"आदित्य ठाकरेंनी शिवसेनेतील वाचाळवीरांचे अनुकरण करू नये"
दीपक केसरकारांचा आदित्य ठाकरेंना टोला
22-Jul-2022
Total Views | 53
68
मुंबई : आदित्य ठाकरेंनी बोलताना शिवसेनेतील वाचाळवीरांचे अनुकरण करू नये त्याने परिस्थिती अजून चिघळेल असा सल्ला शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांनी दिला आहे. रोज नवीन नवीन नावांनी यात्रा काढल्या जात आहेत का ? असा सवालही केसरकरांनी विचारला आहे. आम्ही बाळासाहेबांचे खरे शिवसैनिक आहोत , त्यांचे संस्कार आमच्यावर आहेत म्हणून आम्ही आदित्य आणि उद्धव ठाकरे यांच्यावर काही टिपण्णी करणार नाही असा इशाराही केसरकरांनी आदित्य यांना दिला आहे.
बंडखोरांमध्ये शिवसेनेचे रक्त आहे का ? असा सवाल आदित्य ठाकरे विचारत आहेत, तो आमच्या सारख्या सच्च्या, शिवसैनेसाठी आयुष्य वाहणाऱ्या शिवसैनिकांचा अपमान आहे, तेव्हा मी आदित्य यांना अशी विधाने करू नका अशी विनंती करतो असे केसरकरांनी सांगितले. आम्ही दोन तृतीयांश आहोत तरी आम्ही शिवसेना सोडली नाही कारण आम्ही सच्चे शिवसैनिक आहोत, आम्हीच खरी शिवसेना आहोत असा दावाही केसरकरांनी केला आहे.
शिंदे गटाचे लोकसभेतील गटनेते राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरेंच्या बाबतीत जे काही खुलासे केले आहेत त्यानुसार राज्यात शिवसेना, भाजप युतीचे सरकार आले आहे मग आता का आमच्यावर आरोप केले जात आहेत? असे आरोप केसरकरांनी केले आहेत. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद सोडावे असा आमचा हेतू कधीच नव्हता, आम्ही त्यांना फक्त काँग्रेस - राष्ट्रवादीची साथ सोडा एवढेच सांगत होतो पण आज हा भाजपचा मोठेपणा आहे की त्यांच्यामुळेच पाच वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री असणार आहे हे उद्धव ठाकरे का लक्षात घेत नाहीत? असे सवालही केसरकरांनी केले आहेत.