सूत्रसंचालक, मुलाखतकार आणि निरूपणकार अशा विविध भूमिका बजावणार्या ऋतुजा फुलकर यांची कलाप्रांतांत मुशाफिरी सुरु आहे. त्यांच्या या बहुपेडी प्रवासाविषयी...
अनेकविध कलाप्रकारांत सक्रिय राहून, वाटचाल करणार्यांपैकी एक प्रमुख नाव म्हणजे ऋतुजा फुलकर. आजवर संगीत, नृत्य, राजकीय अशा वेगवेगळ्या विषयांवर आधारित साधारण ५००च्या वर कार्यक्रमांत ऋतुजा फुलकर झळकल्या आहेत. त्या सूत्रसंचालक, मुलाखतकार, निरूपणकार आहेतच, त्याशिवाय लेखन, दिग्दर्शन, अभिनय, चित्रकला व संगीत अशा वेगवेगळ्या कलाप्रांतांतही त्यांची मुशाफिरी तितकीच दखलपात्र...
’मुंगी उडाली आकाशी’, ’कथा सप्तशृंगीची’, ’संत बाळूमामा’ या व्हीसीडी फिल्मसमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. नाटक, एकांकिका यांच्यात कायमच सहभाग राहिला आहे. त्यांनी ’सिग्नेचर’ या लघुपटात प्रमुख भूमिका केली. त्यानंतर एका चित्रपटासाठी ‘क्रिएटिव्ह हेड’ पदाची जबाबदारी सांभाळली. एका लघुपटाचे दिग्दर्शन नुकतेच पूर्ण झाले आणि दोन फिचर फिल्मवर त्यांचे काम सुरू आहे. या सगळ्यांसोबत ’राजू फुलकर्स फिल्म अकॅडमी’च्या अंतर्गत विद्यार्थ्यांना अभिनय, लेखन याचे मार्गदर्शन करणे सुरू आहे. शिवाय सुधीर मोघे आणि ग. दि. माडगूळकर यांच्या अनुषंगाने मराठी चित्रपट गीतांच्या अभ्यासावर त्यांचे ’एमफील’साठी संशोधनही सुरू आहे.
ऋतुजा यांनी आजवर १५०च्या वर कवितांचे लेखन केले आहे. चित्रपट गीतांच्या लेखनाची जवळपास शतकी वाटचाल आहे. नामवंत गायक कलाकारांनी त्यांची गीते गायलेली आहेत. त्यांच्या स्वतःच्या कवितांचे आणि अनेक साहित्यिकांच्या साहित्याच्या अभिवाचनाचे अनेक कार्यक्रम झाले आहेत. चित्रकारी आणि गायनाची आवड आहे. चित्रकलेमध्ये राष्ट्रीय पातळीवरचा पुरस्कार त्यांनी प्राप्त केला आहे. संगीताचा अभ्यास, मार्गदर्शन घेणे सुरू आहे. पंडित मुकुल शिवपुत्र यांच्याकडून देखील त्यांना काही काळापूर्वी मार्गदर्शन घेता आले. तानपुरा संगतदेखील करता आली. आकाशवाणीवर ’युवावाणी’ तसेच मराठी विषयाच्या काही चर्चासत्रांमध्ये मुलाखती अशा अनेक कार्यक्रमांमधून त्यांचा पूर्वीपासून सतत सहभाग राहिला आहे. त्यांचा कला क्षेत्रातला असा वैविध्यपूर्ण अनुभव आणि अभ्यासाचा एवढा माहितीपट आपल्यापुढे उलगडत जातो, तेव्हा साहजिकच प्रश्न पडतो, या सगळ्याची सुरुवात कशी आणि कुठून झाली.
