व्यवसायाचे बीज अंकुरे-अंकुरे...

    24-Sep-2021
Total Views |


agri tech_1  H


स्मार्टफोन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आता कृषी तंत्रज्ञान हे घरापासून शेती-शिवारांपर्यंत पोहोचले आहे. विविध अभ्यासपूर्ण उपक्रम-प्रयोगांद्वारे कृषी क्षेत्रातील उत्पादन व्यावसायिक स्वरूपात संकलित-वितरित करण्यासाठी कशाप्रकारे प्रयत्न केले जाऊ शकतात, याची यशस्वी उदाहरणे विविध ठिकाणी अनुभवता येतात.
कृषी आणि कृषी व्यवसायाशी संबंधित विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उपयोग कृषी उत्पादन क्षेत्रात आता मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. माहिती- तंत्रज्ञानांतर्गत स्मार्टफोनसह विविध संवाद साधनांचाही उपयोग ग्रामीण भागात वाढलेला दिसतो. परिणामी, कृषी उत्पादन तंत्रज्ञान क्षेत्रात ‘अ‍ॅग्रो-टेक’ स्टार्टअप व्यावसायिक संदभार्र्त अधिक सक्रिय झाले असून, त्याचे सकारात्मक परिणाम आता विविध संदर्भात दिसू लागले आहेत.यासंदर्भातील विशेष उल्लेखनीय व प्रमुख बाब म्हणजे, स्मार्टफोन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आता कृषी तंत्रज्ञान हे घरापासून शेती-शिवारांपर्यंत पोहोचले आहे. विविध अभ्यासपूर्ण उपक्रम-प्रयोगांद्वारे कृषी क्षेत्रातील उत्पादन व्यावसायिक स्वरूपात संकलित-वितरित करण्यासाठी कशाप्रकारे प्रयत्न केले जाऊ शकतात, याची यशस्वी उदाहरणे विविध ठिकाणी अनुभवता येतात.या व्यवसायपूरक परिस्थितीतून सुरू होऊन विकसित झालेल्या स्टार्टअपच्या प्राथमिक अनुभवांनुसार त्यांच्या प्रयत्नांमुळे आपल्या कृषी क्षेत्राला प्रगत फायदेशीर व्यवसायाची जोड मिळून त्यातून विशेषतः ग्रामीण भागात आर्थिक क्रांती होणार आहे. ढोबळ अंदाजानुसार देशांतर्गत ‘अ‍ॅग्रो’ स्टार्टअपतर्फे सद्यःस्थितीत सुमारे १५ हजार कोटी शेतकर्‍यांच्या १४ हजार कोटी हेक्टर्स शेतीचा व्यावसायिकदृष्ट्या अंतर्भाव करण्यात आला आहे. यातून लक्षणीय स्वरूपात शेतकरी आपल्या शेतीला अधिक उत्पादक आणि आर्थिकदृष्ट्या उपयुक्त बनवत आहेत.

