ऐसा सर्वांगे सुंदरु।
सकळ विद्यांचा आगरु।
विविध पुराणांमध्ये श्रीगणनायकाचे वर्णन अतिशय विलोभनीय केले आहे. परंतु, समर्थ रामदासस्वामींनी केलेले दासबोधातील गणरायाचे वर्णन वाचले की त्याची हुबेहूब प्रतिमा आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते आणि मुख्यतः एवढे अचूक असे वर्णन समर्थांनी केले कसे? हा प्रश्न पडतो. तेव्हा गणेशोत्सवानिमित्त दासबोधातील श्रीगणेश दर्शन...
सबोध लिहिण्यास आरंभ करण्यापूर्वी समर्थ रामदासस्वामी मोरगाव येथे श्रीगणेशाच्या दर्शनासाठी गेले होते. समर्थ रामदासांनी गणरायास प्रार्थना केली, ’मी आता मोठ्या ग्रंथाचे काम करण्यास आरंभ करत आहे, आपला आशीर्वाद असावा,’ असे म्हणताच मयुरेश्वराने समर्थांस दर्शन दिले आणि यावेळी त्यांस जे गणरायाचे रूप दिसले त्याचे वर्णन रामदासस्वामी आपल्या दासबोधात केले आहे.
१४ विद्या ६४ कला ज्या श्रीगणरायाला अवगत आहेत, त्या गजाननाच्या विश्वव्यापक रूपाचे आणि त्यांच्या सामर्थ्याचे वर्णन आपल्या सार्थ श्रीमत् दासबोधाच्या आरंभी करताना समर्थ रामदासस्वामी म्हणतात,
॥श्रीराम॥ ॐ नमो जि गणनायेका। सर्वसिद्धी फळदायेका। अज्ञानभ्रांतिछेदका। बोधरूपा॥
म्हणजेच काय तर जो सर्व सिद्धींचे फळ देतो, अज्ञानरुपी तिमिर दूर सारतो आणि जो स्वतः मूर्तिमंत ज्ञानाचे ओंकाररूप आहे, त्या श्रीगणरायाला माझे वंदन असो. श्रीगणरायाची कृपादृष्टी जर झाली, तर त्याच्याच कृपेच्या सामर्थ्याने आपले अज्ञान दूर होऊन हे विश्व गिळून टाकणारा काळ आपला गुलाम होऊ शकतो, एवढेच नाही, तर श्रीगणेशाच्या नामस्मरणाने कोणतेही संकट आपल्या आजूबाजूला फिरकतही नाही.
आणि म्हणूनच समर्थ रामदासस्वामी म्हणतात,
’म्हणौनी नामे विघ्नहर। आम्हा अनाथांचे माहेर। आदिकरुनी हरिहर। अमर वंदिती।
म्हणून श्रीगणेशाला ’विघ्नहर’ म्हणतात, ज्याचे जगात कोणी नाही त्याचे तो आश्रयस्थान होतो - साक्षात श्रीविष्णू, भगवान शंकर हेदेखील मंगलमूर्तीला वंदन करतात. या गणेशाला वंदन करून जर कोणत्या कार्याचा आरंभ केला तर ते कार्य सर्व बाजूंनी सुफळ संपूर्ण होते. पुढे समर्थ म्हणतात, अशा गणरायाचे लोभस रूप डोळ्यांमध्ये साठवून घ्यावेसे वाटते. त्याचे रूप बघत असताना संपूर्ण मन डोळ्यांमध्ये एकवटते. समर्थ म्हणतात,
’सर्वकाळ मदोन्मत्त।
सदा आनंदे डुल्लत। हरुषे निर्भर उद्दित। सुप्रसन्नवदनु।
ज्याच्या गंडस्थळातून म्हणजेच मस्तकातून सतत मद गळत असतो. या गळणार्या मदाच्या सुगंधामुळे त्याच्याभोवती भोंग्यांचे थवे कायम गर्दी करतात. परमानंदाने तो डोलत असतो आणि आतून उसळणार्या आनंदामुळे त्याचे वदन कायम प्रसन्न असते. त्याच्या जबर शक्तिमान आणि प्रचंड देहामुळे त्याचे रूप भव्य आणि धिप्पाड दिसते. अशा या गणरायाच्या कपाळावर दाट शेंदूर लावला आहे. त्याची सोंड कधी सरळ तर कधी मुरडलेली असते, त्याचा अधर खाली लोंबत असतो. त्याचा उग्र गंध असलेला मद क्षणाक्षणाला थोडाथोडा गळत असतो.
पुढे वर्णन करताना समर्थ रामदासस्वामी म्हणतात, ’गणराज १४ विद्या, ६४ कलांचे स्वामी आहेत. ज्याचे डोळे लहान आहेत, सूक्ष्म आहेत, परंतु, त्यांच्या दृष्टीत संपूर्ण विश्व सामावू शकते. त्यांचे लवचिक कान तर पंख्यासारखे हलत असतात. त्यांच्या मुकुटातील माणिक रत्ने आणि कानांमधील कुंडले यांच्या तेजाने दशदिशा प्रकाशाने न्हाऊन निघाल्या आहेत. तो चतुर्भुज आहे आणि त्याने पितांबर नेसले आहे.
