हिंदुत्वाचा हुंकार - नामदार एकनाथ शिंदे

    12-Aug-2022
Total Views | 128

ekanth
 
 
 
ठाण्यातील विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत सेवाभावी संस्थांतर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आज आयोजन करण्यात आले आहे. डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात आज सायंकाळी ६ वाजता होणार्‍या या सत्कार सोहळ्यानिमित्त ठाणेकर असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्तृत्वाचा परीघ उलगडणारा हा लेख...
 
 
बोडीत दंगल पेट घेत होती. रात्रीचे १ वाजलेले. आम्ही काही पत्रकार पोलिसांच्या आश्रयाने स्थितीचा अंदाज घेत होतो. परिस्थिती हाताबाहेर जाईल की काय असे वाटत होते. रोबोडी पोलीस स्टेशन समोरील बेकरी आगीने धुमसत होती. बेकरीच्या हाकेच्या अंतरावर दोन मोठ्या मशिदी होत्या. अशा तणावाच्या वातावरणात सोबत सात-आठ विश्वासू माणसं घेत एकनाथ शिंदे थेट वस्तीत शिरले. अवघ्या तासाभरात परिस्थिती नियंत्रणात आली. धर्मवीर आनंद दिघेंच्या नंतर देश, धर्म आणि कर्मभूमीवर निस्सीम प्रेम करणारा निधड्या छातीचा क्रांतिवीर एकनाथ शिंदे यांच्या रुपाने ठाणेकर व महाराष्ट्राने अनेक वेळा अनुभवला.
 
 
कोकण, सांगली, सातार्‍यातला महापूर असो, अतिवृष्टीमुळे संसारच ओलिताखाली गेलेली स्थिती असो की ‘कोविड’ची रणभूमी असो, हा माणूस सर्वशक्तीनिशी संकटाचा सामना करण्यासाठी निडरपणे उभा ठाकलेला महाराष्ट्राने पाहिला. हिंदुत्ववादी शिवसेनेसोबतचे नवयुतीचे सरकार महाराष्ट्रात स्थापन होऊन जो उणापुरा कालखंड गेला, यात ज्या संयमीपणे एकनाथ शिंदे यांनी आपल्या कृतीमागे कारणमीमांसा मांडली ती नक्कीच वाखाणण्याजोगी आहे. एक सर्वसामान्य पार्श्वभूमी असलेल्या आमदाराच्या मागे जेव्हा महाराष्ट्रातल्या कानाकोपर्‍यातील ६०हून अधिक कर्तृत्ववान आमदार उभे राहतात, तेव्हा एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या ३० वर्षांच्या राजकीय जीवनात काय काय पेरून ठेवलेले आहे, याचा अंदाज येतो.
 
 
मितभाषी असलेले एकनाथ शिंदे बोलतात कमी, ऐकतात जास्त आणि ते ज्याप्रकारे व्यक्त होतात याची चाहूल अनेकांना खूप उशिरा लागते. तोपर्यंत शिंदेंचा डाव यशस्वी झालेला असतो. हे कसे घडते? याचा जेव्हा विश्लेषक विचार करतात तेव्हा लक्षात येते की, गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत लाखो माणसं त्यांनी जोडलेली असतात आणि योग्य वेळी योग्य माणूस योग्य कामासाठी कसा खर्ची करायचा, याचे कौशल्य एकनाथ शिंदेंकडे असल्याचे जाणवून येते. प्रत्येक शहरातील पत्रकार, कलावंत, समाजकारणी, विविध व्यावसायिक गटाचे प्रतिनिधी यांच्याशी त्यांचे सख्य वादातीत आहे. व्यक्ती, आमदार, मंत्री म्हणून लोकांना दिसणारे एकनाथ शिंदे यांची ‘बॅक एन्ड यंत्रणा’ अभूतपूर्व अशी आहे. एका रात्रीत कोणताही कार्यक्रम ‘वाजवण्याचा’ हातखंडा असलेली माणसं एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यात आहेत.
 
 
एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत परिस्थितीनुरुप चौकटी भेदल्या. शाखाप्रमुख ते नगरसेवक, नगरसेवक ते सभागृह नेता, ते थेट मंत्री आणि अंतिमत: मुख्यमंत्री. पण, हा प्रवास करताना कुठेही आततायीपणाचा दर्प जाणवला नाही. शिंदे काम करत राहिले, अपेक्षित निकाल देत राहिले आणि त्याबदल्यात नियतीने त्यांना अगदी भरभरून दिले.माणसं एका रात्रीत मोठी होत नसतात, त्याच्या मागे असंख्य वर्षांची साधना, वैचारिक कटिबद्धता, सर्वस्व झोकून काम करण्याची तयारी या गुणांमुळे व्यक्तीचे सामर्थ्य वाढत राहते. एकनाथ शिंदे यांच्याकडे या गुणांव्यतिरिक्त सर्वसमावेशकता, गुणग्राहकता यांची अलौकिक दैवी देणगी असल्याचा अनुभव अनेकांनी घेतला आहे.
 
