लेखकांच्या हक्कांसाठी 'मानाचि' संघटनेचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्याकडे निवेदन!

    11-Jun-2025   
Total Views | 9



manachi organization submits a statement to culture minister ashish shelar for the rights of writers


मुंबई : मराठी मालिका, नाटक व चित्रपट क्षेत्रातील लेखकांच्या व्यावसायिक व सामाजिक हक्कांसाठी कार्यरत असलेल्या ‘मानाचि’ लेखक संघटनेने राज्याचे सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार यांची भेट घेऊन लेखकांच्या समस्या व मागण्या मांडल्या. संघटनेचे अध्यक्ष विवेक आपटे, प्रसिद्ध लेखक पुरुषोत्तम बेर्डे, राजीव जोशी, आशिष पाथरे, डॉ. अलका नाईक यांनी मंत्रीमहोदयांसमोर सविस्तर निवेदन सादर केले.
लेखकांच्या विविध मागण्यांवर चर्चा करताना मंत्री शेलार यांनी लेखकांवर होणारा अन्याय लक्षात घेत, “हे सर्व मुद्दे आपण चर्चेतून सोडवू,” अशी ग्वाही दिली. तसेच त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्याचे आश्वासन दिले असून, संघटनेच्या निवेदनावरही सकारात्मक टिप्पणी केली आहे, अशी माहिती अध्यक्ष विवेक आपटे यांनी दिली.

लेखकांच्या मागण्या थोडक्यात:
1. शीर्षकावर लेखकाचा हक्क:
सध्या नाट्य, मालिका किंवा चित्रपटाच्या शीर्षकावर लेखकाचा स्वामित्व हक्क राहत नाही. निर्माते हे शीर्षक स्वतःच्या नावावर नोंदवून ते विक्रीस ठेवतात. त्यामुळे, लेखकास स्वतःच्या सुचवलेल्या शीर्षकाचे रजिस्ट्रेशन करायची स्वतंत्र सोय असावी.
2. गीत, संवाद वा कविता वापरल्यास श्रेय व मानधन द्यावे:
मालिकांचे शीर्षक कविता किंवा गीतांतील ओळींवर आधारित असते, पण मूळ लेखकास ना श्रेय मिळते ना मानधन. यासाठी श्रेयनामावलीत उल्लेख व वन टाइम पेमेंट अनिवार्य करावे.
3. संघटनेला कार्यालय व उपक्रमांसाठी जागा उपलब्ध करून द्यावी:
मानाचि संघटनेसाठी साहित्यिक उपक्रम, कार्यशाळा, बैठका यासाठी सुमारे १०० लोकांची क्षमता असलेली जागा — उदाहरणार्थ रवींद्र नाट्य मंदिर किंवा पु. ल. देशपांडे अकॅडमीसारख्या शासकीय ठिकाणी — विनामूल्य किंवा अत्यल्प दरात द्यावी.
4. लेखकाचे मानधन पूर्ण झाल्याशिवाय सेन्सॉर सर्टिफिकेट न देणे:
चित्रपटांच्या सेन्सॉर सर्टिफिकेट प्रक्रियेत लेखक व गीतकारांचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ बंधनकारक करावे, जे फक्त मानधन पूर्ण झाल्यावर दिले जाईल.
5. कॉपीराईट नोंदणीची सुविधा मुंबईत उपलब्ध करावी:
सध्या केवळ दिल्लीमध्ये होणाऱ्या कॉपीराईट व IP राईट्स रजिस्ट्रेशनसाठी मुंबईतही सुविधा उपलब्ध करून द्यावी.
6. वृद्ध व अपंग लेखकांसाठी विमा व पेन्शन योजना सुरू करावी:
शासनाच्या सहकार्याने मानाचि संघटनेच्या मदतीने गरजू लेखकांची पात्रता तपासून त्यांना विमा संरक्षण व पेन्शन मिळेल, अशी योजना कार्यान्वित करावी.

लेखक संघटनेची भूमिका
२०१६ पासून नोंदणीकृत संस्थेप्रमाणे कार्यरत असलेल्या ‘मानाचि’ संघटनेने आजवर मराठी साहित्य, रंगभूमी व चित्रपट माध्यमात सक्रिय असलेल्या अनेक लेखकांच्या हितासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. संवाद आणि समन्वयाच्या माध्यमातून लेखकांना न्याय मिळवून देणे हा या संघटनेचा मूळ उद्देश आहे.


अनिरुद्ध गांधी

ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121