"घराणेशाहीच्या मस्तीत असलेला हा शहजादा जनतेची..."; राहुल गांधींवर भाजपचा हल्लाबोल
07-Jun-2025
Total Views | 28
मुंबई : घराणेशाहीच्या मस्तीत असलेला हा शहजादा जनतेची ताकत विसरला आहे, असा हल्लाबोल भाजपने राहुल गांधींवर केला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीसंदर्भात लिहिलेल्या लेखानंतर त्यांच्यावर सर्वत्र टीका करण्यात येत आहे.
भाजपच्या अधिकृत 'एक्स' अकाऊंटवर यासंदर्भात एक पोस्ट करण्यात आली असून राहुल गांधी आणि काँग्रेसवर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे. "काँग्रेसला महाराष्ट्राचा एवढा तिटकारा का? जनतेने दिलेल्या जनादेशाचा अपमान करणे हा काँग्रेसचा इतिहास आहे. संविधानाची पायमल्ली करत अनेक राज्य सरकार बरखास्त करणे असो किंवा निवडणूक आयोगाला हाताशी धरून चालू निवडणुका बेकायदेशीररित्या महिनाभर थांबवणे. विधानसभा २०२४ च्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने काँग्रेसला तिसऱ्यांदा नाकारले याच गोष्टीचा राग राहुल गांधींनी आता महाराष्ट्र अशांत करून काढायचा ठरवले आहे," अशी टीका भाजपने केली.
"दररोज नवे नवे खोटे आकडे सांगून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा. निवडणूक आयोग, मतदार आणि न्यायपालिका सर्वांनाच आरोपांच्या पिंजऱ्यात उभे करून अराजकता माजवायची. त्यातून सत्तेच्या वाटा शोधणे काँग्रेसची ही नीच मानसिकता महाराष्ट्राच्या जनतेने चांगलीच ओळखली आहे. घराणेशाहीच्या मस्तीत असलेला हा शहजादा जनतेची ताकत विसरला आहे. महाराष्ट्रात अराजकता पसरवणे एवढा एकच हेतू काँग्रेसचा असला तरी काँग्रेस यशस्वी होणार नाही," असेही भाजपने म्हटले आहे.