"जोपर्यंत राहुल गांधी पराभवाच्या गडद छायेतून निघत नाहीत तोपर्यंत..."; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
07-Jun-2025
Total Views |
नागपूर : जोपर्यंत राहुल गांधी पराभवाच्या गडद छायेतून निघत नाहीत तोपर्यंत त्यांचा पक्ष वाढू शकत नाही, अशी टीका मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. राहुल गांधींनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीवर लिहिलेल्या लेखावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "राहुल गांधींनी आत्मपरिक्षण करायला हवे. लोकसभेत महाविकास आघाडीने ३१ जागा जिंकल्या तर आम्ही १७ जागा जिंकल्या. त्यावेळी राहुल गांधी आणि महाविकास आघाडीमध्ये अतिआत्मविश्वास निर्माण झाला आणि जनसभा किंवा लोकांच्या घरोघरी जाणे यासारखे निवडणूक लढण्यासाठीचे काम करणे ते विसरले. महाराष्ट्रातील जनतेने महायूतीवर आणि मोदीजींच्या कामावर विश्वास ठेवला. लोकसभेत महाविकास आघाडीला २ कोटी ५० लाख मते मिळाली तर महायूतीला २ लाख ४८ लाख मते मिळाली. त्यानंतर महायूतीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या प्रयत्नाने आम्ही ३ कोटी १७ लाख मतांवर गेलो आणि ते २ कोटी १७ लाखांवर आले. लोकसभेपेक्षा आपली ३३ लाख मते कमी झालीत हे राहुल गांधींना कळायला हवे. याऊलट महायूतीची ६९ मते वाढली."
"२००९ मध्ये लोकसभा निवडणुकीत मतदार यादीत ७ कोटी २९ लाख मतदार होते तर २००९ च्या विधानसभा निवडणुकीत ७ कोटी ५९ लाख मतदार झाले. तेव्हा केंद्रात आणि राज्यात त्यांचेच सरकार होते. मग ही ३० लाख मते कशी वाढली? तेव्हासुद्धा निवडणूक आयोगाने घरोघरी जाऊन नोंदणी केली आणि आतासुद्धा आयोगाने मतदार याद्या दुरुस्त केल्या आहेत," असे त्यांनी सांगितले.
राहुल गांधी बेचैन!
ते पुढे म्हणाले की, "कामठी विधानसभेत काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्या बुथवरून १७ हजार मतांची नोंदणी केली. निवडणूक आयोगाने घरोघरी फिरून उप-शहरी भागाची नोंदणी केली. कामठी विधानसभा ही उपनगरीय होत आहे. नागपूरचे लोक कामठी विधानसभेत राहायला येत असल्याने तिथली आकडेवारी नेहमी वाढते. ३ निवडणूकांमध्ये ३० हजार इतकी आकडेवारी वाढली आहे. त्यामुळे राहुल गांधी बेचैन झाले असून त्यांना मोदीजींच्या विकासाच्या अजेंड्यावर बोलता येत नाही. पुढचे १५ वर्षे त्यांना काहीही दिसत नसल्याने ते देशात आणि महाराष्ट्रात असा संभ्रम निर्माण करत आहेत. पण आताची जनता संभ्रमावर जगत नाही तर विकासाला मत देते. त्यामुळे आमचा पक्ष विकासाच्या मुद्यांवर लोकांकडे जात आहे. जोपर्यंत राहुल गांधी पराभवाच्या गडद छायेतून निघत नाहीत तोपर्यंत त्यांचा पक्ष वाढू शकत नाही," असेही ते म्हणाले.
कामठी विधानसभेचा मागच्या १५ वर्षांचा इतिहास बघा!
"राहुल गांधी अभ्यास न करता कुणाच्यातरी सांगण्यावरून काहीही बोलतात. त्यांचे आता पतनाचे दिवस असल्याने ते पिसाळले आहेत. मी २००९ चा संदर्भ दिला असून यावर त्यांनी बोलावे. २००९ ला ३० लाख मते कशी वाढली? यासाठी तुम्ही निवडणूक आयोगाला दोषी धरणार आहात का? निवडणूक आयोगावर आणि भाजपवर बोलणे सोडून त्यांनी वस्तुस्थिती तपासली पाहिजे. राहुल गांधींनी कामठी विधानसभेचा मागच्या १५ वर्षांचा इतिहास बघायला हवा. कामठी विधानसभेत सातत्याने मतदारांमध्ये वाढ होत आहे. राज्यात सातत्याने वाढ होणाऱ्या १५ विधानसभा असून राहुल गांधींनी त्याचा अभ्यास करावा," असा सल्लाही मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी राहुल गांधींना दिला.