गिरे तो भी टांग उपर असा हा प्रकार! राहुल गांधींच्या लेखावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टीका

    07-Jun-2025
Total Views | 25
 
Eknath Shinde & Rahul Gandhi
 
ठाणे : विधानसभा निवडणूकीमध्ये त्यांचे पानिपत झाले आहे. त्यामुळे गिरे तो भी टांग उपर असा हा प्रकार आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधींवर केली आहे. राहुल गांधींनी विधानसभा निवडणूकीवर घेतलेल्या आक्षेपावर त्यांनी प्रत्युत्तर दिले.
 
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "राहुल गांधींनी लोकसभेलासुद्धा असाच फेक नरेटिव्ह पसरवला होता. संविधान धोक्यात आहे, आरक्षण जाणार अशा खोट्या बातम्या पसरवून लोकसभेच्या निवडणूकांमध्ये त्यांनी मतदारांची दिशाभूल केली होती. आतासुद्धा विधानसभा निवडणूकांमध्ये मिळालेल्या मतांवर त्यांनी टीका केली आहे. विधानसभा निवडणूकांमध्ये जनतेना दिलेला जनादेश या देशाने पाहिला आहे. परंतू, राहुल गांधींना पूर्ण देश ओळखतो. ते कधी काही बोलतात, कधी कुणावर टीका करतात, विदेशात जाऊन देशाच्या प्रधानमंत्र्यांवर टीका करण्याचे काम ते करतात. विधानसभा निवडणूकीमध्ये त्यांचे पानिपत झाले आहे. त्यामुळे गिरे तो भी टांग उपर असा हा प्रकार आहे. देशात ज्यांची उरली नाही पत ते व्यक्त करतात आपलं मत मतावर," असा टोला त्यांनी लगावला.
 
हे वाचलंत का? -  मुंबईकरांनो सावधान! पुढील ३ ते ४ तासांत जोरदार पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून अलर्ट जारी
 
ते पुढे म्हणाले की, "राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा काढली, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ती यात्रा आली परंतू, महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे. महाराष्ट्रातील जनतेने पूर्णपणे महायूतीच्या बाजूने मतदान केले. लोकसभेला त्यांना जास्त जागा मिळाल्या तेव्हा त्यांनी तोंडातून ब्र काढला नाही. ते शांत राहिले. तेव्हा मतदार, निवडणूक आयोग हे सगळे बरोबर होते. विधानसभा निवडणूकांमध्ये महायूतीने पूर्ण नियोजनबद्ध पद्धतीने निवडणूका लढवल्या. अडीच वर्षात केलेल्या कामाची पोचपावती सगळ्यांनी भरभरून मतदान करून दिली. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे."
 
काँग्रेसने फक्त आणि फक्त राजकारण केले!
 
"गेले ५०-६० वर्षे काँग्रेसची राजवट असताना देशातील नागरिकांना काय मिळाले? कुठला विकास मिळाला? गरीबी हटाओ म्हणून गरीबी हटली नाही तर गरीब हटला. याऊलट मोदीजींनी जवळपास ३० कोटी लोकांना दारिद्र्यरेषेच्या वर आणले. ८० कोटी लोकांना अन्न देण्याचे काम केले. त्यांनी अनेक योजना केल्या आणि रोटी, कपडा, मकान देण्याचे काम केले. काँग्रेसने फक्त आणि फक्त राजकारण केले. राहुल गांधींच्या पक्षाची पत घसरली असून त्यांच्या पक्षात कुणीही राहायला तयार नाही. त्यांच्या अशा वागणूकीमुळे अनेक मोठमोठे नेते त्यांना सोडून गेले," अशी टीकाही त्यांनी केली.
 
जनता अपमानाचा बदला घेणार!
 
"काँग्रेस जेव्हा निवडणूका जिंकते तेव्हा मॅच फिक्सिंग नसते. तेव्हा निवडणूक यंत्रणा बरोबर असते. परंतू, त्यांच्या विरोधात निवडणूका लागल्यावर ही ओरड सुरु होते. मॅच फिक्सिंग म्हणणे हा महाराष्ट्रातील जनतेचा अपमान असून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांमध्ये जनता याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही," असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
 
 
 
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121