मुंबई(प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक तालुक्यातील अंबोली गावातून बिबट्याच्या कातडीची तस्करी केल्या प्रकरणी सोमवार दि. ५ सप्टेंबर रोजी चार जणांना अटक करण्यात आली. इगतपुरी वन परिक्षेत्र कार्यालयाला मिळालेल्या माहितीनुसार वन विभागाने बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या चार इसमांना रंगे हात पकडले आहे. वन विभागाने खरेदी करण्याच्या आवेशाने सापळा रचून या चौघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या कारवाई दरम्यान या आरोपींनी वन विभागाच्या कर्मचांऱ्यावर दगडफेक करण्याचा प्रयत्न केला. परंतु, वन विभागांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या चारही आरोपींना ताब्यात घेतले आहे.
कातडी खरेदी करण्याच्या उद्देश्याने या आरोपींना भेटायचे ठरले. आरोपींनी भेटीची जागा चार वेळा बदलली. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस हे या आरोपींना भेटायला गेले. तेव्हा आपण अडकलो असल्याचे तस्करांना कळताच त्यांनी वन विभाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर दगडफेक करत त्यांच्याशी झटापट केली. प्रसंगावधान राखून वनपरीक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांनी आपल्याजवळील पिस्तूल काढत हवेत गोळीबार केला. त्याचवेळी त्र्यंबकेश्वर वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. वनकर्मचा-यांनी एकुण चार आरोपींना ताब्यात घेऊन बिबट्याची कातडी आणि दोन दुचाकी वाहन ताब्यात घेतली आहेत. या प्रकरणाची पुढील चौकशी चालु आहे.हे चारही आरोपी पालघर जिल्ह्यातील आहेत. प्रकाश लक्ष्मण राऊत, परशुराम महादु चौधरी, यशवंत हेमा मौळी, व हेतु हेमा मौळी, या चारही आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांना न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. या कारवाई दरम्यान पंकजकुमार गर्ग, उपवनसंरक्षक, पश्चिम भाग, नाशिक, आणि अनिल पवार, सहाय्यक वनसंरक्षक (रोहयो व वन्यजीव), पश्चिम भाग, नाशिक यांनी मार्गदर्शन केले. तसेच इगतपुरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी केतन उमाकांत बिरारीस यांनी धडक कारवाई करत या आरोपींना ताब्यात घेतले.