अलीकडील काही घटनांवर दृष्टिक्षेप टाकला, तर राज्यातील काही विभागांतील नोकरशाहीमधील हलगर्जीपणा अधिक वाढला असल्याचे लक्षात येते. रुग्णालयातील निष्काळजीपणाने होणारे मृत्यू असोत की, लाचखोरी या दोन्ही कीड पुन्हा एकदा व्यवस्थेला पोखरत असून, ही स्थिती अधिक चिघळण्याची वाट न बघता, त्यावर गांभीर्याने सर्वांनी मिळून कठोर उपाययोजना तर केल्याचं पाहिजेत. पण, भविष्यात इतरांनाही वचक, धाक कायम राहील, असे कठोर निर्णयदेखील अमलात आणायला हवेत. राज्यातील काही भागांत रुग्णालयात झालेल्या मृत्यूवर राजकीय पक्षांनी राजकारण करणे सुरू केले आहे. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यास प्रत्युत्तर देत कठोर समज, या लोकांना देताना विषयाचे गांभीर्य लक्षात घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यात राज्यातील काही भागांत लाचखोरी प्रकरणातदेखील वाढ होत आहे. पुणे विभागात अलीकडील काळात शासनाचे सेवक या सापळ्यात अडकल्याच्या बातम्या विषण्ण करणार्या आहेत. एकीकडे सरकार नोकरशहा यांचा कामावरील ताण कमी करण्याचे प्रयत्न करीत असताना, या व्यवस्थेतील काही लोक चांगल्या लोकांचेदेखील मनोबल, अशा वर्तनाने खच्ची करीत असतात. आरोग्य क्षेत्रात तर सरकारने विविध योजना रुग्णसेवेसाठी केल्या असतानादेखील काही चार-दोन गुन्हेगार या सगळ्या चांगल्या योजनांवर पांघरून घालण्याचे काम करीत आहेत, त्यामुळे योजनांच्या लाभातून बरे झालेल्या रुग्ण संख्येऐवजी व्यवस्थेच्या गलथान कारभारमुळे रुग्ण बळी पडणे क्लेशकारक आहे, यामुळे निष्ठेने काम करणार्या सेवकांचा हिरमोड तर होतोच. पण, रुग्ण नातेवाईकांचादेखील व्यवस्थेवरील विश्वासाला तडा जात असतो. सरकारच्या ‘आयुष्मान भारत योजने’त पुणे जिल्ह्याचा विचार केला, तर सव्वाचार लाख लोक हे ‘गोल्डन कार्ड’ काढून लाभ घेणार आहेत. मात्र, रुग्णालयातील अनागोंदीतून बळी जाणे खरोखरच दुर्देवी आहे.
अलीकडील काळात जसा नोकरशाहीत हलगर्जीपणा वाढला आहे, तसा गुन्हेगारी क्षेत्रातील मुजोरीदेखील वाढली आहे. अमली पदार्थांच्या रॅकेटमुळे हे अधोरेखित झाले, असे खेदाने म्हणावे लागेल. तथापि, हे अमली पदार्थ ज्या वाईट हेतूसाठी आणले जात होते, तो हेतू मात्र सफल होऊ दिला नाही, ही याबाबतीत जमेची बाजू आहेच. मात्र, या तपास करणार्या यंत्रणांचेदेखील कौतुक करावं लागेल. पुणे आणि नाशिक तसेच मुंबईच्या काही भागांत या अमली पदार्थ तस्करी करणार्यांचा भांडाफोड तपास यंत्रणेने केला. तथापि, आपल्या देशाच्या सीमेवर असलेली सुरक्षा भेदून काही घरभेद्या लोकांचा हात धरून, या तस्करी करणार्यांनी केवळ उद्योग, व्यापार म्हणून नव्हे तर हे अमली पदार्थ या राज्यातील किंबहुना देशातील तरुणाईला बिघडविण्यासाठी भारतात आणले असल्याचे आवर्जून नमूद करावे लागेल. भारताची प्रगती न बघणार्या काही दुष्ट शक्ती कायम सक्रिय असतात, दहशतवाद पसरविण्यास भारतात त्यांना गेल्या ऩऊ वर्षांत अपयश आल्याने, या शक्ती आता भारताचे शक्तिस्थान असलेल्या तरुणाईला व्यसनांच्या आहारी नेऊन ठेवण्यासाठी सक्रिय झाल्याचे, या रॅकेटचा एकूणच प्रवास बघितला तर लक्षात येते. त्यात दुर्दैवाने भारतातील काही रिकामटेकडे लोक, अशा शक्तींना थारा देत असतात. हे त्याहून क्लेशकारक आहे, त्यामुळे यंत्रणेने ज्या तत्परतेने आणि चतुराईने या रॅकेटचा भांडाफोड केला, तो स्पृहणीय आहे. यात सहकार्य करणारे जे घरभेदी आहेत, अशांना आता भविष्यात कोणीही भारतविरोधी कारवायांना साथ देण्याचे धाडस करणार नाही, एवढी जबर कठोर शिक्षा आधी द्यायला हवी, त्या तस्करी करणार्या गुन्हेगारांना तर चौदावे रत्न दाखविलेच पाहिजे, यात दुमत असण्याचे कारण नाही. अमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम अतिशय घातक आहेत, व्यसनाला लागून आयुष्य उद्ध्वस्त तर होतेच. मात्र, यातून नंतरचा जो मानसिक घातक असा प्रवास सुरू होतो, तोदेखील लक्षात घेतला पाहिजे, हे गांभीर्य केवळ तपास करणार्या यंत्रणेनेनेच नव्हे, तर एकूणच आपल्या सामाजिक परिप्रेक्षातदेखील ध्यानी ठेवणे गरजेचे आहे. ज्या भारतीय भावी पिढीच्या हाती, या देदीप्यमान देशाचे भविष्य असणार आहे, ती तरुणाई अमली पदार्थांच्या आहारी गेलेली कशी चालेल? निव्वळ कोणत्याही गोष्टीवर राजकारण करणार्यांनी आणि तरूण कार्यकर्त्यांच्या भरोशावर आपल्या पोळ्या शेकणार्यांनी तरी मुजोर होऊ नये.
अतुल तांदळीकर