मोठ्या कलाकारांच्या घरात जन्माला आल्याबद्दल, ऋतुजा स्वतःला भाग्यशाली मानतात. कविता ही त्यांची लहानपणापासूनची आवड. त्या कवितेला आपली जीवाभावाची मैत्रिण म्हणतात. त्यांचा व्यावसायिकदृष्ट्या पहिला प्रवास सुरू झाला, तर तो गीतकार म्हणूनच. लहानपणापासून त्या कविता करतात. कवितेला चाल लावून, त्याचे गाणे होते, हे लहानपणी आईने सांगितले होते. मी मोठी होऊन पिक्चरमधल्या कविता लिहिणार असे सांगायचे, अशी आठवणही त्या सांगतात.
आईचा मोठा पाठिंबा आणि वडिलांचा मोठे कलाकार म्हणूनही प्रचंड आधार त्यांना मिळाला. ऋतुजा आपल्या जडणघडणीचे सर्व श्रेय आई-वडिलांना देतात. त्यांचे वडील राजू फुलकर हे चित्रपट दिग्दर्शक. ‘गाढवाचं लग्न’ हा त्यांचा गाजलेला चित्रपट. त्याशिवाय संतांवरती त्यांनी जवळजवळ ४० चित्रपट केले. एक चांगले चित्रकारदेखील असलेल्या वडिलांच्या रुपाने, त्यांना घरातच एकाच व्यक्तीत किती कलागुण असावेत, याचे मूर्तिमंत उदाहरण पाहायला मिळाले.
आज त्या सूत्रसंचालक, मुलाखतकार निरूपणकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यासाठी तयारी करताना त्या दोन भाग करतात. पहिला भाग तांत्रिक तयारीचा. ज्यात संबंधित व्यक्ती, विषय हे माहिती करून घेण्याचा भाग येतो. दुसरा भाग विषयाची पूर्वतयारी. ती करताना मात्र आतमध्ये मुरलेला त्या विषयाचा अभ्यास कामी येतो, त्यातले संदर्भ आपल्याही नकळत येतात, असा त्यांचा अनुभव. अभ्यास म्हणजेच ‘अभि अधिक आयास.’ तांत्रिक पातळीवरची प्रक्रिया लवकर पूर्ण होऊ शकते; मात्र अभ्यासाच्या विषयाची ‘आस’च लागावी लागते. तो अभ्यास निरंतरपणे, संवेदनशीलतेने चालू असला, तर तो ऐनवेळी देखील आतून उमटतो, असा अनुभव त्यांनी सांगितला.
आगामी काळात त्या एक वेगळा रंगमंचीय आविष्कार घेऊन येणार आहेत. त्याचबरोबर दोन चित्रपटांवर त्यांचे काम सुरू आहे. दोन्ही संशोधनाचे विषय आहेत. ऐतिहासिक संदर्भ शोधणे, त्यासाठी संबंधित मंडळींना भेटणे असे सुरू आहे. त्यात लेखन आणि दिग्दर्शन अशा दोन्ही भूमिकांमधून त्या समोर येत आहे. त्याशिवाय लहान मुलांसाठी एक पुस्तक घेऊन येत आहेत. मुलांसाठी एक छोटी मेजवानी घेऊन यायचा विचार आहे, त्या पुस्तकावरती काम सुरू आहे.
पुढच्या वाटचालीसाठी माणसाने खूप ठरवायला हवे, असे त्यांचे मत नाही. आपल्याला कलासक्त राहायचे आहे. आस्वादकाच्या भूमिकेतच जगायचे आहे, हे त्यांनी निश्चित केले आहे. बा. भ. बोरकरांनी ‘पावलापुरता प्रकाश’ म्हटले आहे. तुमच्या पावलापुरता आश्वासक प्रकाश आहे ना, तर पुरे! पावलावरती विश्वास आहे. ”मी कुठल्या ना कुठल्या कला प्रकारात राहीन, हे १०० टक्के सांगू शकते. आज लेखन, दिग्दर्शन करते आहे; पण पुढे कधी रंगांचा ब्रश हातात घेईन, हे सांगता येत नाही.” त्यांच्या पुढील वाटचालीत आश्वासक प्रकाशाचे दीप तेजाळत राहोत, यासाठी मनस्वी शुभेच्छा!
मनोज तुळपुळे