आकडेमोड नि डोकेफोड!

    22-May-2024
Total Views | 60
modi


 ‘इंडी’ आघाडीतील सर्व पक्षांमध्ये आत्मविश्वासच नसल्याने प्रत्येक पक्ष त्याच्या मनाला येईल, तसे दावे करीत आहे. पण, भाजपला नक्की किती जागा मिळतील, त्याबद्दल ‘इंडी’ आघाडीतीलच नव्हे, तर काँग्रेसमधील नेत्यांमध्येही एकवाक्यता नाही. आपल्या आघाडीचा दारूण पराभव होईल, याची ‘इंडी’ आघाडीतील नेत्यांना मनोमन खात्री आहे, याचे ते निदर्शकच म्हणावे लागेल.
 
लोकसभा निवडणुकीत मतदानाचे पाच टप्पे पार पडले असून, आतापर्यंत सुमारे 428 जागांवर मतदान पार पडले आहे. याचा अर्थ जवळपास 80 टक्के जागांवर मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता प्रत्येक पक्ष आपल्याला या टप्प्यापर्यंत किती जागा मिळतील, या आकड्यांचे दावे करू लागला आहे. सत्ताधारी पक्ष या नात्याने भाजपने निवडणुकीपूर्वीच यावेळी आपली ‘एनडीए’ आघाडी 400 जागांपेक्षा अधिक जागांवर विजय मिळवेल, अशी घोषणा केली होती. पाच टप्प्यांचे मतदान पार पडल्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दावा केला आहे की, आपल्या आघाडीने आता 310 जागांचा टप्पा पार केला आहे. उर्वरित दोन टप्प्यांतील मतदानात 400 जागांचा टप्पा पार केला जाईल.विरोधी ‘इंडी’ आघाडीतील एक पक्ष असलेल्या आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी या निवडणुकीत या आघाडीला 300 जागांवर विजय मिळेल, असे म्हटले आहे. त्याचवेळी राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी हाच आकडा 325 पेक्षाही अधिक असेल, असे म्हटले आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आकडेवारी दिली नसली, तरी भाजपला सत्तेवरून दूर करण्याइतक्या जागा आपल्या आघाडीला मिळतील, असा दावा केला आहे.

काँग्रेसचेच प्रमुख नेते राहुल गांधी यांनी यापूर्वी भाजप किती जागांवर जिंकेल, त्याची वेगवेगळी आकडेवारी दिली होती. आधी 180 जागांपासून प्रारंभ करीत आता त्यांनी म्हटले आहे की, भाजपला जेमतेम 120 जागा मिळतील. त्यांची बहीण प्रियंका गांधी यांनी भाजपला 150 जागा मिळतील, असे सांगितले होते. यापूर्वी, तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी भाजपला 230 जागा मिळतील, असे सांगितले होते, तर समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी भाजपला 140 जागाच मिळतील, असे सांगितले होते.एकंदरीतच या विरोधी पक्षांनाही भाजपला नेमक्या किती जागा मिळतील, ते ठरवता आलेले नाही. हा गोंधळ हेच या आघाडीचे खास वैशिष्ट्य. निव्वळ भाजपला सत्तेवरून दूर करणे, इतकाच या आघाडीचा उद्देश. त्यानंतर आपल्या आघाडीला किती जागी विजय मिळेल, या आघाडीच्या सरकारचे धोरण काय असेल, कोणते निर्णय घेतले जातील वगैरे कसल्याच तपशीलावर यापैकी एकाही नेत्याने आजवर भाष्य केलेले नाही. या आघाडीचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असेल, हेसुद्धा कोणीही सांगू शकत नाही. त्यामुळे केवळ ‘प्रचंड गोंधळलेली आघाडी’ असेच या आघाडीचे स्वरुप राहिले आहे. स्वाभाविकच मतदारांच्या मनातही यामुळे गोंधळ निर्माण झाला आहे आणि या आघाडीला का मत द्यायचे, असा प्रश्न त्याच्यापुढे उभा राहिला आहे.
 
