‘सुंदर मी होणार’च्या निमित्ताने विद्याधर जोशी पुन्हा रंगमंचावर!

    10-Jun-2025   
Total Views | 5

vidyadhar joshi is back on stage on the occasion of sunder me hoonar



मुंबई : दीर्घ आजार, हॉस्पिटलायझेशन आणि शरीरातला थकवा या सगळ्यांनी काही काळ रंगभूमीपासून दूर गेलेले ज्येष्ठ अभिनेते विद्याधर जोशी म्हणजेच बाप्पा जोशी आता पुन्हा एकदा नाटकाच्या प्रेमात पूर्णपणे बुडाले आहेत. पु.ल. देशपांडे यांच्या 'सुंदर मी होणार' या नाटकाच्या नव्या सादरीकरणातून ते रंगभूमीवर येत आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वासच प्रेक्षकांसाठी मोठी आश्वासक गोष्ट आहे.

|
"माझ्याकडे जेव्हा या नाटकासाठी विचारणा झाली, तेव्हा मी ते नाटक कधी पाहिलेलं नव्हतं… वाचलेलंही नव्हतं. फक्त इतकं ऐकलं होतं की, पुलंचं हे एक अत्यंत गाजलेलं आणि नाट्यपूर्ण संवादांनी सजलेलं नाटक आहे. आणि हो यात डॉ. लागूंनी केलेली भूमिका मला करायची आहे, हे कळल्यावर मी क्षणभर थबकलो. कारण त्या भूमिकेची मोठी जबाबदारी आपल्यावर येते आहे, हे जाणवलं. मग मी संहिता वाचली… आणि ती भूमिका स्वीकारली," विद्याधर जोशी सांगताना त्यांच्या आवाजात संयम होता, पण उत्साहही तेवढाच ठळक होता.

आजारानंतर रंगमंचावर परतणं हे फक्त शारीरिक नव्हे, तर मानसिक सामर्थ्याचंही मोठं परीक्षण असतं. त्यांच्या मनातही ही शंका डोकावत होतीच. "थोडीशी भीती होती, आजारातून बाहेर आल्यावर नाटक झेपेल का? तालमी करायला जमतील का? असे अनेक प्रश्न माझ्या मनात सुरू होते. पण दिग्दर्शक राजेश देशपांडे आणि निर्माते यांना मी माझी तब्येतीची माहिती दिली. त्यांनीही पूर्ण समजून घेतलं आणि मला प्रोत्साहन दिलं," असं सांगताना ते स्पष्ट करतात की, ही संधी त्यांच्या मानसिक पुनर्बलनासाठी फार मोठी ठरली.

"नाटकाशी पुन्हा जोडल्यामुळे 'रोज तेच तेच विचार करणं, आजारावरचं लक्ष केंद्रीत होणं' थांबलं. तालमी सुरू झाल्यावर, रोज नवीन संवाद, पात्रांचं आकलन, त्यांच्यातली गुंतागुंत… यातच माझं मन गुंतून गेलं. आणि आजारी शरीरासाठी, मानसिक आनंद हेच खरं औषध असतं," जोशी अतिशय प्रामाणिकपणे सांगतात.

'सुंदर मी होणार' या नाटकात ते एका संस्थानिक घराण्याच्या फॅमिली डॉक्टरची भूमिका साकारत आहेत जो त्या घरातील चार मुलांना लहानपणापासून वाढवतो, त्यांच्यावर वडिलांप्रमाणे अपार प्रेम करतो आणि त्यांचं भलं व्हावं यासाठी अनेक वेळा स्वतःचा अपमानही गिळतो. ही भूमिका म्हणजे त्याग, प्रेम आणि माणूस म्हणून जगणं काय असतं याचा अत्यंत हळुवार आणि प्रभावी नमुना आहे.

