संन्यास संस्कार (पूर्वार्ध)

    14-Feb-2024
Total Views | 68
Vedic Culture

वैदिक संस्कृती ही भोगाकडून त्यागाकडे व प्रवृत्तीकडून निवृत्तीकडे नेणारी आदर्श संस्कृती मानली जाते. आश्रम व्यवस्थेचा उद्देशचदेखील तितकाच उदात्त आहे. ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम हे मानवी जीवनाच्या प्रवासाचे चार टप्पे आहेत. शेवटचा संन्यास हा टप्पा सर्वोच्चस्थानी मानला जातो. वानप्रस्थाश्रमानंतर क्रम येतो, तो संन्यासाचा!


सर्वस्वाचा होम म्हणजेच संन्यास!
वेदान्तविज्ञानसुनिश्चितार्था:
संन्यासयोगाद्यतय: शुद्धसत्वा:।
ते ब्रह्मलोकेषु परान्तकाले
परामृता: परिमुञ्चन्ति सर्वे ॥
(मुंडक उपनिषद-२/६)

अर्थ
 
जे लोक परमेश्वर प्रतिपादक वेदमंत्रांचा खरा अर्थ पूर्णपणे जाणणारे असतात, जे सदाचारीआहेत आणि जे संन्यासयोगाने निश्चितपणे शुद्ध अंतकरणयुक्त संन्यासी बनलेले असतात, ते परमेश्वरांमध्ये असलेल्या मुक्तीच्या सुखाला प्राप्त होतात. त्या सुखाचा उपभोग घेतल्यानंतर मुक्तीच्या सुखाचा अवधी पूर्ण होतो. तेव्हा तेथून सुटून ते जगात परत येतात.उपनिषदाच्या या वरील श्लोकात संन्यास्याची कर्तव्ये सांगितली आहेत. संन्यास हा शेवटचा आश्रम आहे. संन्यास धर्माचे पालन करणारे परिव्राट् किंवा संन्यासी हे खर्‍या अर्थाने समाज व देशाचे मार्गदर्शक असतात. त्यांच्या प्रबोधनाने समाजातील सामान्य अज्ञ लोकांना सन्मार्गावर येण्याकरिता दिशाबोध होऊन सर्वांचे जगणे सुकर होते. म्हणूनच संन्यासी हा सर्वांसाठी वंदनीय असलेला सर्वोच्च आदरणीय असा प्रतिष्ठित समाज घटक आहे.वैदिक संस्कृती ही भोगाकडून त्यागाकडे व प्रवृत्तीकडून निवृत्तीकडे नेणारी आदर्श संस्कृती मानली जाते. आश्रम व्यवस्थेचा उद्देशचदेखील तितकाच उदात्त आहे. ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम हे मानवी जीवनाच्या प्रवासाचे चार टप्पे आहेत. शेवटचा संन्यास हा टप्पा सर्वोच्चस्थानी मानला जातो. वानप्रस्थाश्रमानंतर क्रम येतो, तो संन्यासाचा! खरे तर मानव अगदी निसर्गरम्य वातावरणात जगू इच्छितो. त्याला स्वच्छंदी बनून अगदी मुक्तपणे जगावे वाटते. ब्रह्मचर्याश्रम म्हणजेच वनातीलरम्य ठिकाणी वसलेले गुरुकुल आचार्यांच्या सान्निध्यात राहून ब्रह्मचारी अगदी निसर्गाच्या वातावरणात वावरतो.


वेदादी शास्त्रांचे पठण करीत शरीर, मन व बुद्धीचा विकास साधतो. थोडक्यात ब्रह्मचर्य म्हणजेच सद्गुण, ज्ञान, विद्या, बुद्धी व बल यांच्यात वाढ करण्याचा सुवर्णकाळ, ज्यांच्याकडून जे काही मिळेल, ते घ्यावयाचे अर्थातच सद्गुणांची बेरीज करणे होय. हे सर्व कशासाठी? तर भविष्यात इतरांना देण्यासाठी देण्याचा आश्रम आहे, तो गृहस्थाश्रम! जे काही मिळवले, त्यातून समाज व राष्ट्रासाठी वजा करणे. जगाला आदर्श संतती (प्रजा) देणे, पंचमहायज्ञाच्या अनुष्ठानाने इतरांचे सर्वहित साधणे, गरजूंना धन व इतर वस्तूंचे दान करणे, म्हणजेच वजाबाकी हे गृहस्थाश्रमाचे मौलिक तत्व गृहस्थाश्रमात प्रवेश करणे म्हणजे कायमस्वरूपी त्यातच गुंतून राहणे नव्हे, मुळात या आश्रमातून त्या आश्रमात चालत राहणे, अशीही पुढे वळण्याची व प्रगतीची शृंखला चालू राहिलीच पाहिजे. ती खंडित होता कामा नये. गृहस्थाश्रमातील प्रवेश हा कर्तव्ये संपल्यानंतर योग्यकाळी त्यातून बाहेर पडण्यासाठीच असतो. त्यातच अडकून राहणे हे कदापि योग्य नव्हे, बाहेर पडलेच पाहिजे. त्यासाठीच तर पुढील आश्रम आहे वानप्रस्थ! जे काही ज्ञान व विद्या मागील दोन्ही आश्रमात मिळाले, त्यांच्यात वृद्धी करणे अर्थातच गुणाकार करणे म्हणजे वानप्रस्थाश्रम, तर शेवटी आपल्या या वृद्धिंगत झालेल्या ज्ञानाला समाज व राष्ट्राकरिता वितरित करणे. त्यात आणखीन वाढ करणे म्हणजे संन्यास. प्राप्त गुणांना व ज्ञानाला भागणे अर्थातच त्यांचा भागाकार करणे म्हणजेच संन्यास!संन्याशाकरिता परिव्राट्, परिव्राजक, यति, स्वामी अशी इतर नावेही आहेत. ‘सं + न्यास’ म्हणजेच (चांगल्या प्रकारे) ठेवणे, स्थापन करणे, जमविणे किंवा त्यागणे संन्यास आश्रमात प्रवेश करणे म्हणजे मानवाने स्वतःला संसारापासून दूर ठेवणे, मायामोहाचा त्याग करणे होय. शास्त्रग्रंथात म्हटले आहे - काम्यानां कर्मणां च न्यास इति संन्यास:!काम्य कर्मांचा न्यास म्हणजेच परित्याग हेच संन्यास होय. महर्षी दयानंद संस्कारविधी ग्रंथात म्हणतात - संन्यास संस्कार त्यालाच म्हटले जाते, ज्याद्वारे मोह इत्यादी आवरणे, पक्षपात इत्यादींना सोडून व वैरागी होऊन माणसाने संपूर्ण पृथ्वीवर परोपकारासाठी विचरण करणे!
 
