तुम मुझे यूं भुलाना पाओगे...

    23-Dec-2024
Total Views | 135
Mohammad Rafi

स्व -रंजयति -इति स्वर: ( स्व. मोहम्मद रफी -१०० वा जन्मदिन.) मोहम्मद रफीच्या ( Mohammad Rafi ) गायकीचे तांत्रिक, शास्त्रीय व लौकिकार्थाने केलेले वर्णन.

"राजा कालस्य कारणम " या धर्तीवर जुन्या काळातील शास्त्रीय संगीतातील दिग्गज "कै. गोविंदराव टेंबे" यांनी "सिनेमा संगीतस्य कारणम"असे म्हंटले होते. शब्द आणि स्वरांनी सिनेसंगीत बनते. त्यातही जिथे वैखरी संपते तिथे सूर सुरु होतात. आर्तता हा स्वरांचा मुख्य गुण आहे. प्रत्येक गायक आपल्या विशिष्ठ लकबीने स्वरांची अभिव्यक्ती वा आविष्कार प्रगट करीत असतो, व शब्दातील भावनांना न्याय देतो. रफीची गायकी केवळ रंजक नव्हती तर त्यातील रंजन ऐहिक सुख मिळवून द्यायचे.

स्वरनिर्मितीची मोहम्मद रफीची चिकित्सा सूक्ष्म, नि:संदिग्ध आणि शास्त्रीय होती. ते चतुरस्त्र गायक होते. त्यांचा आवाज मोकळा, स्वच्छ, भरीव व घुमारेदार होता. आकारयुक्त आलापिबद्दल कोणत्याही त्यांनी गायलेल्या गाण्याचा आधार घेऊन सांगता येईल. एकेक स्वर वाढवून गाण्यातील रागाचा विस्तार करण्याची त्यांची पद्धत शास्त्रीय गाण्यातील उस्तादांची आठवण करून देते.
कुठलेही गाणे हलके फुलके नसते. कवीचे शब्द स्वरकळेत परिवर्तीत करून भावनिर्मिती करणे हे गायकाचे काम. याची रफी ला जाण होती. शास्त्रीय संगीतात तर पुष्कळ अनोखे बोल असतात. कारण ती शब्दप्रदान गायकी नाही. परंतु त्याही बोलांना गंधर्व मंडळी घुमारे फोडून आसमंतात दरवळतातच.

"मधुबन मे राधिका नाचे रे..." हे "कोहिनुर चित्रपटातील "हमीर" रागातील अजरामर गाणे त्यातील तराण्यासहीत रफीने गायले आहे. सुरवातीलाच असरदार स्वरांची आलापी व ठहराव यातून गाणे रंजक होत जाते. रफीचा स्वच्छ, मोकळा, अवीट स्वर रसिकांच्या कानात गुंजन घालतो व अवघ्या देहाचा कान होतो. त्याचबरोबर येणारी तराण्याची लयकारी प्रेक्षकांना एका अद्भुत विश्वात घेऊन जाते. खरा जाणकार रसिक तुर्यावस्थेत जातो. अन्य गानप्रकारात रफी सार्थ शब्दोच्चारांचा जसा आवाहक उपयोग करतात, तसाच उपयोग अर्थहीन शब्दरचनेच्या तराण्यातही करताना आढळतात.

"छुम छुम छननन, छुम छुम छननन, कडांधा कडांधा, धा धा धा" यातील "धा धा धा " खूपच लोकप्रिय झाले. दृत-अतीदृत लयीतील उच्चारांनी चंचल भाव व नखरा प्रतीत केला. रफीने आपल्या आवाजातील लवचिकता तानेतील चापल्य, जोरकसपणा याच्या आधारे चित्रपट संगीतात हमीर रागातील हा तराणा सर्वोत्कृष्ट सादर करून "नौशादचे" संगीत, अब्दुल करीम जाफरखाँची सतार, पं. सामताप्रसाद यांचा तबला, जलतरंग, तबलातरंग ई. वाद्यांनाही योग्य न्याय दिला व चित्रपटाचा दर्जा वाढविला.
चित्रपट संगीतातील गायकीच्या या बादशहाने हिंदी सिनेसंगीत सर्वदूर पोहोचविले.