‘अ‍ॅग्रो’ स्टार्टअप उपक्रमांमध्ये प्रामुख्याने शेती आणि शेतकरी यांच्याशी संबंधित अशा विविध ठिकाणची व विविध प्रकारची शेती, बी-बियाणे, धान्याची सकसता, शेतीला अधिक उत्पादक करण्यासाठी उपयुक्त असे तंत्रज्ञान कृषीविषयक प्रगत ज्ञान व संशोधन शेतकर्‍यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विद्यापीठांशी समन्वय, कृषी व संबंधित विषयातील संशोधन आणि संशोधकांशी समन्वय इ. प्रकारची कामे करीत आहेत. या उपक्रमांचा शेतकर्‍यांना आता फायदाही होऊ लागला आहे.यासंदर्भात ‘नॅसकॉम’च्या २०१९ मधील प्रकाशित अहवालानुसार त्यावेळी देशामध्ये सुमारे ४०० कृषी स्टार्टअप सक्रियपणे कार्यरत होते. ही संस्था आता नक्कीच वाढली असेल. या नव्या व वाढत्या कृषी स्टार्टअपचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे, त्यांचा भर नवनव्या व संशोधनपर आणि अभ्यासपूर्ण कारवाई अंमलबजावणीवर आहे. यामध्ये विशेष बाब म्हणून शेतजमिनीचा अभ्यास, मृदसंधारण, वातावरणाचा अभ्यास, वातावरणाचा अंदाज, पर्जन्यमान, कृषी उत्पादित मालाची खरेदी, विक्री, कृषी बाजारातील ठळक घडामोडी, आर्थिक व्यवहार, शेतबाजाराचे अंदाज, शेतमजुरांची कमतरता-उपलब्धता, कृषी मालवाहतूक, शासकीय व कृषी-सहकारी संस्थांची धोरणे इ.चे प्राबल्य दिसून येते. यावरून बदलते शेतकरी-शेती, त्यांच्या बदलत्या गरजा आणि कार्यपद्धती याचा अंदाज सहजपणे घेता येतो.तसे पाहता ‘अ‍ॅग्री स्टार्टअप’ची सुरुवात ही मुळात शेतकर्‍यांच्या आर्थिक गरजा आणि अर्थसाहाय्य यांची पूर्तता करण्याच्या दृष्टीने झाली. ‘अ‍ॅम्नीव्होर’द्वारे या कृषी अर्थसाहाय्य क्षेत्रात प्रामुख्याने काम करणार्‍या ‘अ‍ॅग्रो’ स्टार्टअपचे व्यवस्थापकीय संचालक मार्क कहान यांच्या मते, जेव्हा त्यांनी त्यांच्या स्टार्टअपची सुरुवात केली, तेव्हा त्यांना मर्यादित प्रतिसाद मिळाला. त्यांच्यासोबत काम करणार्‍या विषयतज्ज्ञांची संख्याही अर्थातच मर्यादित होती. मात्र, आता परिस्थितीत बराच बदल झाला आहे. शेतकर्‍यांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता, या स्टार्टअपचा आवाका आणि कार्यक्षेत्र वाढत आहे.

आर्थिक संदर्भात तपशिलासह सांगायचे झाल्यास ‘अ‍ॅग्रो’ स्टार्टअप कंपन्यांनी गेल्या आर्थिक वर्षात १३३ आर्थिक व्यवहारांमधून एक कोटी डॉलर्सचे भांडवल जमविले. आधीच्या आर्थिक वर्षांच्या तुलनेत डॉलर्समधील गेल्या वर्षीच्या गुंतवणुकीचे हे प्रमाण सुमारे सहा टक्के अधिक होते. यासंदर्भात ‘फेडरेशन ऑफ कॉमर्स’ व ‘इंडस्ट्रीज आणि प्राईस वॉटर कूपर’ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात असे प्रामुख्याने नमूद करण्यात आले की, ‘अ‍ॅग्रो’ स्टार्टअपमधील नवी गुंतवणूक ही कृषी आणि कृषी उद्योग या उभय क्षेत्रांसाठी उत्साहवर्धक ठरणारी आहे.या सर्वेक्षणात असेही नमूद करण्यात आले की, सद्यःस्थितीत शेती आणि शेतकरी या उभयतांमध्ये व्यावसायिक संदर्भात लक्षणीय बदल झाले आहेत. यातूनच शेतकर्‍यांची मनःस्थिती वा मानसिकतेमध्येही बदल झाले आहेत. शेतकर्‍यांनी दरडोई घटत्या शेतजमिनीच्या आकारावर एक वास्तव व व्यवहारिक उपाय म्हणून प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब यापूर्वीच सुरू केला असून, त्याचे फायदेही त्यांना मिळू लागले आहेत. याशिवाय आपल्या कृषी उत्पादनाला योग्य वेळी व अधिक चांगला भाव मिळावा, यासाठी शीतगृहांचा वापर करून शेती अधिक फायदेशीर करण्यावर त्यांचा आता भर आहे.

