मुंबई (विशेष प्रतिनिधी) - गडचिरोली जिल्ह्यातील वडसा वनपरिक्षेत्रात छत्तीसगढवरुन नवीन टस्कर हत्ती दाखल झाला आहे (gadchiroli new tusker). गडचिरोलीत असणाऱ्या हत्तीच्या कळपातील एक टस्कर हा छत्तीसगढमध्ये गेला होता (gadchiroli new tusker). रविवार दि. ४ मे रोजी जेव्हा त्याने पुन्हा महाराष्ट्रात प्रवेश केला, तेव्हा त्यासोबत दुसरा एक टस्कर हत्ती आल्याची नोंद 'स्टाईप्स अॅण्ड ग्रीन अर्थ फाऊंडेशन'ने (एसएजीई) केली आहे. (gadchiroli new tusker)
२०२१ साली छत्तीसगढ येथून २३ हत्तींचा कळप गडचिरोली जिल्ह्यात दाखल झाला. तेव्हापासून हा कळप गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात वावरत आहे. मध्यंतरीच्या काळात या कळपातील एका मादीचा वीजेचा धक्का लागून मृत्यू झाला, तर एक टस्कर हा कळपापासून स्वतंत्र झाला. सद्यपरिस्थितीत या कळपात ३१ हत्ती असून ते गडचिरोली जिल्ह्यातील कोर्ला वनपरिक्षेत्रामध्ये वावरत आहेत. या कळपापासून वेगळा झालेला एसएमई-३ असा सांकेतिक क्रमांक टस्कर हत्ती छत्तीसगढमध्ये गेला होता. ४ मे रोजी सकाळी त्याने महाराष्ट्रात प्रवेश केला. मात्र, त्याच्यासोबत एक नवीन टस्कर दिसल्याची माहिती 'एसएजीई'चे सागनिक सेनगुप्ता यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली. ५ मेच्या मध्यरात्री हे दोन्ही हत्ती वडसा वनपरिक्षेत्रातील भाताच्या शेतात आढळून आले. त्यामुळे गडचिरोलीतील हत्तींची संख्या आता ३३ झाली आहे.
गडचिरोलीमधील हत्ती सध्या धानाच्या म्हणजेच भाताच्या शेतीचे नुकसान करत आहेत. जंगलातील बांबू आणि मोहाच्या झाडांवर ताव मारत आहेत. छत्तीसगढ म्हणून आलेला हा हत्तींचा कळप आता गडचिरोलीमध्ये स्थायिक झाला असून तो पुन्हा याठिकाणाहून स्थलांतर करण्याची शक्यता धूसर असल्याचे सेनगुप्ता यांनी सांगितले. याला त्या त्या राज्यातील अनेक कारणे कारणीभूत आहेत. झारखंडमध्ये मोठ्या प्रमाणात हत्ती अधिवास क्षेत्रात खाणकाम सुरू झाले आहे. तर ओडिशा राज्याने पश्चिम बंगाल आणि छत्तीसगढला जोडणाऱ्या हत्ती भ्रमणमार्गामध्ये कालवे बांधले आहेत. गडचिरोलीमधून हत्तीच्या कळपाचे स्थलांतर होण्याऐवजी भविष्यात छत्तीसगढमधील ३५ हत्तींचा कळप महाराष्ट्रात येण्याची शक्यता सेनगुप्ता यांनी वर्तवली आहे.