या भूमिकेच्या निमित्ताने विद्याधर जोशी जवळपास सहा ते सात वर्षांनी रंगमंचावर परतत आहेत. "कोविडपूर्वी मी ‘कुत्ते कमीने’ हे शेवटचं नाटक केलं होतं. त्यानंतर आजार, उपचार, विश्रांती…! पण आता, ‘सुंदर मी होणार’च्या निमित्ताने, मी पुन्हा रंगमंचावर कलाकृती सादर करणार आहे, हीच माझ्यासाठी खऱ्या अर्थाने पुनरागमनाची खूण आहे," ते समाधानाने सांगतात.

हे पुनरागमनही काही साधं नाही. पु. ल. देशपांडे यांचा २५ वा स्मृतिदिन आणि सुनीताबाई देशपांडे यांचं जन्मशताब्दी वर्ष या दोन महत्त्वाच्या संधींच्या निमित्ताने हे नाटक पुन्हा सेलिब्रिटी संचात सादर होत आहे. पुलंचेच 'ती फुलराणी' आणि वसंत कानेटकर यांचं 'हिमालयाची सावली' यांसारख्या नाटकांचं यशस्वी दिग्दर्शन केलेल्या राजेश देशपांडे यांनी या नाटकाचे आव्हान पेलले आहे. त्यामुळे त्यांच्या रंगमंचावरील जाणिवा आणि अनुभव या नाटकात स्पष्ट जाणवणार, यात शंका नाही. या नव्याने सादर होणाऱ्या सेलिब्रिटी संचात विद्याधर जोशी यांच्याबरोबर आस्ताद काळे, अभिजीत चव्हाण, स्वानंदी टिकेकर, श्रुजा प्रभुदेसाई आणि अमोल बावडेकर यांच्यासारखे भूमिकेला न्याय देणारे कलाकार आहेत. तसेच सृजन देशपांडे, श्रुती पाटील, विराजस ओढेकर हे नव्या दमाचे कलाकार त्यांना साथ करतील. ‘सुंदर मी होणार’ नाटकाची निर्मिती आकाश भडसावळे आणि करण देसाई यांनी केली असून, पहिला प्रयोग १२ जून रोजी पुण्यात आणि त्यानंतर १३ जून रोजी मुंबईत सादर होणार आहे.

विद्याधर जोशी सांगतात, "पूर्वी होऊन गेलेल्या कोणत्याही नाटकाचा प्रयोग असो, तो माझ्यासाठी नवाच असतो. त्यामुळे मी त्याला नेहमीच नवीन नाटकाकडे बघावं तसं बघतो. त्यामुळे एक्साइटमेंट तीच असते पण यावेळी ती थोडी अधिक आहे, कारण मी पुन्हा माझ्या अत्यंत प्रिय जगात परतलोय ... आणि याचं मला आत्मिक समाधान आहे."

आपल्या अभिनय कौशल्याने विविध भूमिकांत रंग भरणारे विद्याधर जोशी अर्थात बाप्पा जोशी यांचे रंगभूमीवरील पुनरागमन रसिक प्रेक्षकांसाठी नक्कीच नवे काहीतरी देणारे ठरेल.


अनिरुद्ध गांधी

ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
डिजिटल व्यवहारविश्वात हवे सायबर खबरदारीचे भान

डिजिटल व्यवहारविश्वात हवे सायबर खबरदारीचे भान

जगभरात भारताच्या डिजिटल प्रगतीची प्रशंसा केली जाते. ‘युनिफाईड पेमेंट इंटरफेस’ (यूपीआय)ची सेवा जगभरातील काही देशांनी स्वीकारली आहे. भारताची डिजिटल क्षेत्रातील ही प्रगती विकसित भारताच्या दिशेने टाकलेले हे स्मार्ट पाऊल म्हणावे लागेल. मोदी सरकारला नुकतीच ११ वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, सरकारच्या अनेक उपलब्धींपैकी एक असलेल्या डिजिटल व्यवहार प्रणालीचेही विशेषत्वाने कौतुक करण्यात आले. पण, अशापद्धतीने व्यवहार करताना बँक ग्राहकांनी ‘यूपीआय’ आणि ‘डिजिटल वॉलेट’ पेमेंट सिस्टममधील फरक समजून घेण्याबरोबरच खबरदारी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121