‘अ‍ॅग्री’ स्टार्टअप क्षेत्रात आर्थिक गुंतवणुकीला विशेष चालना देण्यसाठी सक्रिय असणार्‍या ‘इकोझोन’ कंपनीचे संस्थापक देवेंद्र गुप्ता यांनी नमूद केल्यानुसार, सध्या कृषी उद्योग व त्यातही ‘अ‍ॅग्रोटेक’ स्टार्टअपद्वारा शीतगृह, सौर पाणी पंप व संगणकीय म्हणजेच ‘ऑनलाईन’ पद्धतीने काम करण्यावर विशेष भर देण्यात येतो व त्याचा फायदा शेतकर्‍यांसह सर्व संबंधितांना होत आहे. मुख्य म्हणजे, या सर्व प्रगत उपक्रमांना सरकारी योजनांद्वारे आर्थिक पाठबळही मिळत आहे.असे असेल तरी प्रगत काम करून ‘अ‍ॅग्रो’ स्टार्टअप क्षेत्रात काम करणार्‍यांपुढे काही आव्हानेही निश्चितपणे आहेत. यापैकी सर्वात प्रमुख आव्हान म्हणजे अत्यंत प्रगत तंत्रज्ञान व अद्ययावतपणाला शेत-शिवारात उपयुक्त ठरेल, अशा पद्धतीने त्याचा अवलंब करणे. कृषी क्षेत्रात त्याला व्यावहारिक स्वरूप देणे आव्हानपर असले तरी त्याचा अवलंब होऊ लागला, हे उत्साहवर्धक आहे.दुसरा मुद्दा कृषीला अधिक प्रगत आणि उपयुक्त बनविण्यासाठी प्रगत आणि प्रगतिशील शेतकर्‍यांची संख्या, त्यांचे प्रमाण अद्याप मर्यादित आहे. त्याला चालना देणे नितांत आवश्यक आहे. एक अंदाजानुसार आजवर देशातील सुमारे ३० टक्के शेतकरीच कृषी स्टार्टअपशी संबंधित आहेत. ही टक्केवारी प्रयत्नपूर्वक वाढविणे गरजेचे आहे.आपल्या शेतकर्‍यांच्या मुख्य गरजा व मानसिकता लक्षात घेता, त्यांना त्यांच्या गरजा व आवश्यकता यांची पूर्तता करण्यासाठी एकाच ठिकाणी समस्या-सोडवणूक व्हावी, अशी रास्त अपेक्षा असते. शेतकर्‍यांच्या या मुख्य अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ग्रामीण पार्श्वभूमीवरील व मानवीय संदर्भासह प्रयत्न करणे सुरू झाले आहे. वानगीदाखल सांगायचे झाल्यास, ‘देहात’ सारखे ‘अ‍ॅग्रो’ स्टॉर्टअप शेतकर्‍यांना त्यांच्या ठिकाणी शेती-शिवारात त्यांच्या गरजांच्या पूर्ततेसाठी विशेष प्रयत्नशील असून, त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.

तसे पाहता, भारतात कृषी तंत्रज्ञान व त्याचा अवलंब या बाबी तशा अद्याप प्राथमिक वा प्रयोगावस्थेत आहेत. ‘अर्न्स्ह अ‍ॅण्ड यंग’ या आर्थिक व्यवस्थापन क्षेत्रातील आघाडीच्या सल्लगार कंपनीतर्फे करण्यात आलेल्या अभ्यासानुसार, देशाच्या एकूण कृषीविषयक वार्षिक उलाढालींपैकी केवळ एक टक्के उलाढाल ही सध्या कृषी तंत्रज्ञान वा ‘अ‍ॅग्रो’ स्टार्टअप व्यवस्थेमध्ये सामील झाली आहे. यामध्ये वाढ होण्यास मोठा वाव आहे व त्यादृष्टीने प्रयत्नही सुरू आहेत.यासंदर्भात विशेष उल्लेखनीय योगदान म्हणून बंगळुरू येथील ‘कृषी क्लप’ या स्वयंसेवी संस्थेच्या प्रयत्नांचा उल्लेख करावा लागेल. संस्थेतर्फे कृषी क्षेत्रांतर्गत शेती आणि शेतकरी या उभयतांना ऊर्जितावस्थाच नव्हे, तर प्रगतिशील बनविण्यासाठी शेतकरी, सरकारी अधिकारी व कृषी तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणार्‍यांमध्ये सहकार्यासह समन्वय साधण्यासाठी ‘अ‍ॅग्रो’ स्टार्टअप पद्धतीने गेल्या वर्षापासून प्रयत्न सुरू आहेत. पहिल्याच वर्षी ‘कृषी कल्प’ला अपेक्षेहून अधिक प्रतिसाद लाभला असून त्यामुळे कृषी क्षेत्रातील स्टार्टअपचे महत्त्व आणि महात्म्य निश्चितच अधोरेखित झाले आहे.

- दत्तात्रय आंबुलकर
(लेखक एचआर व्यवस्थापक व सल्लागार आहेत.)






अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121