मुंबई : 'द काश्मीर फाइल्स' आणि 'द ताश्केंत फाइल्स' सारख्या गाजलेल्या चित्रपटांनंतर दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री त्यांच्या 'फाइल्स ट्रिलॉजी' तील शेवटच्या चित्रपटासह पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यांच्या आगामी चित्रपट ' द बंगाल फाइल्स' चा टीझर गुरुवारी १२ जूनला अधिकृतपणे प्रदर्शित झाला. या टीझरने काही तासांतच प्रेक्षकांमध्ये खळबळ उडवून दिली असून, सोशल मीडियावर चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे.
पूर्वी 'द दिल्ली फाइल्स: द बंगाल चैप्टर' या नावाने ओळखला जाणारा हा चित्रपट आता थेट 'द बंगाल फाइल्स' या नव्या नावाने प्रदर्शित होणार आहे. यामागचे कारण म्हणजे प्रेक्षकांच्या भावना. दिग्दर्शकाने याबाबत एक मत मतदान घेतले होते, त्यात तब्बल ९९ टक्के लोकांनी 'द बंगाल फाइल्स' हे शीर्षक पसंत केले. त्यामुळे चित्रपटाच्या आशयाशी अधिक सुसंगत आणि प्रभावी ठरेल, म्हणून हे नाव बदलण्यात आले.
टीझरमध्ये एक अत्यंत विचार करायला लावणारा संवाद आहे "मी एक काश्मीरी पंडित आहे, म्हणून ठामपणे सांगू शकतो की बंगाल हे दुसरं काश्मीर बनत चाललं आहे." या संवादातून चित्रपटाचा गंभीर आणि सामाजिक वास्तवावर भाष्य करणारा स्वर प्रकट होतो. टीझरमध्ये १९४०च्या दशकात अविभाजित बंगालमध्ये घडलेल्या 'डायरेक्ट अॅक्शन डे' आणि 'नोआखाली दंगली' यांसारख्या ऐतिहासिक घटनांचा मागोवा घेतला जाणार असल्याचे स्पष्ट होते.
चित्रपटात मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर, पल्लवी जोशी आणि दर्शन कुमार यांच्यासारखे दिग्गज कलाकार भूमिका साकारत आहेत. चित्रपटाचे लेखन स्वतः विवेक अग्निहोत्री यांनी केले असून, अभिषेक अग्रवाल आणि पल्लवी जोशी यांनी त्याची निर्मिती केली आहे.
टीझर प्रदर्शित होताच ट्विटर, यूट्यूब आणि इतर सोशल प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांचा अक्षरशः पूर आला. एका युजरने लिहिले "It hits like a bomb, shaken my soul to the core!", तर दुसऱ्याने म्हटले "Waiting for this one!" अनेक प्रेक्षकांनी बंगालमधील विस्मरणात गेलेल्या इतिहासावर प्रकाश टाकल्याबद्दल दिग्दर्शकाचे कौतुक केले.
'द बंगाल फाइल्स' हा चित्रपट ५ सप्टेंबर २०२५ रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. "If Kashmir hurt you, Bengal will haunt you" असा दावा करणारा हा चित्रपट पुन्हा एकदा विवेक अग्निहोत्रींच्या ठाम आणि धारदार शैलीत एक विसरलेला इतिहास जनतेसमोर उभा करणार आहे, अशी चर्चा चित्रपटसृष्टीत सुरू झाली आहे.
ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.