हल्लीच्या काळात मेडिकलच्या अॅडमिशन म्हणजेच प्रवेश प्रक्रिया ही बारावीनंतर होणार्या ‘नीट’च्या परीक्षेवर पूर्णपणे अवलंबून असते.ही परीक्षा शासकीय यंत्रणेमार्फत घेतली जाते व त्यानंतर मिळणार्या गुणांच्या आधारे मग विविध वैद्यकीय शाखांमध्ये मुलांना प्रवेश दिला जातो. वरकरणी ही अत्यंत साधी व सरळ प्रक्रिया वाटली तरी या प्रक्रियेच्या प्रारंभीपासूनच चुकीच्या व गैर प्रकारांना सुरुवात होत असते. सर्वप्रथम आपण या विषयाच्या खोलात जाण्यासाठी वैद्यकीय शाखेविषयीची लोकांची व पर्यायाने समाजाची मानसिकता बघितली पाहिजे.
आपल्याच काय, पण परदेशातील समाजातही एक अशी दृढ भावना असते की, एकदा मुलगा किंवा मुलगी डॉक्टर झाली की मग आयुष्याची इतिकर्तव्यता झाली. डॉक्टर होणे हे चांगलेच आहे, यात वादच नाही. पण, बहुतेक सर्व लोकांचे त्यामागचे कारण हे या क्षेत्रात मिळणारा पैसा तसेच आरामदायी राहणीमान मिळते, हे असते. परंतु, वैद्यकीय क्षेत्रातील मेहनत व धोके पत्करण्याची तयारी याबद्दल ते अतभिज्ञ असतात. रुग्णसेवा करण्यासाठी डॉक्टर व्हायचयं, असा एखादाच विद्यार्थी सांगतो. ‘डॉक्टर’ या शब्दाला तसेच या व्यवसायाला एक मोठे वलय प्राप्त झाले आहे आणि याचे मुख्य कारण म्हणजे, याचा थेट संबंध माणसाच्या प्रकृती आरोग्य आणि जीवाशी असतो.
एखाद्या देशाचा पंतप्रधान असो, राष्ट्रपती असो किंवा मुख्यमंत्री, सुपरस्टार किंवा महान खेळाडू किंवा व्यावसायिक असो, थोरांपासून लहानांपर्यंत आरोग्याच्या बाबतीत सर्व कोणाचे जर ऐकत असतील, तर ते डॉक्टरांचेच. म्हणूनच डॉक्टरांना अनन्यसाधारण महत्त्व असते. डॉक्टरांचीही काही कर्तव्ये असतात व ती तर त्यांनी नीट पाळली, तर डॉक्टरांना अक्षरश: देवाचा दर्जा दिला जातो. याचमुळे डॉक्टरीपेक्षा व डॉक्टर हे रुग्णाच्या भावनिक व शारीरिकदृष्ट्या फार महत्त्वाचे ठरतात.
जगामध्ये तर सर्वांत संवेदनशील गोष्ट कुठली असेल, तर ती म्हणजे माणसांचे आरोग्य व माणसाच्या जीवाचे महत्त्व. कितीही सोईसुविधा घरबसल्या मिळत असल्या तरी ज्यावेळी आरोग्य बिघडते किंवा जीवनमरणाचा प्रश्न येतो, त्यावेळी सर्वात जास्त डॉक्टरांची आठवण येते व गरजही पडते (बरे झाल्यावर बहुतेक वेळा याच्या विरुद्ध प्रतिक्रिया मिळते ही गोष्ट वेगळी... ‘गरज सरो आणि वैद्य मरो’ ही म्हण उगाचच प्रचलित नाही झाली... असो या विषयावर नंतर विस्ताराने बोलू.) तर थोडक्यात काय की, वैद्यकीय पेशा म्हणजेच डॉक्टर हे समाजाच्या हितासाठी असलेले एक अत्यंत महत्त्वाचे अंग मानले जाते. आपण त्यांना समाजाचे आधारस्तंभही म्हणतो. पूणर्र् जगभरात म्हणूनच या व्यवसायाला प्रचंड मान आहे व मागणीसुद्धा. आता सर्वांत मोठा दैवदुर्विलास इथूनच सुरू होतो. कारण, ज्यावेळी काही ठरावीक लोभी, लालची व लबाड लोकांच्या हे लक्षात आले की, हा व्यवसाय म्हणजे हिर्याची अंडी देणारी कोंबडी आहे, तेव्हापासून या व्यवसायाचा धंदा झाला व सर्व पावित्र्याचे अपवित्र रुपात रुपांतर झाले. (क्रमश:)
-डॉ. मंदार पाटकर
(लेखक एमडी होमियोपॅथी आहेत.)