त्याउलट भाजप नेते ‘400 पार’चा नारा सतत देत आहेत. अमित शाह यांनी तर दर टप्प्यानंतर भाजपला किती जागी विजय मिळाला आहे, त्याचे भाकितही करण्यास प्रारंभ केला आहे. काहीजणांच्या मते, हा फाजिल आत्मविश्वास आहे, पण निदान त्यांचे दावे सुसंगत तरी आहेत. अमित शाह सोडल्यास भाजपचे अन्य नेते आकडेवारीवर बोलताना दिसत नाहीत. त्यामुळे भाजपमध्ये तरी आपल्याला मिळणार्‍या जागांबाबत संभ्रम नाही, असे चित्र दिसते. आपल्या आघाडीला आणि भाजपला गेल्या निवडणुकीपेक्षा अधिक जागांवर विजय मिळेल, या आत्मविश्वासाचे दर्शन भाजप नेत्यांच्या वक्तव्यांतून घडते आणि त्यामुळे मतदारांना एक प्रकारचा दिलासा मिळतो. ‘एनडीए’चा नेता कोण आहे, याबाबतही प्रश्नचिन्ह नाही. मुळात मोदी हे जनमानसांच्या हृदयात विराजमान झाले असून, त्यांनाच पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी भाजपने ‘अब की बार मोदी सरकार’ची घोषणा दिली आहे. मतदारही मोदी यांच्याकडे पाहूनच मतदान करीत आहेत. 2019 मध्ये भाजपला 303 जागांवर विजय मिळाला होता. यावेळी त्यापेक्षा अधिक जागांवर भाजपला विजय मिळेल, याबद्दल भाजपसह अनेक राजकीय विश्लेषकांचेही एकमत आहे.
 
उर्वरित दोन टप्प्यांमध्ये ज्या जागांवर मतदान होणार आहे, त्या सर्व जागा उत्तर भारतातील आहेत. त्यात उत्तर प्रदेशमधील 27, दिल्लीतील सर्व सात, हिमाचलमधील चार, हरियाणातील दहा, झारखंडमधील सात, प. बंगालमधील उर्वरित 15, ओडिशातील उर्वरित 12, बिहारमधील 16 आणि पंजाबमधील सर्व 13 जागांवर मतदान होणार आहे. यातील दिल्ली, हिमाचल, हरियाणा यातील सर्व जागी भाजपला विजय मिळाला होता, तर उत्तर प्रदेशातील 27 पैकी 20 जागी विजय मिळविला होता. यावेळी 2019च्या तुलनेत भाजपला प. बंगाल आणि ओडिशा या राज्यांमध्ये वाढीव जागा मिळतील, असे भाकित बहुतांशी राजकीय विश्लेषकांनी केले आहे. त्या सार्‍याचा विचार करता एकंदरित सहावा टप्पा भाजपसाठी लाभदायकच असेल, यात शंका नाही. त्यामुळे भाजप आपल्या ‘400 पार’च्या घोषणेच्या जवळ जाऊन बसेल, अशीच चिन्हे आहेत.आपल्या कार्यकर्त्यांचे आणि आपल्या समर्थक मतदारांचे मनोबल उच्च राखण्यासाठी सर्वच पक्षांचे नेते आपल्याला विजय मिळणार असल्याचा दावा करतात, हे समजण्यासारखे आहे. पण, या दाव्याला थोडातरी वास्तवाचा आधार किंवा टेकू असेल, तरच मतदारांनाही त्याबद्दल विश्वास वाटू शकतो. दोनच दिवसांपूर्वी अखिलेश यादव यांनी दावा केला की, उत्तर प्रदेशातील सर्व 80 जागांवर आपली आघाडी विजयी होत आहे. त्यात अगदी वाराणसीच्या मतदारसंघाचाही समावेश आहे! म्हणजे वाराणसीतून नरेंद्र मोदी हे निवडणूक हरणार आहेत, असे अखिलेश सांगत आहेत. यासारख्या वक्तव्यांनी मतदारांचे मनोबल वाढेल, की अखिलेश यांच्या मानसिक स्थितीविषयी त्याच्या मनात शंका निर्माण होईल?‘इंडी’ आघाडी ही वेगवेगळी ठिगळे लावलेली गोधडी आहे. या आघाडीतील पक्ष म्हणजे सत्तालालसेच्या गोधडीला लावलेली वेगवेगळी ठिगळे आहेत. एका ठिगळाचा दुसर्‍याशी काहीही संबंध नाही. त्यातील कोणते ठिगळ कधी उसवेल आणि गोधडी सोडून बाहेर पडेल, याचाही भरवसा नाही!

 
राहुल बोरगांवकर

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121