वर्तमानकाळ हा अतिशय आव्हानात्मक आणि संधी उपलब्ध करून देणारा काळ. अर्थात, आधी अशी स्थिती नव्हती, अशातला भाग नाही. पण, आज प्रत्येक गोष्ट जगजाहीर होत असल्याने, आव्हाने आणि संधी यांचा उलगडा सहज होत असतो. त्या ज्ञानाचा प्रचारदेखील तितकाच वेगाने होत असल्याने याचा सकारात्मक विचार केला, तर नव्या पिढीला जशी भुरळ पडली, तशी जुनी पिढीदेखील आपल्या सुप्त कलागुणांना व्यक्त करण्यास तयार होताना दिसते, ही मोठी आश्वासक बाब आहे. यात समाजमाध्यमे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. दुसरी बाजू नकारात्मक. ती लक्षात घेतली तर या माध्यमांचा गैरवापरदेखील होताना दिसतो. म्हणूनच आपल्या कलागुण आणि कौशल्याचा वापर राष्ट्रासाठी योगदान देण्याचे माध्यम म्हणून कसा करता येईल, असा सर्व राष्ट्रप्रेमींनी विचार केला, तर या माध्यमांचा गैरवापर करणार्यांना चपराक नक्कीच बसेल. त्यातच कित्येक तरुणांनी आपल्या उदरनिर्वाहासाठी मोबाईल आणि सोशल मीडियाला आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनविलेले दिसते. नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या एका आकडेवारीनुसार सप्टेंबर २०२३ मध्ये मोबाईलधारकांची संख्या जगभरात ८०३ कोटींवर पोहोचली, तर गेल्या तीन महिन्यांत यात १७५ दशलक्ष इतकी वाढ झाली. भारतातील मोबाईलधारकांची संख्याही ७० लाखांनी वाढली. या वृद्धीकडे आपण भारताच्या भविष्यातील वाटचालीच्या दृष्टीने बघितले पाहिजे. खेड्यातील साधे ग्रामीण जीवन जगणार्या व्यक्तीसाठी हे साधन दळणवळण, संपर्क माध्यम म्हणून बघितले, तरी कालांतराने त्या व्यक्तीच्या जीवनातदेखील मोबाईलने आमूलाग्र बदल घडवून आणल्याचे लक्षात येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर भारतात सर्वार्थाने ‘डिजिटल क्रांती’ झाली. सर्वसामान्य नागरिक अल्पावधीत या डिजिटल व्यवहारचातुर्यात निपुणही झाले. डिजिटल व्यवहार लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत इतके सहज आणि सोपे झाले की, काँग्रेसच्या काळातील रांगा लावून बँकांची कामे करण्याची कटकट कमी झाली. त्यात आपला व्यवसाय ऑनलाईन करण्यासाठीही सोशल मीडिया सहज हाताळता येऊ लागल्याने, या क्षेत्रातील स्टार्टअप्सला गती मिळाल्याने देशाच्या डिजिटल अर्थव्यवस्थेलाही निश्चितच हातभार लागला.
नवतंत्रज्ञानाचा गैरवापर होऊ नये, ही केवळ सरकारचीच नव्हे तर सर्वसामान्यांचीही तितकीच मोठी जबाबदारी आणि एक नागरी कर्तव्यच. कारण, या नवतंत्रज्ञानाने सामान्य माणसाशी निगडित प्रत्येक बाबीमध्ये प्रवेश केला. त्यामुळे डिजिटल विकासाला गतिमानता प्राप्त झाली. आता सरकारी काम आणि चार महिने थांब ही अवस्था राहिली नाही. डिजिटायझेशनमुळे वेळेची बचत तर झालीच, शिवाय कामांमध्ये पारदर्शकतादेखील वाढली. तरीदेखील हे तंत्रज्ञान उद्या मानवी बुद्धिमत्तेवर वरचढ होईल, ही भीती आजही व्यक्त होताना दिसते. आजकाल पायाभूत सुविधांमध्ये ‘स्टार्टअप्स’ची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून ‘स्टार्टअप’साठी हे नवे तंत्रज्ञान खूप उपयुक्त ठरलेले दिसते. मात्र, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान आता मानवी बुद्धीसाठीच आव्हान करेल, असाही एक नकारात्मक मतप्रवाह सातत्याने चर्चेच्या केंद्रस्थानी दिसतो. मात्र, तंत्रज्ञानाचा वापर कसा खुबीने करायचा, यासाठी मानवी बुद्धिमत्ताच शेवटी कामी येणार असल्याने ही भीती व्यर्थ ठरावी, हे मान्य करावे लागेल. तंत्रज्ञानाचा वापर सर्वांगीण विकास, प्रगतीसाठी करण्याची एकदा का सवय जडली की, मग हे तंत्रज्ञानदेखील आपल्या जीवनाचा आणि समाजाचा अविभाज्य घटक होईल, यात शंका असण्याचे कारण नाही. हे तंत्रज्ञान मानवाने आपल्या प्रगतीसाठी अत्यावश्यक गरज म्हणून बघितले तर काळजीचे कारण नाही. उलट आपल्या देशातील उदयोन्मुख, नवकल्पनांना विकसित करण्यासाठी याचा उपयोग केला, तर जगापुढे आपण आदर्श निर्माण करू, इतकं हे उपयुक्त आहे. त्यात आपल्या देशातील विविध संस्कृती, प्राचीन इतिहास या बाबी तर अधिकच पोषक असल्याने, भारतीय बुद्धिमत्ता अव्वल असल्याचे सिद्ध व्हायला वेळ लागणार नाही. ‘स्किल इंडिया’तून ज्या कल्पना विकसित होत आहेत, ही याचीच नांदी आहे. म्हणूनच आज डिजिटल क्षेत्रातील स्टार्टअप्सनी विविध क्षेत्रांत भरारी घेतलेली दिसते. आगामी काळातही वेगाने बदलत जाणार्या तंत्रज्ञानाच्या अनुषंगानेच नवोन्मेषी उद्योग-व्यवसाय कल्पनांचा जन्म होईल. इतिसाहातही तेच घडले. त्यामुळे नवतंत्रज्ञानाचे भय न बाळगता, त्याला अभय देऊन त्याचा सुयोग्य वापर केला, तरच जागतिक स्पर्धेत हा नवा भारत नवनवीन शिखरे पादाक्रांत करेल.