 
राजकारणातील एकनाथ शिंदेंपेक्षा राजकारणाच्याही पलीकडे असलेले एकनाथ शिंदे ज्यांनी ज्यांनी अनुभवले, त्यांनी त्यांनी त्यांच्यावर भरभरून प्रेम केले. महाराष्ट्रातील अनेकांच्या वाट्याला राजकारणी एकनाथ शिंदे कधीच आले नाहीत; त्यांच्यासाठी ते नेहमीच पालक, हितचिंतक असेच राहिले. महाराष्ट्राचे एक मोठं नेतृत्व असताना श्रेयवादाच्या जाणिवेचा स्पर्शदेखील एकनाथ शिंदे यांनी अनेकांच्या बाबतीत जाणवू दिला नाही. आज ते मुख्यमंत्री झाले हा ठाण्याचा, महाराष्ट्राचा आणि जनसामान्यांतील प्रत्येक राष्ट्रप्रेमी नागरिकांचा गौरव आहे. माणसांवर प्रेम करत राहिले, तर ते तुमच्यावर करत राहतात, तुमच्या सुख-दु:खात पहाडासारखे तुमच्यामागे प्रत्येक कसोटीच्या क्षणी उभे राहतात, हा अनुभव आज एकनाथराव शिंदे घेत आहेत.
 
 
पालघर साधू हत्याकांड, सावरकरांची बदनामीसारख्या असंख्य विषयांबाबत जेव्हा मुस्कटदाबी होऊ लागली तेव्हा आपल्याला विचारांच्या आणि हिंदुत्वाच्या लढाईसाठी एक मोठा संघर्ष उभा करावा लागेल, या अंतिम निर्णयापर्यंत एकनाथ शिंदे आले. कारण, ठाणे, पालघर, कोकण व महाराष्ट्रातील गडचिरोली व इतर बागांमध्ये पक्षाला हे यश एकनाथ शिंदेंनी प्रदीर्घ मेहनतीने खेचून आणलेले. त्याच्या आत्म्यालाच धक्का लागण्याची स्थिती निर्माण झालेली. एकनाथ शिंदे यांचे प्रभावक्षेत्र असलेल्या ठिकाणी जर भविष्यात पक्ष पराभूत झाला, तर तो पराभव पक्षाचा न मानता एकनाथ शिंदे यांचा पराभव मानला जाईल. इतकी राजकीय समीकरणं दृढ झाली होती. पक्षनेतृत्वाला यश हवे असते. पण, यश ज्या समीकरणातून मिळते, त्या समीकरणाचा पायाच कमकुवत होऊ लागला, तर प्रसंगी एकांडी शिलेदार होत आपत्ती व्यवस्थापन करावेच लागते आणि एकनाथ शिंदे यात तरबेज आहेत, हे आज कुणीही मान्य करेल.
 
 
एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या राजकीय प्रवासात कधीही बंडांची भाषा केली नाही. कुठल्या गटा-तटात ते अडकले नाहीत. पक्ष, विचार यांच्यावर असलेली त्यांची असीम निष्ठा व दिवसातील १८ तास काम करण्याची त्यांची क्षमता त्यांना राज्याच्या मुख्यमंत्रिपदापर्यंत घेऊन गेली. समाजात दुही माजेल, अशांतता निर्माण होईल, अशी कुठलीही कृती किंवा वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी आजतागायत केलेले नाही. त्यांच्या शब्दांपेक्षा त्यांची कृती जास्त बोलत राहिली. ठाण्यातील समकालीन व राजकीय नेत्यांपेक्षा ते सरस ठरले. कारण, हा माणूस सतत जमिनीवर राहिला. महाराष्ट्रातील क्रमांक-२ चा मंत्री असताना देखील गल्लीतील प्रश्न घेऊन आलेल्या गरजवंतांचेदेखील गार्‍हाणं तितक्याच तन्मयतेने ते ऐकत व त्याचा निपटारा करत. पूर्णवेळ समाजकारण आणि राजकारण करण्याची त्यांच्यात असलेली उर्मी ही इतक्या पराकोटीची आहे की, त्यांचे प्रतिस्पर्धी आकांडतांडव करूनही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत. महाराष्ट्राला आता वेगवान कृतिशील नेतृत्वाची गरज आहे. एकनाथ शिंदे यांचे उभे आयुष्यचं कृतिशीलतेच द्योतक आहे.
 