त्याचे उदर म्हणजे पोट मोठे आहे- लंब आहे आणि कंबरेला जीवंत नाग आहे आणि तो नागदेखील त्याच्या बेंबीभोवती फणा काढून फुत्कार टाकत, सभोवताली टकामका बघत डोलत असतो. श्रीगणेश यज्ञोपवीत म्हणजेच जानवे म्हणूनसुद्धा नागच धारण करतो. त्याच्या कंबरेच्या साखळीवरील घुंगरांचा मंद टणत्कार तो नृत्य करताना सर्वत्र घुमतो.
नाना याति कुशममाळा। व्याळपरियंत रुळती गळा। रत्नजडित हृदयकमळा। वरी पदक शोभे।
म्हणजेच या गणरायाच्या गळ्यात नाना तर्हेच्या फुलमाळा आहेत. त्यांच्या कंबरेभोवती गुंडाळलेल्या सर्पापर्यंत त्या माळा रुळत आहेत. एवढेच नाही, तर त्याच्या हृदयाजवळ रत्नजडित पदके मोठी शोभून दिसत आहेत. किंबहुना, त्याच्या रुपामुळे ही पदके अधिक सुंदर दिसत आहेत. त्याच्या चार हातांपैकी एका हातात, संकटावर मात करण्यासाठी आणि रक्षणासाठी घेतलेले परशु आहे, दुसर्या हातात असलेले कमळ हे ज्ञानाचे आणि हिंदू धर्माचे प्रतीक आहे, तिसर्या हातामध्ये टोकदार तेजस्वी अंकुश आहे आणि चौथ्या हातामध्ये मोदक आहे, या मोदकाचा अर्थही आपण ज्ञानाचे प्रतीक असा घेऊ शकतो. कारण, आपल्यामधील अज्ञानाचे कवच बाजूला सारले तर आपल्याही आतमध्ये ज्ञानाचे मधुर सारण आहे.
असा हा श्रीगणेश देहाने जरी स्थूल असला तरी अतिशय चंचल आहे, सर्वांत चपळ आहे. त्याचे नृत्य बघून डोळ्यांचे पारणे फिटते.
नट नाट्य कळा कुसरी। नाना छंदे नृत्य करी। टाळ मृदांग भरोवरी। उपांग हुंकारे।
तो नृत्य करत असताना त्याच्या पायातील आणि वाकीचे घुंगरू रुणुझुण निनादात असतात. अशा या मंगलमूर्तीमुळे ईश्वरांच्या सभेत मोठी शोभा येते. त्यांच्या दिव्य वस्त्रांचे तेज सर्वत्र पसरले आहे आणि त्याच्या सान्निध्यामुळे अष्टनायिकादेखील साहित्य निर्मितीस साहाय्य करतात.
अशा श्रीगणेशाचे वर्णन करून समर्थ रामदासस्वामी शेवटाकडे येताना म्हणतात,
ऐसा सर्वांगे सुंदरु।
सकळ विद्यांचा आगरु।
त्यासी माझा नमस्कारु।
साष्टांग भावे।
अशा सर्वांग सुंदर आणि सर्व कला आणि विद्यांचा स्वामी असलेल्या गणरायाला साष्टांग दंडवत घालत समर्थ म्हणतात, गणेशाच्या रूपाचे चिंतन केले तरी अज्ञानरूपी तिमिर दूर सारून ज्ञानरुपी तेजाचा प्रकाश पसरतो. एवढेच नाही, तर त्यांच्या गुणांचे वर्णन ऐकले तर साक्षात श्रीसरस्वतीदेखील प्रसन्न होते. ब्रह्मदेव देखील गणेशाला वंदन करतात. म्हणून आपल्या बौद्धिक प्रगतीसाठी गणपतीची आराधना करावी. जी माणसे अवलक्षणी आणि मूढ असतात ते देखील श्रीगणेशाच्या चिंतनाने सर्व विषयांत पारंगत होतात. कारण, १४ विद्या ६४ कलांचा अधिपती हा गणपती आहे.
कलियुगासारख्या हिंसाचारी आणि तामसी युगात तेवढेच प्रभावी दैवत हवे म्हणून भक्त रणमर्दिनी असलेल्या कालिकामातेची आणि श्रीगणेशाची आराधना - उपासना करतात आणि अखेरीस समर्थ रामदासस्वामी म्हणतात,
ऐसा गणेश मंगळमूर्ती। तो म्या स्तविला येथामती। वांछ्या धरुनी चित्ती। परमार्थाची।
मनात परमार्थाची इच्छा धरून मी माझ्या बुद्धीप्रमाणे त्या मंगलमूर्तीची स्तुती केली आहे.
समर्थांनी केलेले हे विनायकाचे वर्णन वाचून-चिंतन करून देखील त्याचे रूप आपल्या मनःपटलावर उभे राहते. साक्षात मंगलमूर्तीचे दर्शन मिळण्यासाठी तपश्चर्या, साधना, उपासना, भक्तीदेखील समर्थ रामदासस्वामींप्रमाणेच करायला हवी. लौकिक रुपात आज ते कितपत शक्य आहे, हे ठाऊक नाही ; परंतु म्हणूनच समर्थांनी आपल्या दासबोधात केलेले वर्णन हे देखील श्रीगणेश भक्तांसाठी, रंजल्या-गांजल्यांसाठी तेवढेच समर्थ आहे, हे मात्र नक्की!
वेदश्री दवणे