‘उदय सूर्या’ची यशस्वी उद्योगतारका

    10-Aug-2023
Total Views | 90
 Dipali Pathak

दिपाली पाठक यांनी प्रारंभी एका मल्टिनॅशनल कंपनीत ‘फायनान्स डायरेक्टर’ पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली. त्यानंतर त्यांचे पती प्रदीप पाठक यांनी कन्स्ट्रक्शन रिपेअरिंग ऑडिट कलरिंग मेन्टेनन्स या क्षेत्रात सुरु केलेल्या ‘उदय सूर्या’ कंपनीत त्या सहभागी झाल्या. परंतु, हृदयविकाराच्या झटक्याने दिपाली यांच्या पतीचे निधन झाले. पण, त्यानंतर अजिबात खचून न जाता, दिपाली यांनी त्यांच्या पतीच्या सर्व व्यावसायिक आणि कौटुंबिक जबाबदार्‍या नेटाने पार पाडल्या. आज दिपाली यांच्या नेतृत्वात दोन कंपन्यांची यशस्वी घोडदौड सुरु आहे. अशा या ‘उदय सूर्या’ कंपनीच्या संचालिका आणि यशस्वी उद्योजिका दिपाली पाठक यांच्याशी साधलेला हा खास संवाद...


इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात फारशा महिला उद्योजिका आजही दिसून येत नाही. तेव्हा या क्षेत्राविषयी आणि एकूणच या क्षेत्रातील आव्हानांविषयी काय सांगाल?


आव्हान म्हणजे नक्की सांगायचं झाले, तर ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ आणि ‘रिपेअरिंग’ची कामं ही पुरुषप्रधान क्षेत्रातील कामं म्हणून आजही ओळखली जातेात. एखादी स्त्री स्वतः साईटवर उपस्थित राहून काम करते, ही मानसिकता आपल्या इथे अजूनही अस्तित्वात नाही. या बांधकाम आणि ‘रिपेअरिंग’ क्षेत्रात पहिल्यापासून पुरुषांची मक्तेदारी आहे. तुम्हाला आर्किटेक्ट, इंजिनिअर महिला नक्कीच दिसतील. परंतु, सिव्हिल रिपेअरिंग, ऑडिट, कलरिंग यात त्यांचा सहभाग नगण्य आहे. सुरुवातीला मी म्हणजे एक महिला हे सगळे काम करत आहे म्हटल्यावर काहींच्या मनात किंतु-परंतु असायचे. पण, जेव्हा आम्ही क्लाएंटसोबत मिटिंग करतो, तेव्हा माझं ज्ञान, अनुभव, तांत्रिक समज बघून मात्र त्यांना ‘हे काम मी करुन शकेन,’ असं वाटतं. माझ्याकडे माझी स्वतःची तज्ज्ञ, दर्जेदार काम करणारी प्रशिक्षित टीम आहे. एकदा त्यांनी आमची कामाची पद्धत, क्षमता पाहिली की मग काहीच प्रश्न येत नाही.


तुम्ही जी वास्तविक परिस्थिती मांडली ती एका दृष्टिकोनाचा भाग आहे. जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष ‘रिझल्ट ओरिएंटेड’काम करता, तेव्हा कौतुकाची थाप मिळते का?


हो नक्कीच. आमची कंपनी ‘उदय सूर्या’ ही नावाजलेली ‘एप्लिकेटर’ आहे. ‘एशियन पेंट्स’, ‘नेरोलॅक’, ‘डॉ फिक्सिट’ अशा कंपन्यांचे आम्ही अधिकृतपणे ‘एप्लिकेटर’ आहोत. मी स्वतः आणि माझ्या टीमने या क्षेत्रात व्यवस्थित प्रशिक्षण घेतले आहे. त्यासंबंधीची प्रशस्तिपत्रकंही आमच्याकडे आहेत. एकूणच काय तर प्रशिक्षित मनुष्यबळ असल्याने काम करणे मला सुकर जाते. त्यामुळे कामाची वॉरंटीदेखील मिळणे सोपे होते.

जेव्हा आपले पती आणि ‘उदय सूर्या’चे संस्थापक प्रदीप पाठक यांनी हा व्यवसाय उभा केला, तेव्हा उद्योजक म्हणून भांडवल, तंत्रज्ञानाच्या बाबतीत त्यांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागला?

माझे पती प्रदीप पाठक यांनी ही कंपनी सुरू केली, तेव्हा बॅक-ऑफिस, ‘अ‍ॅडमिन’, ‘एचआर’, ‘फायनान्स’ अशा सगळ्याच जबाबदार्‍या ते तेव्हापासून सांभाळत होते. आजही ते सगळे जुने सहकारी आमच्यासोबत कार्यरत आहेत. प्रदीप यांनी योग्य माणसांची, योग्य वेळी, योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्याने सगळं सुकर झालं. फारसा त्रास तेव्हा झाला नाही. त्यांच्याकडे स्वतःची कंपनी सुरू करण्याचे ‘व्हिजन’ होते आणि ते त्यांनी पूर्ण केले. सात वर्षांच्या कालावधीत या कंपनीचा प्रवास ‘स्ट्रक्चरल रिपेअरिंग’पासून ते प्रत्यक्ष बांधकामापर्यंत आणण्यात माझ्या पतींचाच मोठा वाटा आहे.

बांधकाम क्षेत्रातही मराठी उद्योजकांची संख्या आज दखलपात्र दिसते. त्याविषयी काय सांगाल?