आजकाल संन्यास आश्रमाचा
 
हाच अभिप्राय घेतला जातो की, माणसाने सर्व काही सोडून एके ठिकाणी निवांत बसावे. काहीच काम न करता सर्वांपासून दूर राहावे. समाज व राष्ट्राच्या हिताचा विचार न करता ‘ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या’ असे म्हणत निवांतपणे जगत राहायचे. अशा आळशी व कर्महीन संन्याशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसते, जे की काहीच करीत नाहीत. केवळ तीर्थस्थळी इकडे तिकडे भटकत राहणे हा संन्यास धर्म नव्हे, त्याग करणे म्हणजे जगाचा त्याग करणे नव्हे, तर आपल्यामध्ये दडलेल्या नाना प्रकारच्या अनिष्ट प्रवृत्तींचा त्याग करणे. संन्यास हे बाह्य नव्हे, तर आंतरिक चिन्ह आहे. केवळ घरादाराचा त्याग करण्याला संन्यास म्हणत नाहीत, तर राग-द्वेष, काम-क्रोध, लोभ-मोह आणि ममत्व भावनेचा त्याग करून स्वतःला समाजसेवेत स्थापित करणे, जोडणे किंवा वाहून घेणे यालाच तर ‘संन्यास धर्म’ म्हणतात.संन्यासी होणे म्हणजे संकीर्णतेचा परित्याग व आत्मभावनेचा विस्तार, संन्यास धारण केलेली व्यक्ती ही आता आपल्याच एका कुटुंब, गाव व देशापर्यंत मर्यादित राहत नाही, तर आता ती सार्‍या जगाची बनते. जगाचा प्रत्येक मानव हा त्याचा बांधव, सारी मुले ही त्याची संतती आणि संपूर्ण विश्व हे त्याचे घर बनते. थोडक्यात, ‘वसुधैव कुटुम्बकम्’ ही भावना संन्याशाच्या मनात निर्माण झालेली असते. सर्व प्रकारच्या स्वार्थांचा बुद्धीचा त्याग करून तो परोपकारी बनतो आणि खालील सुभाषित हे त्याच्या जीवनाचे बोधवाक्य बनते-

अयं निज: परो वेति गणना लघुचेतसां।
उदारचरितानां तु वसुधैव कुटुम्बकम्॥

समाजातील प्रत्येक घटकांचा तो सोबती बनतो. सर्वांना सत्य वैदिक ज्ञानाचा उपदेश करणे, त्यांचा प्रेरक, मार्गदर्शक बनून त्यांना नानाविध अंधश्रद्धा व रूढी परंपरेच्या विळख्यातून बाहेर काढणे. तसेच, नेहमी परिभ्रमण करीत व्यक्ती, कुटुंब, समाज व राष्ट्राच्या समस्यांना सोडविण्याचा प्रयत्न करणे, हाच खरा संन्यासाचा धर्म होय. समाजात घडणार्‍या अनिष्ट घटना पाहून ज्याच्या मनात कळवळा निर्माण होतो, तो खरा संन्यासी दीन-दु:खितांचे दुःख पाहून ज्याचे मन हेलावूनजाते, तोच संन्यासी धनाच्या अभावी दारिद्य्राच्या दुश्चक्रात अडकलेल्या गरीब बांधवांची उपासमार पाहून जो दुःखी होतो, तो संन्यासी प्रतिकूल परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित असलेल्या बुद्धिमान विद्यार्थ्यांना तन-मन-धनाने सहकार्य करण्यास तत्पर असतो, तो संन्यासी! आपल्या अमूल्य अशा प्राणांची समिधा बनवून समाज व राष्ट्राच्या होमकुंडात स्वतःला आहुत करणारा खरा संन्यासी असतो. थोडक्यात, संन्यासी होणे म्हणजे केवळ भगवी वस्त्रे धारण करणे नव्हे, तर त्याचा प्रत्येक क्षण हा समाज व राष्ट्राच्या कल्याणासाठी समर्पित झालेला असावा. आपला देश अशा थोर संत, साधू व संन्यास्यांमुळेच विश्ववंद्य ठरला आहे.


- प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य
 

 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121