मुंबई : मुंबईत पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली असून नागरिकांची तारांबळ उडाली आहे. दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने काही तास विश्रांती घेतली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला असून लोकल सेवेवरही त्याचा परिणाम झाला आहे.
बुधवार, २८ मे रोजी सकाळपासूनच सगळीकडे ढगाळ वातावरण होते. त्यानंतर दुपारी मुंबई आणि उपनगरातील अनेक भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली. मुंबई उपनगरातील गोरेगाव, अंधेरी, कांदिवली, बोरिवली, मालाड, दहिसर परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली. यासोबतच पूर्व उपनगरातील ठाणे, मुलूंड, घाटकोपर, विक्रोळी, कांजूरमार्ग, भांडूपसह अनेक भागांत मुसळधार पाऊस बरसत आहे. तसेच दादर परिसरातही पावसाने हजेरी लावली असून वाहतूक सेवा विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले.
मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवेमध्ये पाणी भरल्याने तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. अंबरनाथमध्ये रस्त्यांवर पाणी साचल्याने नागरिकांना मोठी समस्या निर्माण झाली आहे. दुपारनंतर मुंबईच्या अनेक भागांत जोरदार पावसाला सुरुवात झाली असून नागरिकांची तारांबळ उडाली आहे.
मध्य रेल्वेची वाहतूक उशीरा!
मुंबईतील लोकल सेवेलादेखील मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक २० मिनिटे उशीरा सुरु असून पश्चिम रेल्वे ५ ते १० मिनिटे उशीराने धावत आहे. तसेच हवामान विभागाकडून पुढील २ ते ३ दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.