लॉरेन्स बिश्नोईला फक्त सलमानची माफी नकोय? 'या' अटीही ठेवल्या समोर...
14-Oct-2024
Total Views |
1
मुंबई : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते तसेच बॉलिवूड अभिनेता सलमान खान याचे निकटवर्तीय बाबा सिद्दिकी यांच्या हत्येमुळे देशभरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या हत्येची संपूर्ण जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गटाने घेतल्याचे समोर आले होते.
बिश्नोई गटातील एका सदस्याने एका कथित फेसबुक पोस्टमध्ये सलमान खानच्या नावाचा स्पष्ट उल्लेख करत बाबा सिद्दिकी यांच्यावर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. अशातच अभिनेता सलमान खान याची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येमुळे बॉलिवूडविश्वात खळबळ उडाली आहे. या सगळ्या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई याचा एक जुना इंटरव्ह्यू सध्या चर्चेत आला आहे, ज्यामध्ये त्याने सलमान खानने एका विशिष्ट ठिकाणी जाऊन माफी मागावी असे सांगितले होते.
अभिनेता सलमान खान आणि कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई यांच्यामध्ये असणारे शत्रुत्व हे सर्वांनाच माहीत आहे. यापूर्वी अनेकदा बिश्नोई गटाने सलमानला जीवेमारण्याच्या धमक्या दिल्या आहेत. मात्र आता सलमानच्या जवळचे मित्र बाबा सिद्दिकी यांच्या मृत्यूमुळे सलमान पुन्हा एकदा लॉरेन्स बिश्नोईच्या रडारवर असल्याचे सूचित होते. मात्र यापूर्वी बिश्नोईने वारंवार सलमानकडून माफीची मागणी केली होती.
माफी नेमकी कोणासमोर मागायची ?
बिश्नोईने सांगितलेले माफीचे ठिकाण राजस्थानमधील बिकानेर येथे एक सुप्रसिद्ध मंदिर आहे. एका जुन्या मुलाखतीत लॉरेन्स बिश्नोई म्हणाला होता की, जर सलमान खानने राजस्थानमधील बिकानेर येथील बिश्नोई समाजाच्या मुख्य मंदिरात म्हणजेच मुक्तिधाम मुकाम येथे येऊन त्याच्या देवतेसमोर नतमस्तक होऊन माफी मागितली तर तो त्याला माफ करेल.
यावरून या मंदिराचे बिश्नोई समाजातील महत्त्व स्पष्ट होते. त्यामुळे या मंदिराला बिश्नोई समाजाचे मंदिर असेही म्हणतात. हे मंदिर नोखा तालुक्यातील मुकाम गावात आहे. हे नोखापासून सुमारे १६ किलोमीटर आणि बिकानेर जिल्हा मुख्यालयापासून ६३ किलोमीटर अंतरावर आहे.
याच मंदिरात माफी मागण्याचा अट्टाहास का ?
मुक्तिधाम मुकाम मंदिरातच सलमानने माफी मागावी ही अट घालण्यामागील कारण समजून घेण्यासाठी सलमान खान आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्यातील वैराचे कारण समजून घ्यावे लागेल. याचे मुख्य कारण आहे १९९९ चे काळवीट शिकार प्रकरण. त्यावेळी सलमान खान एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान काळवीटाची शिकार केल्याप्रकरणी चर्चेत आला होता. बिश्नोई समाजात काळवीटाचे विशेष महत्त्व असून त्यांची पूजा केली जाते. सलमानच्या काळवीट शिकार प्रकरणामुळे बिश्नोई समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या. याच कारणामुळे सलमान खान हा लॉरेन्स बिश्नोईच्या हिट लिस्टवर आहे.