१९४८ सालच्या "शहीद" चित्रपटातील "खान मस्तान" सोबत गायलेले व भारतभर मशहूर झालेले "वतन की राह मे वतन के नौजवा शहीद हो...." हे सर्वप्रथम ऐकलेले गाणे आजही स्मरणात आहे. गाण्याच्या तबकडीवर खान मस्तान चे नाव आधी होते, कारण ते रफीपेक्षा तत्कालीन प्रसिद्ध व ज्येष्ठ गायक होते. त्याच वर्षी आलेल्या "प्यार की जीत " बोलपटातील "इक दिलके टुकडे हजार हुए, कुछ यहा गिरे कुछ वहा गिरे" रफीच्या या गाण्याने देशभर तहलका मचवला होता. त्याच प्रमाणे "१९४७ सालच्या "जुगनू" सिनेमातील तत्कालीन दिग्गज गायिका "नूरजहाँ"बरोबर गायलेले पुढील ड्युएट कोण विसरेल! "यहाँ बदला वफा का बेवफाई के सिवा क्या है"

४०व्या दशकातील मशहूर गायक स्व. कुंदनलाल सैगल, जी. एम. दुर्रांनी, खान मस्तान ई. दिग्गज गायकांचे युग समाप्त झाले. स्वातंत्र्य प्राप्तीनंतरचे संगीतातील नवीन युगाचे प्रवर्तक खऱ्या अर्थी मो. रफी, मुकेश, तलत मेहमूद, मन्ना डे हे आहेत. संगीत क्षेत्रात क्रांती घडली. रफीचा स्वर केवळ श्रवणासाठी नव्हता. त्याच्या संस्काराने रसिक मोहित होत असे. "मन तरपत हरी दर्शन को आज" १९५२ सालच्या "बैजू बावरा" चित्रपटातील हे गाणे रफीने दिग्गज शास्त्रीय उस्तादांच्या दिमतीने गायले. रफी जर सिनेमात आले नसते, तर त्यांचेही स्वतःचे कुठले घराणे असते व सिनेसंगीताची हानी झाली असती. रफीने गायलेले हे अमर गीत आहे.

चतुरस्त्र सांगितिक वैशिष्ट्य लाभलेल्या रफीचे गाणे ऐकणे दीर्घकाळ आनंदाचा ठेवा होता. त्याच्या गाण्याच्या आठवणी जागवताना "परवीन शाकीर" यांचा एक शेर आठवला.

"वो तो खुशबू है, हवाओ मे बिखर जायेगा I
मसला फूल का है, फूल किधर जायेगा? I
हम तो समझे थे कि एक जख्म है भर जायेगा I
क्या खबर थी के रंगे जां मे उतर जायेगा" I I

रफीच्या सर्वश्रेष्ठ गाण्यावर लिहिताना कुठल्या मूडमधल्या रफी वर लिहावे? असा प्रश्न पडतो. वर निर्देश केलेले शास्त्रीय व देशभक्तीपर गाणे गाणारा रफी, गीता दत्तबरोबर उडत्या चालीचे "सुन सुन सुन सुन जालिमा" हे प्रणय गीत गातो. भावना प्रधान दुःखी सूर गातांना उसासे टाकून आर्त गंभीर स्वरांची पखरण करायचा. प्रेम गीतात, मुलायम स्वरांनी रसिकांना हळुवार गुदगुल्या करायचा. शम्मी कपूरसाठी गाताना, रसिल्या आवाजात रोमांच उठवायचा व शम्मीचा बेछूट "याहू.." प्रगट करायचा. इतकेच नाही तर तत्कालीन विनोदी कलाकार "जॉनी वॉकर"साठी गायलेली रफीची अफलातून ५/६ गाणी आजही ऐकावीशी वाटतात. जसे "सर जो तेरा चकराये" (प्यासा ), "मै बम्बईका बाबू" (नया दौर ),"जंगल मे मोर नाच्या किसीने ना देखा" (मधुमती ) ई. जॉनी वॉकर च्या विनोदी अदाकारीला रफीच्या आवाजाची सुरेख साथ मिळायची. संदेशात्मक गाण्यात, जसे - "तू हिन्दू बनेगा न मुसलमान बनेगा"- अस्वस्थ उध्वस्थ मनावर फुंकर घालणारा स्वर देशभक्तीपर गाण्यात -स्फूर्तीचा स्वर ई. विविधता त्याच्या आवाजात होती.

स्वर्गीय ओ. पी. नय्यर या संगीतकाराच्या गळ्यातले ताईत रफी व आशा भोसले होते. त्यांची सांगीतिक कारकीर्द रफी बरोबर शेवटपर्यंत टिकली होती. ओ. पी. ने रफीला घेऊन एक अनोखी स्टाईल बनवली. अर्थात रफी विथ ओ. पी. हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे.

