माणसाच्या निरोगी मनाचा विचार करत असताना विचारांच्या स्पष्टतेबरोबरच अजून एक गुण प्रामुख्याने दिसून येतो तो म्हणजे तर्कशुद्धता. (रॅशनॅलिटी) तर्कशुद्धता म्हणजे काय? तर माणसाचे विचार व कृती ज्यावेळी समजूतदारपणाची व परिस्थितीनुसार तर्काला धरुन असते. लॉजिकल थिंकिंग. त्यावेळी त्याला तर्कशुद्धता असे म्हणतात. कुठल्या परिस्थितीत काय निर्णय घ्यायचा आहे, याचे आकलन व ज्ञान होणे आणि तो निर्णय जेव्हा रचनात्मक व सकारात्मक व बहुजनहिताचा असतो. त्यावेळी आपण त्याला ‘तर्कशुद्ध विचार’ असे म्हणतो. (Constructiveness) म्हणजेच चांगले रचनात्मक विचार व त्याला धरून आचरण हा निरोगी मनाचा गुण मानला जातो.
जेव्हा तर्कशुद्धता हा गुण माणसात असतो, त्यावेळी त्याच्यामध्ये आपोआपच ‘डिस्क्रिमिनेटिव्ह इंटेलिजन्स’ म्हणजेच विवेकबुद्धी जागृत होते. विवेकबुद्धी जागृत झाल्यामुळे योग्य निर्णय घेण्याची क्षमता माणसामध्ये येते. योग्य निर्णय म्हणजे जनप्रिय निर्णय नव्हे, तर जो दूरदृष्टीने सर्वांच्या व स्वत:च्या हितावह असेल, असा निर्णय माणूस घेऊ शकतो, हेसुद्धा निरोगी मनाचे लक्षण मानले जाते.या विवेकबुद्धीचा उपयोग निरोगी राहण्यासाठी कसा करायचा असतो, ते आपण आता पाहूया. प्रत्येक माणसाला आपल्या आयुष्यात यशस्वी व्हायचे असते व यशाची शिखरे आपापल्या क्षेत्रात पादाक्रांत करायची असतात. यशस्वी होण्यासाठी कोणत्याही कामावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे असते. याशिवाय शिस्तबद्धतेने काम करायचे असते, जेव्हा एखाद्या माणसाला यशाचे शिखर गाठता येते, ज्याला हे माहीत असते की, या यशोशिखरावर तो कायमचा राहू शकत नाही आणि हा विचार जर विवेकबुद्धी शाबूत असेल, तरच माणूस करु शकतो. जेव्हा माणूस यशाच्या शिखरावर असतो, त्याचवेळी माणसाची सदसद्विवेकबुद्धी जर जागृत असेल, तर त्याला हे कळून चुकले की, आपण कायम या जागी राहणार नाही, तर कधीना कधी या जागेवरून आपल्याला पायउतार व्हावेच लागते व दुसरा कोणीतरी त्या शिखरावर पोहोचतो. त्यामुळे यशोशिखरावर असतानाही हे निरोगी मनाचे श्लोक जमिनीवर पाय ठेवून असतात आणि यशाने हुरळून न गेल्यामुळे अहंकार होत नाही आणि अहंकार हा आजारी मनाचे लक्षण मानले जाते, ज्याला आपण ’Ailments from egotism'’ किंवा ’Effects of Egotism and self esteem’ असे म्हणतो, ज्यामुळे माणसाची अधोगती सुरू होते व मानसिक पातळीवर आजाराला सुरुवात होते.
विवेकबुद्धीचा वापर केला, तर यशाच्या शिखरावरून पायउतार होऊनही माणूस आयुष्यभर यशस्वी म्हणून गणला जातो. भारतातील उदाहरणेच घ्यायची झाली, तर स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर, माजी राष्ट्रपती एपीजी अब्दुल कलाम, अटल बिहारी वाजपेयी यांसारखे मान्यवर सदैव यशोशिखरावरच राहिले. कारण, त्यांनी आपली विवेकबुद्धी जागृत ठेवली. म्हणजेच काय, तर निरोगी मनाने विचार केला असता, नेहमी आनंदच मिळतो. कारण, सकारात्मकता हा निसर्गाचाच नियम आहे. तो नियम पाळणारे लोक नेहमी निरोगी व आनंदी राहतात आणि मानसिक व पर्यायाने शारीरिक व्याधीपासून मुक्त जीवन जगतात.
डॉ. मंदार पाटकर
(लेखक एमडी होमियोपॅथी आहेत.)