 
दै. ‘मुंबई तरुण भारत’चा प्रतिनिधी व ‘समर्थ भारत व्यासपीठ’ संस्थेचा कार्यकर्ता म्हणून काम करत असताना, एकनाथ शिंदे यांना विविध अंगांनी अनुभवात आले. गणेशोत्सव काळातील निर्माल्य व्यवस्थापनाचा अभिनव प्रयोग ठाण्याने महाराष्ट्राला दिला. गेल्या १६ वर्षांत न चुकता ठाण्यातील विविध गणेशोत्सव घाटावर काम करत असलेल्या ‘समर्थ भारत व्यासपीठा’च्या सफाई सेवकांना भेटल्याशिवाय शिंदे साहेब राहत नाहीत.सिग्नल शाळेची दोन मुले जेव्हा दहावी उत्तीर्ण झाली तेव्हा साहेबांनी व्यक्तिश: या मुलांना आनंदाश्रमात बोलवून त्यांचे कौतुक केले. तसेच त्यांच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी स्वीकारण्याची घोषणा केली. लाखो मुलांचा दहावीचा निकाल त्या दिवशी लागलेला, मात्र शिंदे यांच्यातील गुणग्राहकता आणि त्यांच्यातील अंत्योदयाची प्रेरणा किती जाज्वल्य आहे, याचं द्योतक म्हणजे साहेबांनी सिग्नल शाळेच्या मुलांवर केलेली निरपेक्ष माया होय. खा. श्रीकांत शिंदे यांच्या लग्नाच्यावेळी फक्त सिग्नल शाळेच्या मुलांसाठी शिंदे साहेबांनी वेगळा स्वागत समारंभ ठेवलेला व शिंदे साहेबांनी स्वतः मुलांसोबत भोजन केले. हा स्नेह ती मुलं कधीच विसरू शकत नाही.
  
 
वैचारिक बांधिलकी आणि हिंदुत्वाच्या धाग्याने एकनाथ शिंदे साहेब राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी व त्या विचारांशी संलग्न सर्व संस्थांशी जोडलेले राहिले. कधीकाळी राजकीय अपरिहार्यता असतानादेखील त्यांनी या विचाराशी प्रतारणा केली नाही. हिंदुत्वाच्या विचाराला पाण्यात पाहत असलेल्या कडबोळ्या महाविकास आघाडी सरकारमध्ये असतानादेखील त्यांनी या विचाराशी असलेले ममत्व नाकारले नाही. महाराष्ट्रातील अनैसर्गिक सत्ताकारणामुळे वातावरण तणावपूर्ण असतानादेखील ठाणे येथे ‘टीजेएसबी’ सहकारी बँकेच्या कार्यक्रमाला आलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांची सदिच्छा भेट त्यांनी घेतली. त्याबाबत जेव्हा चर्चा झाली, तेव्हा त्यांनी त्यांच्यात आणि आमच्या हिंदुत्वाचा समान विचार असल्याचे छातीठोकपणे सांगितले. त्यामुळे त्यांचे हिंदुत्व केवळ राजकीय नाही, तर जीवनाचा अविभाज्य भाग असल्याचे अधोरेखित होते.
 
 
 
आगामी काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना अनेक आव्हानं पेलायची आहेत. काळू धरणाचं भिजत घोंगडं मार्गी लावायचं आहे. मेट्रो, समृद्धी महामार्ग, बुलेट ट्रेन, उद्योगातील गुंतवणूक, पर्यावरण संवर्धन, कृषी व पर्यटन विकास, दुर्बल घटकांचा अंत्योदय, अशा विविध आघाड्यांवर त्यांना वेगाने वाटचाल करावी लागणार आहे. वैचारिक अंतर्विरोधामुळे महाराष्ट्रातील गढूळ झालेले समाजजीवन पुन्हा एकदा नितळ करण्याची जबाबदारी राज्याचे नेतृत्व म्हणून एकनाथ शिंदेंवर आली आहे. ‘आम्ही हिंदुत्वाच्या पालखीचे भोई आहो’ असा उल्लेख एकनाथ शिंदे नेहमीच करतात. हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व, हिंदुत्व म्हणजे समरस्ता आणि हिंदुत्व म्हणजेच सर्वांगीण विकास हे त्रिकालबाधित सत्य प्रत्यक्षात उतरवण्यासाठी एकनाथ शिंदेंमधील नेतृत्वाचा कस लागणार आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे वैचारिक वारसदार म्हणून एकनाथ शिंदे हे शिवधनुष्य नक्कीच पेलतील, असा विश्वास वाटतो.
 
 - भटू सावंत
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
विदेशी आक्रांतांचे महिमामंडण थांबवलेच पाहिजे : योगी आदित्यनाथ

विदेशी आक्रांतांचे महिमामंडण थांबवलेच पाहिजे : योगी आदित्यनाथ

विदेशी आक्रांतांचे महिमामंडण थांबवलेच पाहिजे. राजा सुहेलदेवने २०-२५ हजार सैनिकांसह दीड लाख सैनिक असलेल्या सालार गाझी मसूदचा पराभव केला. त्याला जिवंत पकडले आणि इस्लाममधील नरकाच्या बरोबरीची शिक्षा त्याला देण्यात आली. उत्तर प्रदेशात अशा गाझीच्या नावाने भरणारा मेळाव्याचे नाव बदलून महाराजा सुहेलदेव यांच्या नावाने मेळा भरवण्यास सुरुवात केली", असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. महाराज सुहेलदेव यांच्या विजय दिनानिमित्त मंगळवारी बहराइच येथे आयोजित कार्यक्रमात योगी आदित्यनाथ उपस्थित ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121