रोज्झोहो आणि आसपासच्या चेसेझू, चेथेबा, चेखाबा, किसामा, किग्वेमा इ. गावात फिरून, लोकांशी बोलून मी, जी माहिती गोळा केली आहे, ती स्वैर शब्दांत या लेखाद्वारे मांडली आहे. या सगळ्या कथेचा कसलाही ऐतिहासिक पुरावा आजतागायत मला किंवा स्थानिक अभ्यासकांना मिळालेला नाही. गावात आलेली ती व्यक्ती खरच नेताजी होती की अजून कोणी होती? अशी काही घटना खरंच घडली होती का? नेताजी खरच तिथे असतील, तर त्यांनी या जागा नऊ दिवस वस्तीसाठी का निवडल्या? अशा अनेक प्रश्नांची समाधानकारक उत्तरे खरेतर मला मिळाली नाहीत. परंतु, तरीही या लोकांचे मत, नेताजींसोबत त्यांनी विणलेले भावनिक नाते जगासमोर मांडायचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. या निमित्ताने ‘आझाद हिंद फौज’ आणि ईशान्य भारत याकडे अभ्यासकांचे मन वळवावे हाही एक महत्त्वाचा उद्देश आहे.
साल १९४४ एप्रिलचा महिना सुरू झाला होता. संध्याकाळची वेळ होती. रोज्झोहो गावातली मंडळी दिवसभरातली शेतीभातीची कामं आटोपून गावात पोहोचत होती. गेले काही दिवस आसपासच्या डोंगरांतून, जंगलात काही लोक वस्ती करू लागले आहेत, हे गावकर्यांना जाणवू लागलं होतं. ते जपानी सैन्यातील शिपाई होते. बंकर बनवून, छावण्या टाकून ते या भागात राहू लागले होते. त्यांची चेहरेपट्टी, शारीरिक ठेवण, आहार अशा बर्याचशा गोष्टी रोज्झोहोतील ग्रामस्थांशी मिळत्याजुळत्या अशाच होत्या. या नव्या शेजार्यांविषयी एक भीतीयुक्त कुतूहल लोकांच्या मनात निर्माण झाले होते. गावातल्या दोन महिला कोहिमा शहरात काही काळ राहिल्यामुळे तोडकंमोडकं नागामीज बोलू, समजू शकत होत्या. त्यांच्याद्वारे ब्रिटिशांचे राज्य जिंकायला हे सैनिक आले आहेत आणि ते कोहिमाकडे कूच करत आहेत इतपत माहिती गावात तोवर पसरली होती. त्या दिवशी काही परकीय लोक गावाच्या हद्दीत शिरले. त्यांनी चार घोडे भरून सामान सोबत आणले होते. या गटाचे नेतृत्व एक तेजस्वी आणि रूपवान पुरूष करीत होता. ‘जपानी राजा’ म्हणून ओळखली जाणारी ही व्यक्ती नेहमी खाकी सैनिकी गणवेशात वावरत असे. त्यांच्या कमरेला नेहमी दोन हातबॅाम्ब आणि एक तलवार लटकवलेली असे. गोल काचांचा चश्मा सतत त्यांच्या डोळ्यांवर असे. ग्रामसभेत बोलताना त्यांच्या कपाळावरून घर्मबिंदू ओघळत असत. मोठमोठ्या बंदुका घेतलेले दोन आडदांड हिंदुस्थानी सैनिक त्यांचे अंगरक्षक म्हणून कायम त्यांच्यासोबत असत.
त्यांनी गावप्रमुखाशी बोलणे करून तडकाफडकी एक ग्रामसभा बोलावली. तिथे मोडकीतोडकी नागा भाषा येणार्या दुभाषामार्फत आणि हातवारे करीत त्यांनी स्वतःची ओळख मी ‘नेताजी सुभाषचंद्र बोस’ अशी करून दिली. आपण ब्रिटिशांना देशाबाहेर हाकलून लावून स्वराज्य निर्माण करायला आलो आहोत, अशी घोषणा त्यांनी केली. तसेच, आमच्या सैन्याला लागणारा किराणा गावाने पुरवावा, असे आवाहनही त्यांनी केले. “आज तुम्ही करीत असलेल्या मदतीच्या बदल्यात देश स्वतंत्र झाला की, आम्ही तुमच्या गावाला सर्व प्रकारच्या सोईसुविधा पुरवू, हे गाव मी दत्तक घेईन,” असे वचन त्या प्रमुखाने ग्रामस्थांना दिले. ‘नेताजी’ म्हणून वावरणारी ही व्यक्ती इतकी सुस्वरूप आणि तेजःपुंज होती की, गावातील स्त्रिया त्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी उत्सुक असत. गालात हसत १०३ वर्षीय रेव्ह. पोस्वुयी स्वुरो मला सांगत होते. त्यानुसार ग्रामस्थांनी तांदूळ, कोंबड्या, डुकरे, गावठी तंबाखू, जंगली फळे, असे सामान जमवून या सैन्याला पुरवायला सुरुवात केली. नेताजींची व्यवस्था गावाच्या पुजार्याच्या घरात केली गेली. आजूबाजूच्या टेकड्यांवर जपानी सैन्याने आसरा शोधला होता. गावाच्या एकूण लोकसंख्येच्या तिप्पट तरी ही सैनिकसंख्या होती. त्यामुळे गावकर्यांनी पिकवलेले धान्य पुरणार नाही, हे लक्षात घेऊन आसपासच्या गावातून मदत मागण्याची जबाबदारी पी. स्वुरो यांच्यावर सोपवण्यात आली. त्यांचे वडील बंधू ब्रिटिश सैन्यातले शिपाई असल्याचे कळल्यावर त्यांच्यावर विश्वास ठेवून नेताजींनी त्यांच्यावर दुभाषाचे काम करायची जबाबदारी सोपवली.
