मुंबई (प्रतिनिधी): रायगड जिल्ह्यातील रोहा वन परिक्षेत्राला संवर्धन राखीव क्षेत्राचा दर्जा देण्यात आला आहे. वन्यजीव संरक्षण अधिनियम (१९७२) या कायद्यानाव्ये या क्षेत्राला दर्जा मिळाला असून यामध्ये २७३०.१० हेक्टर क्षेत्र संवर्धित करण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यातील वनविभागमध्ये समाविष्ट असलेल्या रोहा वनपरिक्षेत्रात विविध प्राणी आणि पक्ष्यांच्या दुर्मिळ प्रजाती आढळल्या असल्याने रोहा संवर्धित राखीव क्षेत्र घोषित व्हावे अशी मागणी केली जात होती.
त्यानुसार रोहा तालुक्यातील आरे बु. (२०२.८५), म्हाळुंगे (२३.५९), तळवली (२६१.६९), चांदगाव (१८.७५), शेंडसई (१४.६५), उसर (१०८.००), पांगळोली (९८.७१), बिरवाडी (८८.५८), तारेघर (११२.००), खांबेरे (५१६.०८), टेमघर (२९६.५३), बोबडघर (६१.२९), म्हसाडी (३४५.६४), गोपाळवट (२२.७९), कांटी (४५.२८), भालगाव (४१७.७०) या गावांचा समावेश आहे.
वन क्षेत्राच्या भूप्रदेशातील वन्य प्राणी, पक्षी, वनस्पतीचे व इतर जैवविधतेचे तसेच दुर्मिळ प्रजातींचे संवर्धन करण्यासाठी संवर्धन राखीव क्षेत्र घोषित करण्यात येते. वन्यजीव संरक्षण कायदयांतर्गत संवर्धित क्षेत्र, राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये यांना मान्यता दिली जाते. एखादा भूप्रदेश वन्यजीव कायद्यांतर्गत राखीव जाहीर झाल्यास तेथील स्थानिकांचे हक्क अभधित राहतात.
"काही दुर्मिळ प्रजातींचा अधिवास असल्याने रोहा वनक्षेत्राला संवर्धित राखीव क्षेत्राचा दर्जा द्यावा असे प्रस्तावित होते. त्यानुसार तो मिळाला. यामुळे वनपरिक्षेत्रातील प्रजातींचे संवर्धन करता येईल. तसेच, पुढील काळात संशोधकांना ही संशोधन करता येईल व काही वन्यजीवांशी प्रकल्प ही राबविण्यात येतील."
डॉ. व्ही. क्लेमेंट बेन,
अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक
वन्यजीव (पश्चिम) , महाराष्ट्र वन विभाग