नवी दिल्ली : संसदेचे विशेष अधिवेशन दि.१८ ते २२ सप्टेंबर रोजी होणार आहे. त्यावेळी नेमंक कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार हे अजून ठरलेले नाही. पंरतू विरोधकांचा म्हणण आहे की, या अधिवेशनात देशाचे नाव बदलून 'भारत' करण्यावर केंद्र सरकार प्रस्ताव आणेल. मात्र मोदी सरकारचे मंत्री अनुराग ठाकूर यांनी याला अफवा म्हटले आहे.
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “माझ्या मते जे काही चालले आहे ते केवळ अफवा आहे. मला एवढेच सांगायचे आहे की जो कोणी भारत या शब्दावर आक्षेप घेतो, तो त्याची मानसिकता स्पष्टपणे दर्शवतो.” G20 डिनर पार्टीसाठी राष्ट्रपती भवनात दिलेल्या निमंत्रणाबाबत ठाकूर म्हणाले, “त्या भारताच्या राष्ट्रपती आहेत, म्हणून निमंत्रण पत्रावर भारताचे राष्ट्रपती असे लिहिले होते. असे लिहिले तर काय झाले?, असा सवाल ही त्यांनी यावेळी विचारला.
ते म्हणाले, “मी भारत सरकारमध्ये मंत्री आहे. त्यात नवीन काही नाही. G20-2023 (ब्रँडिंग, लोगो) वर भारत आणि इंडिया दोन्ही लिहिलेले असले. मग भारत नावावर आक्षेप का? भारताचा कोणाला आक्षेप का? यावरून ते मनापासून भारताच्या विरोधात असल्याची त्यांची मानसिकता दिसून येते. ते परदेशात गेल्यावर भारतावर टीका करतात. जेव्हा ते भारतात असतात तेव्हा त्यांना भारताच्या नावावर आक्षेप असतो.”,अशी टीका ही ठाकुर यांनी विरोधकांवर केली.
दरम्यान ५ सप्टेंबर रोजी प्रसारमाध्यमांनी विशेष सत्रादरम्यान देशाचे नाव 'India' असे न घेता फक्त 'भारत' ठेवण्याचा विचार केला जात असल्याचा दावा केला होता. राष्ट्रपती भवनाने G20 डिनरसाठी पाठवलेल्या निमंत्रण पत्रात 'प्रेसिडेंट ऑफ इंडिया' ऐवजी 'प्रेसिडेंट ऑफ भारत' असे लिहिण्यात आल्याने याला बळकटी मिळाली. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, “भारतीय प्रजासत्ताक: आपली सभ्यता अमृत कालच्या दिशेने वाटचाल करत असल्याचा मला आनंद आणि अभिमान आहे.” यानंतर सोशल मीडियावरही ‘भारत’ ट्रेंड सुरू झाला.