सर्वोच्च न्यायालयाच्या संधीचा नक्की फायदा घेऊ; पुनर्विचार याचिकेबाबत चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया
23-Dec-2023
Total Views | 93
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वाखालील सरकार सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या क्युरेटिव्ह पिटीशन ऐकण्याच्या संधींचा नक्की फायदा घेईल, असे वक्तव्य उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. राज्य सरकारकडून दाखल करण्यात आलेली मराठा आरक्षणासंबंधी पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्विकारली आहे. यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, "आरक्षण फेटाळल्यानंतर महाराष्ट्र शासनाने जी क्युरेटिव्ह पिटीशन दाखल केली होती ती ऐकण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. २४ जानेवारीला यावर सुनावणी होणार आहे. देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा समाजाला न फसवता आरक्षण दिलं. परंतू, महाविकास आघाडीने सर्वोच्च न्यायालयात ही केस नीट चालवली नाही. मराठा समाज आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या कसा मागास आहे, हे त्यांना न्यायालयाला पटवून देता आलं नाही."
मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने दाखल केलेल्या पुनर्विचार याचिका (Curative Petition) वर सर्वोच्च न्यायालय बाजू ऐकून घेणार आहे. तरी, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून या प्रक्रियेतील एक दुवा म्हणून प्रचंड आनंद वाटतो.#मराठा_आरक्षण@CMOMaharashtra… pic.twitter.com/gXV4O3M4dk
"आता सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देईल हे माहिती नाही. परंतू, महाविकास आघाडीला ही केस नीट लढवण्यात रस नव्हता. मात्र, आता आम्ही सर्वजण कायदेतज्ञांची फौज उभी करून सर्वोच्च न्यायालयाला काही गोष्टी लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करणार आहोत," असेही ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "मराठा समाज हा मोठ्या प्रमाणात मागसला आहे, हे न्यायालयाला लक्षात आणून देण्यासाठी महाविकास आघाडी अपयशी ठरली. परंतू, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वाखालील सरकार क्युरेटिव्ह पिटीशन ऐकण्याची सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या संधींचा फायदा घेईल. नीट मांडणी झाल्यास सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलेलं आरक्षण पुन्हा एकदा मिळू शकतं, अशी आशा आहे. तसेच मराठा समाजामध्ये असलेला असंतोष, अस्वस्थता संपु शकेल," असेही ते म्हणाले आहेत.