नवी दिल्ली : विशेष प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी ६ जून रोजी जगातील सर्वात उंच रेल्वे पूल असलेल्या चिनाब पूलाचे उद्घाटन करतील. हा पूल जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक (युएसबीआरएल) प्रकल्पाचा एक भाग आहे. केंद्रीय अंतराळ आणि पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी मंगळवारी तशी घोषणा केली आहे.
एक्सवरील एका पोस्टमध्ये केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह म्हणाले, इतिहास घडण्यास आता केवळ तीनच दिवस बाकी आहेत. युएसबीआरएल प्रकल्पाचा भाग असलेला जगातील सर्वांत आणि शक्तीशाली चिनाब पूल निसर्गाच्या कठीण परीक्षांना तोंड देऊन सज्ज झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ६ जून २०२५ रोजी पुलाचे उद्घाटन करणार असून ते भारताच्या ताकदीचे आणि दूरदृष्टीचे अभिमानास्पद प्रतीक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
जगातील सर्वात उंच रेल्वे आर्च ब्रिज, आयकॉनिक चिनाब रेल्वे ब्रिज, कटरा ते संगलदन या पट्ट्याचा भाग असेल, जो नवी दिल्लीला कटरा मार्गे थेट काश्मीरशी जोडेल. जम्मू आणि काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात स्थित, चिनाब ब्रिज नदीच्या पात्रापासून ३५९ मीटर उंचीवर उभा असलेला एक अभियांत्रिकी चमत्कार आहे.
महत्वाकांक्षी उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक (युएसबीआरएल) चा भाग असलेल्या या प्रकल्पाला या प्रदेशाच्या कठीण भूभागामुळे आणि भूकंपीय संवेदनशीलतेमुळे अनेक अभियांत्रिकी आणि अन्य आव्हानांना तोंड द्यावे लागले. मात्र, हा पूल पूर्णत्वास गेला असून तो भारताच्या तांत्रिक कौशल्याचा आणि समावेशक विकासाच्या वचनबद्धतेचे प्रतीक ठरला आहे.