पुरावेच नाही तर तपास कसा करणार? एस जयशंकर यांचा ट्रुडोंना टोला
16-Nov-2023
Total Views | 97
मुंबई : कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारतीय एजंटचा सहभाग असल्याचा आरोप केला होता. दरम्यान, आता भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी या आरोपांबाबत कॅनडा सरकारकडून पुरावे मागितले आहेत.
परराष्ट्रमंत्री एस जयशंकर हे पाच दिवसांच्या लंडन दौऱ्यावर असून बुधवार १५ नोव्हेंबर रोजी एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी कॅनडाने केलेल्या आरोपांवर भाष्य केले. ते म्हणाले की, भारत कोणत्याही प्रकारच्या तपासाला नकार देत नाही. परंतू, तपास करण्यासाठी भारतीय एजंटविरुद्ध काही पुरावे तरी द्यायला हवे, असे त्यांनी म्हटले आहे.
पुढे ते म्हणाले की, "आम्हाला असे वाटते की कॅनडाच्या राजकारणाने हिंसक आणि अतिरेकी राजकीय विचारांना स्थान दिले आहे, जे हिंसक मार्गांसह भारतापासून अलिप्ततावादाचे समर्थन करतात. या लोकांना कॅनडाच्या राजकारणात स्थान देण्यात आले आहे. त्यांना त्यांचे विचार मांडण्याचे स्वातंत्र्य दिले जाते," असेही ते म्हणाले.
तसेच “भाषण स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य एका विशिष्ट जबाबदारीसह येते. त्या स्वातंत्र्यांचा गैरवापर करणे आणि राजकीय हेतूने तो दुरुपयोग सहन करणे अत्यंत चुकीचे आहे. बघा, तुमच्याकडे असे आरोप करण्याचे काही कारण असेल तर आम्हाला पुरावे सादर करा. आम्ही तपासाला नकार देत नाही. पण त्यांनी अद्याप कोणताही पुरावा दिलेला नाही,” असेही ते म्हणाले आहेत.