक्काम न करता भारी मजली मारून ग्वाल्हेरी पोहोचावे. तरीही मथुरेला तुम्ही दोन-तीन मुक्काम करणार असे ऐकले. आम्ही सांगितले ते न ऐकून स्वतःच्या मनाप्रमाणे वागलात तरी तीर्थक्षेत्री सुखरुप असा. यापुढे मथुरेस पाणी पिण्यासदेखील न थांबता, मोठ्या मजला मारीत चमेल उतरून ग्वाल्हेरीस जाणे. तेथे चार-पाच मुक्काम करणे. तोफखान्याचे पाहणे. आम्ही वरचेवर लिहू त्याप्रमाणे वर्तणूक ठेवणे.” अहिल्याबाईंच्या मथुरा मुक्कामाबाबत मल्हारराव इतके संतप्त होण्याची दोन कारणे संभवतात. अहिल्याबाईंच्या देवाच्या नादामुळे त्यांचे गाजुदिखानाच्या कुटुंबकबिल्याकडे दुर्लक्ष होऊ शकेल, काही नुकसान होऊ शकेल, अशी काळजी! दुसरे म्हणजे, तरुण माणूस आपली आज्ञा डावलून वागण्याची शक्यता आहे, असे दिसल्यावर मल्हारराव अस्वस्थ झालेले असू शकतील. हे आज्ञा-अवज्ञा प्रकरण दोन्ही बाजूंनी बिलकूल ताणले मात्र गेले नाही.

तोफखान्याची सोय ग्वाल्हेरला होणे शक्य नव्हते. म्हणून अहिल्याबाईंनी स्वतःच्याच अधिकारात तोफखाना सिरोंजला हलविला. नंतर मल्हाररावांना हा बदल कळविला. लगेचच दिल्लीहून मल्हाररावांनी लिहिले, “तुमचे पत्र पोहोचले. तोफखाना ग्वाल्हेरीस ठेवायची सोय नव्हती. तुम्ही सिरोंजेस नेण्याचे योजले. हरकत नाही. तोफखाना सिरोंजेत ठेवून, गोविंद मामलेदार यास सांगून तोफखान्यावरील डागडुजी करून तोफांची सर्व तयारी ठेवणे. याविषयी बेसावध नसावे. पावसाचे दिवस येतील. दोर, दारे, कान वगैरे सर्व सामान सांभाळून सिद्धता करून ठेवावी. बैलांच्या चाराचंदीची पोटभर बेगमी करा. मग पुढे तुम्ही इंदूरीस जाणे. तेथे गेल्यावर सुलतानपूर सेंधव्याचा बंदोबस्त करणे. आम्ही दिल्लीहून कूच केली. अंतरवेदीतून बुंदेलखंडाच्या बाजूने येत आहोत.” अहिल्याबाई राज्यकारभारात केवढ्या मोठमोठ्या जबाबदार्‍या सांभाळत होत्या, याची या पत्रावरून कल्पना येते.

अहिल्याबाई ग्वाल्हेरात होत्या. गोहदचे राज्य तेथून अगदी जवळच होते. मल्हाररावांच्या मनात गोहदकरांचे पारिपत्य करणे होतेच. अहिल्याबाईंच्या हाती तोफखाना होता. लढाईचे डावपेच त्यांना माहीत झालेले होते. अहिल्याबाईंनी स्वतःच्या अधिकारात एक धडाकेबाज निर्णय घेतला. गोहदच्या गढीवर तोफा रोखल्या. होळकरांच्या तोफा रोखल्या जाताच गोहदकर हादरले. गढी खाली करून दिली. अहिल्याबाईंनी ही वार्ता मल्हाररावांना कळविली नाही. का? मल्हाररावांच्या आज्ञेशिवाय धडक कृती केल्यानंतर त्यांना तोंड देण्याचे धैर्य बाईंमध्ये नव्हते?

