मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Clash between Gupta & Shaikh Family) दहिसर पश्चिम परिसरातील गणपती पाटील झोपडपट्टी येथे दोन कुटुंबांमध्ये झालेल्या हाणामारीत तीन जणांचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाल्याचे निदर्शनास आले आहे. रविवार, दि. १८ मे रोजी दुपारी ४:३० वाजता राम नवल गुप्ता आणि हमीद शेख यांच्यात झालेल्या भांडणानंतर त्यांच्या मुलांमध्ये जोरदार भांडण झाले. यावेळी झालेल्या चाकू आणि इतर धारदार शस्त्रांच्या हल्ल्यात राम नवल गुप्ता, त्यांचा मुलगा अरविंद गुप्ता आणि हमीद शेख यांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, गुप्ता आणि शेख हे दोन्ही कुटुंबं गणपती नगर येथील झोपडपट्टीत राहतात आणि २०२२ पासून त्यांच्यात वैर होते. तसेच दोन्ही कुटुंबांनी एकमेकांविरोधात यापूर्वी गुन्हेही दाखल केले होते. रविवारी हमीद शेख दारूच्या नशेत लेन क्रमांक १४ मधील राम नवल गुप्ता यांच्या दुकानात पोहोचला. दारूच्या नशेत होता म्हणून तो जुन्या गोष्टींबद्दल बोलू लागला आणि दोघांमध्ये वाद सुरू झाला. वाद सुरू असताना दोघांनीही आपापल्या मुलांना बोलावले. वाद पुढे इतक्या टोकाला पोहोचला की, चाकू आणि इतर शस्त्रांनी प्राणघातक हल्ला करण्यात आला. ज्यामध्ये राम नवल गुप्ता, अरविंद गुप्ता आणि हमीद शेख यांना आपला जीव गमवावा लागला.