मोहम्मद रफीच्या स्वतःच्या पसंतीची काही गाणी देत आहोत. "सब कुछ लुटाया हमने" (चुनरिया -हंसराज बहेल ), "हम अपने दिल का फसाना" (ऍक्टरेस -श्यामसंदर ), "ये हसरत थी एक इस दुनियामे" (नौशेरवाले आदिल -सी.रामचंद्र ), "जान सके तो जा" (उस्ताद - ओ. पी. नय्यर ), "तुम जो हुए मेरे हमसफर" (बारा बजे - ओ. पी. नय्यर ), "तारों की जुबा पर है" (नौशेर वाले आदिल - लताबरोबर - सी. रामचंद्र.) "आये बहार बनके लुभाकर चले गये" (राजहट -शंकर जय किशन )ई. मोहम्मद रफी प्रत्येक गायका साठी वेगवेगळ्या प्रकारे गायचा. शम्मीसाठी शम्मीच्या, जॉनी वॉकरसाठी, दिलीप कुमार साठी, राजेंद्र कुमारसाठी त्यांच्या लकबी लक्षात ठेवून गायचा. कलाकाराला पडद्यावर काम करणे सोपे व्हायचे. नवीन संगीतकाराला पण रफीकडून गाणे गाऊन घ्यायला भीती वाटत नसे. त्यांच्याकडून तो, ते देतील ते पारिश्रमिक स्वीकारायचा.

पास बैठो तबियत मचल जायेगी I मौत भी आ गयी तो टल जायेगी ह्या गाण्याचे संगीतकार "सी. अर्जुन " यांनी "पुनर्मिलन " नावाच्या चित्रपटासाठी अतिशय उत्कृष्ट गाणे बनविले. खास रफीने गाण्यासाठी मोठया हिमतीने त्यांनी रफीला ते एकविले. त्याची सुंदर चाल ऐकून रफीने त्याच दिवशी गाणे रेकॉर्ड केले.

गेल्या शतकात तबकडीपासून सुरु झालेला हा संगीत प्रवास आज संगणकीय अविष्काराने खूप सुलभ झाला आहे. पूर्वी मी रेडिओ वरून आवडलेले गाणे लिहून घ्यायचो व संग्रही ते काव्य ठेवायचो. आज गुगल वर कुठलेही गाणे केंव्हाही ऐकता येते. कोणीही कलाकार आपले गाणे रेकॉर्ड करून चॅनेल वर टाकू शकतो. आता तर अल्बम प्रकार रूढ झाला आहे. प्रत्येकाचे अल्बम बाजारात येतात. दूरदर्शनवर प्रसारित होतात. पंचतारांकित हॉटेल्समध्ये त्याचे विमोचन होते. परंतु त्यातील गाण्याचे आयुष्य पावसाळी छत्री सारखेच टिकते. संगीत कलेला नसले तरी कलावंतांना भरभराटीचे दिवस आले, हेही नसे थोडके! या उलट रफीच्या स्वर उद्यानातील कुठलेही फूल हुंगा, आजही तोच सुगंध येतो.

संगीत हे आपले सर्वस्व आहे असे ते म्हणत. किराणा घराण्याचे उस्ताद अब्दुल वहीद खानसाहेब आणि पं. जीवनलाल मट्टू यांचे शिष्यत्व त्यांनी पतकरले होते. हिंदी चित्रपटात सदाबहार गाण्याची प्रसन्न स्वरमुद्रा उमटवणाऱ्या हया गायकाला ६ फिल्म फेयर अवॉर्ड्स, १राष्ट्रीय अवॉर्ड मिळाले. हिरो होंडा व स्टार डस्ट मासिकातर्फे एका प्रतियोगितेत "बेस्ट सिंगर ऑफ द मिलेनियम" हा पुरस्कार तसेच भारत सरकारतर्फे १९६७ साली पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

भारतीय चित्रपटसृष्टीत आपले योगदान देणारा मोहम्मद रफी हा स्वरगंधर्व दि. ३१जुलै १९८० रोजी पैगंबर वासी झाला. भैरवीच्या आर्त स्वराने चटका लावून जाण्यासारखी गत ४४ वर्षांपासून रसिकांची झाली आहे, हे कोणी नाकारू शकत नाही. लौकिकार्थाने जरी रफी आपल्यात नाही तरी आपण त्याला विसरू शकत नाही. जाण्यापूर्वी त्याने सांगून ठेवले होते.

तुम मुझे यूं भुलाना पाओगे
जब कभी भी सुनोंगे गीत मेरे
संग संग तुम भी गुनगुनाओगे......
 
 
रमेश पोफळी,
संपर्क   ७७७५९००८२४
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121