अहिल्याबाईंच्या या वागण्याने मल्हाररावांच्या पोटात खुटखुटले. मल्हारराव भडकून उठले असते, तर याचा फायदा गोहदवाल्याने ताबडतोब उठवला असता. गंगोबातात्यांसारख्या माणसाने काड्या घालायला सुरुवात केली असती. हे सर्व जाणून असलेल्या मल्हाररावांनी आपला तोल जराही ढळू दिला नाही. या दिवशीच्या पत्रात मल्हाररावांनी लिहिले, “गोहदकराकडील एक गढी तुम्ही घेतली, असे काशीदाने सांगितले. कारखाना लावून तोफेचे गोळे व जम्बुरी याचे गोळे सरंजाम सज्ज करवणे. यावर्षी गोहदकरांचे पारपत्य जरूर कर्तव्य आहे.” गोहदकरांनी आरंभी गढी खाली करून दिली, तरी नंतर लढाईची शक्यता होती. याची अहिल्याबाई आणि मल्हारराव दोघांनाही कल्पना होती.

पुढे गोहदच्या लढाईचे खलबत करताना मल्हाररावांनी अहिल्याबाईंना बोलविले नाही. एक कारभारी वैद्य आणि खांडाराणी हरकूबाई यांना खलबतात सामील करून घेतले. खलबतात झालेल्या निर्णयाची कार्यवाही मात्र मल्हाररावांनी अहिल्याबाईंवर सोपवली. म्हणजे मुरब्बी राजकारणी मल्हाररावांनी काहीही न बोलता, आपल्या कृतीद्वारे सुनेला सांगितले की, “निर्णय घेण्याचा अधिकार आमचा आहे, तुमचा नाही. तुम्ही आमच्या हुकमाची अंमलबजावणी करावयाची आहे. आमचा तुमच्यावर पूर्ण भरवसा आहे.” अहिल्याबाईंनी हे मानून घेतले. तरुण पिढी स्वतंत्र होत अधिकार दाखवू लागते, तेव्हा वडील पिढीला ते स्वीकारता येतेच असे नाही. महापराक्रमी मल्हारराव आणि धर्मशील अहिल्याबाईही याला अपवाद नव्हत्या.

मल्हारराव आणि अहिल्याबाई या सासरा-सुनेचे भावबंध म्हणजे अपूर्व असा तिहेरी गोफ होता. ते गुरू-शिष्य होते. बाप-लेक होते आणि स्वामी-सेवकही होते. एकमेकांविषयी आदर बाळगून, एकमेकांची कदर करीत, न पटणार्‍या खाचाखोचांच्या जागी सावधपणे संघर्ष पेटू न देता, एकमेकांवर विश्वास ठेवत त्यांचा कारभार एकदिलाने चाललेला होता.

विनया खडपेकर
(लेखिका 2003 पासून ‘राजहंस प्रकाशन’मध्ये संपादक असून त्यांच्या ‘ज्ञात-अज्ञात अहिल्याबाई होळकर’ या चरित्राला अनेक मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.)
अग्रलेख
जरुर वाचा
२५ जून : आणीबाणीच्या काळ्या आठवणी जागविण्याचा दिवस

२५ जून : आणीबाणीच्या काळ्या आठवणी जागविण्याचा दिवस

आज आपण सर्वजण स्वातंत्र्याचा अनुभव घेतोय. कोणीही, कधीही, कुठेही जाऊ शकतो, मनासारखे (झेपेल त्याप्रमाणे) काहीही करू शकतो. मग विषय कोणताही असो. ‘कोरोना’चा असो किंवा चिनी घुसखोरीचा, शेतकर्‍यांच्या प्रश्नांचा विपर्यास करण्याचा, दि. २६ जानेवारी रोजीच्या राजधानीत घातलेल्या धुडगुसाचे निर्लज्ज समर्थन करण्याचा, खलिस्तानचे समर्थन करण्याचा, ‘वॅसिन’च्या प्रश्नावर दिशाभूल करण्याचा, स्वतःच्या अकार्यक्षमतेचे खापर निर्लज्जपणे केंद्र सरकारवर फोडण्याचा, केतकीच्या कवितेवरून तिला चार महिने तुरुंगवारी घडविण्याचा आणि मोदींना ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121