शरीरातील अग्नी तत्त्वामध्ये जठराग्नी हा सर्वात महत्त्वपूर्ण असा मानला गेला आहे. कारण, माणूस जे काही सर्वप्रथम ग्रहण करतो, ते सर्वप्रथम जठरातच येेते व जठराग्नीच्याच स्वाधीन असते, हे आपण आजवरच्या भागांमधून नीट समजून घेतले.
जठराग्नीमुळेच अन्नाचे पोषक तत्त्व व मल अशा दोन भागांमध्ये विघटन होते. पोषक तत्त्व शरीराच्या ऊर्जेसाठी व वाढीसाठी कार्य करते, तर मल हा शरीराबाहेर टाकला जातो. जठराग्नीचा थेट संवाद हा पेशींमधील ऊर्जा व तेथील चयापचय क्रियेशी असतो.समाग्नी, विषमाग्नी, मंदाग्नी बरोबरच अजून एक महत्त्वाचा जठराग्नी दिसून येतो व तो म्हणजे तीक्ष्णाग्नी. साधारणपणे ज्यावेळी शरीरातील पित्तरस व पित्तप्रकृती वाढीस लागते, त्यावेळी शरीरामध्ये हा तीक्ष्णाग्नी तयार होत असतो.
तीक्ष्णचा अर्थ अतिशय प्रखर व जोरदार होतो. तीक्ष्णाग्नीमध्ये जठराग्नी हा अतिशय गरम, उच्च व शक्तिशाली असतो. या प्रकारच्या अग्नीमुळे पचन अतिशय शीघ्रगतीने होते. हे पित्ताच्या जोशामुळे होते. आपण एखाद्या माणसाला पाहतो, ज्याला सतत भूक लागत राहते व काहीही खाल्ले तरी थोड्याच वेळात त्याला परत काहीतरी खाण्यास हवे असते. त्याला परत काहीतरी खाण्यास हवे असते. त्याला आपण म्हणतो की, या माणसाला भस्म्या रोग झाला आहे. हे सर्व तीक्ष्णाग्नीमुळे होत असते.
या प्रकृतीत माणसाला भूक अनावर होते व कितीही खाऊन समाधान होत नाही. सतत खात राहिल्यामुळे मग पित्ताचा प्रकोप होतो व आम्लपित होते, ज्याला आपण ‘हायपर अॅसिडिटी’ झाली, असे म्हणतो. सततच्या खाण्यामुळे जठराला व पचनसंस्थेला आराम मिळत नाही व त्यामुळे अपचन होत राहते. छातीमध्ये सततत जळजळ व वेदना होत राहतात. पचनामुळे अर्धवट पचलेले अन्न पुढे सरकते व त्यातून उपयुक्त असे पोषक पदार्थ न शोषून घेताच ते पुढे जाते. त्यामुळे रुग्णाला अतिसार होतो.
मानसिक पातळीवरही हा पित्त/तीक्ष्णाग्नी अनेक प्रकारची लक्षणे दाखवत असतो, जसे सतत व छोट्या-छोट्या कारणांवरून राग येणे, सतत चीडचिडेपणा होणे. प्रत्येक गोष्टीमध्येचूक शोधण्याचा स्वभाव तयार होतो. इतरांबद्दल असूया निर्माण होते. इतरांशी सतत तुलना करत राहण्याचा स्वभाव तयार होतो. ही प्रकृती व तीक्ष्णाग्नी टाळण्यासाठी आहारात नारळाचेतेल किंवा सूर्यफूल, ऑलिव्ह यांचे तेल व शुद्ध तूप वापरावे. मसाल्यांमध्ये धने, जिरे, बडीशेप, वेलची, पुदिना, हळद, केशर इत्यादींचा वापर करावा.
तसेच भाज्यांमध्ये काकडी, फ्लॉवर हिरवे वाटाणे इत्यादी वापरावे. तसेच गाजर, रताळे, भोपळा, मका यांचा वापर करावा. धान्यांमध्ये भात, गहू, ओट्स, बारली यांचा वापर करावा. कडधान्यात मूग, राजमा, चवळी इत्यादी वापरावे. तसेच दही वा दुधाचा वापर करावा. यामुळे तीक्ष्णाग्नीचे रुपांतर हळूहळू समाग्नीमध्ये होते व पचनक्रिया सुधारते. पचनक्रिया सुधारल्यावर रोगप्रवणस्थितीदेखील बदलते.(क्रमश:)
(लेखक एमडी होमियोपॅथी आहेत.)