_202203052118113873_H@@IGHT_391_W@@IDTH_696.jpg)
एका बाजूला युद्धाला तोंड फुटलेच होते. विमाने आकाशात घिरट्या घालत असत. सुरुवातीला तर ही विमाने म्हणजे प्रचंड मोठे पक्षी आहेत, असा लोकांचा समज होत असे. ब्रिटिश आणि जपानी सैन्याच्या छोट्याछोट्या तुकड्यांत झटापटीही घडत. जपानी सैनिक चतुराईने डोंगरात एका जागी चूल पेटवल्यासारखे करत आणि स्वतः सुरक्षित जागी लपून बसत. पलीकडच्या डोंगरावर लपलेले ब्रिटिश सैन्य तिथे गोळीबार करत असे. त्यामुळे जपान्यांना त्यांच्या लपायच्या जागा लक्षात येत. ते बरोबर तिथे गोळीबार करून ब्रिटिशांना धाराशाही पाडत. अशा विविध युक्त्यांमुळे सुरुवातीला जपानी सैन्याची सरशी होते आहे,असे चित्र दिसत होते. पण, काहीच दिवसांत त्यांना रेशन पुरेना. ज्यांच्या मुलाखती मी घेतल्या, ते म्हातारे लोकं सांगतात की, जपान्यांकडे पुरेसे रेशनपाणी असते, तर त्यांनी कोहिमाचे युद्ध नक्की जिंकले असते आणि भारतच नव्हे, तर जगाचा इतिहास बदलला असता. रोज्झोहो आणि आसपासच्या चेसेझू, चेथेबा, चेखाबा, किसामा, किग्वेमा इ. गावात फिरून, लोकांशी बोलून मी, जी माहिती गोळा केली आहे, ती स्वैर शब्दांत या लेखाद्वारे मांडली आहे. या सगळ्या कथेचा कसलाही ऐतिहासिक पुरावा आजतागायत मला किंवा स्थानिक अभ्यासकांना मिळालेला नाही. गावात आलेली ती व्यक्ती खरच नेताजी होती की अजून कोणी होती? अशी काही घटना खरंच घडली होती का? नेताजी खरच तिथे असतील, तर त्यांनी या जागा नऊ दिवस वस्तीसाठी का निवडल्या? अशा अनेक प्रश्नांची समाधानकारक उत्तरे खरेतर मला मिळाली नाहीत. परंतु, तरीही या लोकांचे मत, नेताजींसोबत त्यांनी विणलेले भावनिक नाते जगासमोर मांडायचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. या निमित्ताने ‘आझाद हिंद फौज’ आणि ईशान्य भारत याकडे अभ्यासकांचे मन वळवावे हाही एक महत्त्वाचा उद्देश आहे. नेताजी तेव्हा जिंकले असते, तर त्यांनी दिलेले वचन नक्की पूर्ण केले असते. पण, भारत स्वतंत्र झाल्यावरही हा इतिहास समजून घ्यायला कोणी उत्सुक नाही, अशी खंत गावकरी बोलून दाखवतात. नेताजींचे मोठे स्मारक या ठिकाणी व्हावे, अशी त्यांची मनोमन इच्छा आहे. नेताजींनी दिलेले शाळा, हॅास्पिटल, रस्ते, मशिनरी, रोजगार इ. देण्याचे वचन देशाने पूर्ण करावे, अशी मागणी ते करतात. आज नेताजींच्या नावाने एक छोटेसे तळे व इथला एक डोंगरमाथा ओळखला जातो. आजवर या गावाना नेताजींची कन्या अनिता, मुख्यमंत्री रिओ, राज्यपाल, पद्मनाभ आचार्य इ. मंडळींनी भेट दिली आहे.

आपल्याला माहीतच आहे की, ईशान्य भारत वेगवेगळ्या जनजातींमधे विभागला गेला आहे. अनेक छोटेमोठे सामाजिक, राजकीय, धार्मिक, भाषिक, जनजातीय समूह आपापल्या उद्दिष्टपूर्तीसाठी विविध मतप्रवाह विविध समाजधारांमध्ये प्रवाहित करीत राहातात. इथली गावं, शहरांचा इतिहास अनेकदा मौखिक लोककथांद्वारे समाजात प्रस्थापित केला जातो. प्रत्येकवेळी त्याला कागदोपत्री आधार असेलच असे नाही. आज तरी या सगळ्या कथेला काही ठोस पुरावे मिळालेले नाहीत. पण, यापुढे मिळणार नाहीत असेही नाही. तसेच, या लोककथा ‘आझाद हिंद फौज’ आणि नेताजींच्या चरित्र अभ्यासकांसाठी महत्त्वाचे मौखिक दस्तावेज आहेत आणि भारत एक संघटित, एकविचाराचे, एकदिलाने चालणारे राष्ट्र म्हणूनही नागा गावकर्यांच्या या दाव्यांचे महत्त्व आहे. कारण, भारताच्या स्वातंत्र्ययुद्धातील नेताजींचे स्थान एकमेकाद्वितीय असेच आहे. आजवर भारतापासून तुटून स्वतंत्र देशाची मागणी करणार्या समाजातील एक वर्ग स्वातंत्र्ययुद्धात आपल्या लोकांचा सहभाग अधोरेखित करू इच्छितो, नेताजींच्या ऐतिहासिक, लोकोत्तर जीवनाशी स्वतःला जोडून घेऊ पाहातो, त्याचा अभिमान बाळगतो, याहून चांगली गोष्ट सामाजिक समरसता, एकतेचा वसा घेतलेल्या तुमच्या आमच्यासारख्या सामान्य भारतीयांसाठी कोणती असणार!