मुंबई : अभिनेता सलमान खान (Salman Khan) याच्या गॅलेक्सी घराबाहेर दोन अज्ञान इसमांनी गोळीबार केला होता. याच प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमान खानची भेट घेतली. तसेच, त्यांनी या प्रकरणाबाबत तातडीने कारवाई करण्याचे निर्देश पोलीस (Salman Khan) पथकाला दिल्यानंतर दोन आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती देखील त्यांनी दिली होती. यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, “हा महाराष्ट्र आहे, इथे गँग वगैरे उरलेल्या नाहीत. आम्ही सर्व टोळ्या आणि गुंडांचा नायनाट करू”.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “महाराष्ट्रात गुंडगिरी चालू देणार नाही. सलमान खान आणि त्याच्या कुटुंबीयांना सुरक्षा पुरवण्याचे निर्देशही मी पोलिस आयुक्तांना दिले आहेत. आपल्या लोकांची काळजी घेणे हे कर्तव्य आहे”, असेही यावेळी शिंदे म्हणाले.
पुढे मुख्यमंत्री म्हणाले की, “सरकार तुमच्यासोबत आहे. हा हल्ला झाल्यानंतर तेव्हा मी पोलीस आयुक्ताना सूचना दिली होती की, लवकरात लवकर कारवाई केली जावी आणि हल्लेखोरांना अटक केली जावी. कालच भूज याठिकाणी विकी गुप्ता आणि सागर पाल यांना अटक करण्यात आली आहे. त्यांची पोलीस कोठडीत कसून चौकशी केली जाईल आणि या प्रकरणाच्या मुळाशी आम्ही जाऊ. जो यामध्ये सहभागी आहे, त्याच्यावर कठोर कारवाई होईल. कोणालाही सूट दिली जाणार नाही. पुन्हा मुंबईत अशी हिंमत केली जाणार नाही, अशी कारवाई केली जाईल”.
लॉरेन्स बिश्वोईबद्दल मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, “हा महाराष्ट्र आहे, ही मुंबई आहे. इथे आता कोणतीही गँग-टोळी नाही आहे. संपूर्ण अंडरवर्ल्ड आता संपले आहे. बिश्नोई-विश्नोईसारख्यांना आम्ही संपवून टाकू. पुन्हा त्यांची हिंमत होणार नाही, अशी कारवाई पोलीस करतील. हे मुंबई पोलीस आहे, महाराष्ट्र आहे... इथे आम्ही कोणाची दादागिरी सहन करणार नाही. कोणत्याही नागरिकाला त्रास सहन केला जाणार नाही. सलमान खान तर फिल्म इंडस्ट्रीतील लोकप्रिय चेहरा आहे. त्याच्या कुटुंबाची जबाबदारीही सरकारची आहे. कोणतीही गँग, कोणाचीही दादागिरी मुंबई-महाराष्ट्रात आम्ही चालू देणार नाही”, असे मुख्यमंत्री म्हणाले.