‘अमृत’ योजनेच्या कामांसाठी एप्रिल २०२३ पर्यंतची मुदत
23-Feb-2023
Total Views | 73
35
योजनेंतर्गत २७ गावांची पाणीटंचाई दूर होणार
टॅपिंग एकच्या नळजोडणीचा १७ गावांना होणार फायदा
एका महिन्यांत जोडणी तर, डिसेंबरपर्यंत संपूर्ण योजनेचे काम पूर्ण करण्याचे आदेश
कल्याण : केंद्र व राज्य शासन पुरस्कृत ‘अमृत मिशन योजने’अंतर्गत २७ गावांसाठी पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. या योजनेचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे महापालिकेने उद्दिष्ट ठेवले आहे. त्यादृष्टीने महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी ठेकेदाराला सुरू असलेल्या सर्व जलकुंभाची कामे एप्रिल २०२३ अखेर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (कडोंमपा) आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी बुधवारी ‘अमृत मिशन योजने’तंर्गत सुरू असलेल्या गोळवली, दावडी, कोळे, काटई, संदप, सागाव येथील जलकुंभांची व ‘टॅपिंग’ एकसाठी जोडणी करण्यासाठी सुरू असलेल्या एक हजार मिलिमीटर व्यासाच्या पाईपलाईनच्या कामाची ठेकेदार प्रतिनिधी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार व अधिकार्यांसोबत पाहणी केली. या पाहणी दरम्यान कडोंमपाचे शहर अभियंता अजरुन अहिरे, ‘अमृत योजने’चे कार्यकारी अभियंता शैलेश कुलकर्णी उपस्थित होते.