मुंबई (विशेष प्रतिनिधी) - काजू लागवडीमध्ये स्थानिक झाडे लावल्यास त्याच्या फायदा पक्षी जैवविविधतेला कसा होतो, यासंबंधीचे संशोधन 'नेचर काॅन्झर्वेशन फाऊंडेशन' (एनएसीएफ) आणि भारतीय वन्यजीव संस्थान (डब्लूआयआय) या संस्थेच्या संशोधकांनी केले आहे (Cashew Landscapes in sindhudurg). सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात हे संशोधन पार पडले (Cashew Landscapes in sindhudurg). यामाध्यमातून एकसुरी पद्धतीच्या काजू लागवडीच्या तुलनेत काजू लागवडीमध्ये स्थानिक झाडे असणाऱ्या बागेत पक्ष्यांची विविधता कशी बदलते याचा अभ्यास करण्यात आला. (Cashew Landscapes in sindhudurg)
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये कोणतेही संरक्षित वनक्षेत्र नाही. याठिकाणी बहुतेक जंगले ही खाजगी मालकीची आहेत. ही जंगले कापून आता त्याठिकाणी काजू, रबर किंवा अननस अशा एकसूरी पद्धतीच्या पिकांची लागवड केली जात आहे. बागेत जर केवळ काजूच्या झाडाची एकसुरी लागवड केल्यास पक्ष्यांच्या अधिवासावर आणि विविधतेवर कसा प्रभाव पडतो याचा अभ्यास दोडामार्ग तालुक्यात 'एनएसीएफ' आणि 'डब्लूआयआय'च्या संशोधकांनी केला. नंदिता मधू आणि विशाल साडेकर यांच्या नेतृत्वाखालील हे संशोधन पार पडले. यासंबंधीचे शोधवृत्त नुकतेच 'फॉरेस्ट इकॉलॉजी अँड मॅनेजमेंट' या नियतकालिकामध्ये प्रकाशित झाले.
संशोधकांनी २०२४ मध्ये पक्ष्यांच्या प्रजनन हंगामात १०० ठिकाणी सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात त्यांना आढळून आले की, काजू लागवडीमध्ये स्थानिक झाडांचे अस्तित्व आणि आजूबाजूच्या जंगलाचे प्रमाण हे दोन्ही घटक त्याठिकाणी पक्षी विविधता टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वाचे आहेत. मलबारी राखी धनेश, मोठा सोनपाठी सुतार आणि राखी कपाळाची हरोळी यांसारख्या पश्चिम घाटात प्रदेशनिष्ठ असणाऱ्या पक्ष्यांच्या प्रजाती या काजू लागवडीमध्ये स्थानिक झाडांचे अस्तित्व असणाऱ्या ठिकाणी अधिवास करत असल्याचे निरीक्षण, संशोधकांनी टिपले. याशिवायी नंदिता मधू यांनी सांगितले की, "हवामानसोबतच्या सहनशीलतेमुळे आणि आर्थिक मूल्यामुळे काजू लागवडीचे प्रमाण वाढले असून त्यामुळे जंगलतोडीचे प्रमाणही वाढले आहे. आमच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की काजू लागवडीमधील स्थानिक झाडे आणि जवळील वनक्षेत्र पक्ष्यांसाठी आवश्यक आश्रयस्थान प्रदान करतात."
संशोधकांना असे आढळून आले की, ज्या काजूच्या बागेत स्थानिक झाडे टिकून आहेत त्याठिकाणी एकसूर लागवडीच्या तुलनेत धनेश आणि काळ्या डोक्याचा सातभाई सारखे पक्षी अधिक आहेत. त्यामुळे आपण जैवविविधता आणि उपजीविका या दोन्ही घटकांना प्रोत्साहन देणारी वृक्षरोपनाची पद्धत अमलात करण्याची गरज संशोधक विशाल सडेकर यांनी बोलून दाखवली.
संस्थेच्या पुनरुज्जीवन प्रकल्पाविषयी
बंगळूरूच्या ‘नेचर काॅन्झर्वेशन फाऊंडेशन’ (एनसीएफ) या संस्थेअंतर्गत वन्यजीव संशोधक रोहित नानिवडेकरआणि त्यांची टीम महाराष्ट्रातील सह्याद्रीत अधिवास पुनरुज्जीवनाचे काम करत आहे.त्यांच्या या प्रकल्पाच नाव आहे, 'इकोलाॅजिकल रेस्टोरेशन इन नाॅर्दन वेस्टर्न घाट'. हा प्रकल्प 'गोदरेज कन्झ्युमर प्रोडक्ट्स लि.' यांच्या आर्थिक सहकार्याने राबविण्यात येत आहे. सह्याद्री पर्वतरांगांमध्ये विशेषतः दोडामार्ग, कुडाळ आणि संगमेश्वर या तालुक्यांवर लक्ष केंद्रित करून प्रदेशनिष्ठ आणि धोक्यात आलेल्या वन्यजीवांसाठी महत्त्वपूर्ण अन्नस्रोत असणाऱ्या स्थानिक वृक्ष प्रजातींची लागवड करण्याचा या प्रकल्पाचा उद्देश आहे. समाजभिमुख असणारा हा प्रकल्प स्थानिक शेतकरी आणि जमीन मालकांच्या भागीदारीमधून राबवला जात आहे. जमीनमालकाने उदारतेने दिलेल्या जागेमध्ये लावलेल्या झाडांची किमान दोन वर्षे काळजीपूर्वक देखभाल केली जात आहे. जेणेकरून त्यांचे अस्तित्व आणि दीर्घकालीन परिणाम सुनिश्चित होतील.