खरं आहे, या क्षेत्रात मराठी उद्योजक आणि मनुष्यबळ दखलपात्र नक्कीच आहे. जवळपास आमचे सगळे मनुष्यबळ मराठी आहे आणि मुळात या क्षेत्रात जात, धर्म, भाषा हा मुळी विषयच नाही. मराठी उद्योजक या क्षेत्रात नक्कीच पुढे येत आहेत. माझ्या पतीने मुख्य बांधकाम क्षेत्रात प्रवेश केला होता. पिंपरी-चिंचवड भागात ‘ग्राऊंड प्लस’ सात इमारतदेखील बांधल्या. तेव्हा आम्ही प्रशासनासोबत संयुक्त भागीदारीत पुनर्विकासाचे प्रकल्प पूर्ण केले होते. आमचे स्वतःचे भांडवल त्याकामी होते. गरज पडली तेव्हा बँकेचेही अर्थसाहाय्य मिळाले. त्यामुळे तसा काही प्रश्न आला नाही. प्रत्येक व्यवहारात काही अटी आणि शर्ती असतात. त्याप्रमाणे आम्ही काम करतो. तसेच आम्ही या गोष्टीचे ‘सीड मनी’चे नियोजन करतो. जेणेकरून कुठलाही प्रोजेक्ट थांबणार नाही.

कोरोनाच्या काळात जवळपास सर्वच उद्योग-व्यवसायांवरही विपरीत परिणाम झाला. तेव्हा, या काळातील आपला एकंदरीतच अनुभव कसा होता?


कोरोना महामारीच्या काळात आठ-नऊ महिने काम पूर्णपणे बंदच होते. त्यात कुशल आणि अकुशल अशा सगळ्याच कामगारांचाही समावेश होता. त्या काळात सगळंच बंद होतं. त्यानंतर अर्धवट राहिलेली सगळी प्रलंबित कामे, प्रकल्प पुन्हा सुरू झाले. आता इंडस्ट्रीतही सगळं सुरळीत आहे.

या क्षेत्रातील तुमचा प्रदीर्घ अनुभव लक्षात घेता, बांधकाम क्षेत्रातील चढउतार आणि भवितव्य याविषयी काय सांगाल?


‘रिपेअरिंग’ किंवा ‘कन्स्ट्रक्शन’ हे ‘रूटीन’ क्षेत्र असल्याने या इंडस्ट्रीला तसे मरण नाही. या क्षेत्राचे भविष्य उज्ज्वल आहे, असे मला तरी वाटते. तेजी-मंदीपेक्षा तुमचं काम कसं आहे, यावर सगळं ठरतं. लोकांमध्ये चांगल्या कामामुळे ‘माऊथ पब्लिसिटी’चे ‘गुडविल’ कालांतराने निर्माण होते.

घरगुती जबाबदार्‍या आणि व्यावसायिक जबाबदार्‍या यांचे संतुलन, समतोल नेमका कसा साधता?


म्हणूनच ‘मल्टिटास्किंग’साठी महिला ओळखल्या जातात. लक्ष्मीला जसे दहा हात असतात, त्याच पद्धतीने आमच्या कामाचेही आहे. इथे ‘टाईम मॅनेजमेंट’ आवश्यक आहे. योग्य नियोजन केले तर काही अडचण येत नाही. मी संध्याकाळी ७ वाजल्यानंतर कामाशी संबंधित फोन उचलत नाही. त्यावेळी माझ्या कौटुंबिक व इतर जबाबदार्‍या मी पार पाडते. आमच्या कामाचा अजेंडाच ठरलेला असल्याने ‘बार चार्ट’ तयार असतो. कसं, कधी, कुणी केव्हा काम करावे, याची ‘एसओपी’ ठरलेली आहे. त्यामुळे ऐनवेळी अडचण येत नाहीत.

तुम्ही व्यावसायिक जबाबदार्‍यांसह समाजसेवेतही तितक्याच सक्रिय आहात. त्याविषयी काय सांगाल?

खरं तर सगळेच स्वतःसाठी काम करत असतात. पण, कुठेतरी उपेक्षित किंवा गरजूंना मदत केली पाहिजे, ही मला माझी एक सामाजिक जबाबदारी वाटते. मला तर समाजसेवेची आवड आधीपासून होती, कारण त्यात मला खूप आनंद मिळतो. मी ‘डोंबिवली रोटरी क्लब’ची पहिली महिला अध्यक्ष आहे. या माध्यमातून आम्ही वेगवेगळे उपक्रम हाती घेत असतो. आम्ही १४ हृदयाला छेद असलेल्या नवजात अर्भकांच्या शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदतदेखील केली आहे. एक नृत्य नाटिका आयोजित करुन करून त्या अर्भकांच्या शस्त्रक्रियेसाठी निधी उभा केला. आम्ही ‘डोंबिवली मॅरेथॉन’सुद्धा आयोजित करतो. शहापूर तालुक्यातील एका वसतिगृहाचे आम्ही काम करून तेथील विहीर खणून जलस्रोत पुनरुज्जीवत केले. दीपोत्सवाच्या वेळी तेलाचं दान करणे, असे वेगवेगळे उपक्रम सुरुच असतात.

जाता जाता नवउद्योजकांना काय संदेश द्याल?

 
मी सांगेन की, तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्हाला नक्कीच संधी मिळेल. त्या संधीचा सदुपयोग करणे, हे आपल्या हातात आहे. जे काही तुम्ही कराल, ते आवडीने करा. त्यामुळे काम कधीही ओझे वाटणार नाही.




-मोहित सोमण



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121