जलपर्णीमुक्त उल्हास नदी

    19-Jul-2021
Total Views | 202
ullhas river _1 &nbs


 
उल्हास नदीच्या प्रवाहात साचलेल्या जलपर्णीच्या प्रश्नाने गंभीर स्वरुप धारण केले होते. ही नदी जलपर्णीमुक्त करण्यासाठी अनेक आंदोलने करण्यात आली. त्यानंतर ठाणे जिल्हाधिकार्‍यांनी ‘एसजेटी’ तंत्राचा वापर करून ‘सगुणा रुरल फाऊंडेशन’ टीमच्या मदतीने अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवला. त्याद्वारे उल्हास नदी जलपर्णीमुक्त करण्यात आली. देशात प्रथमच अशा प्रकारचे काम झाले असून लेखातून या कामाविषयीचा घेतला हा आढावा...
 
 
 
चंद्रशेखर भडसावळे - उल्हास नदीच्या ३० किलोमीटर नदी पात्रामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये जलपर्णी वाढली होती. यामधील ९५ टक्के जलपर्णी नष्ट करून ती आता सर्व वाहूनसुद्धा गेली आहे. हे सर्व काम फक्त ४५ दिवसांमध्ये करण्याची कमाल ’सगुणा रूरल फाऊंडेशन’च्या टीमने करुन दाखवली आहे. ही जलपर्णी नुसती नष्ट झाली आणि वाहून गेली एवढे नसून ती आता परत येणार नाही याची खात्रीसुद्धा ’सगुणा रूरल फाऊंडेशन’कडून दिली आहे. हे आता एक अत्यंत ‘क्लासिक’ असे उदाहरण संपूर्ण देशासमोर पहिल्यांदाच घडलेले आहे. वाहत्या नदीमधील एवढ्या मोठ्या प्रमाणावर ही जलपर्णी नष्ट करण्याचे महाकाय काम पहिल्यांदाच उभे राहिले आहे. या प्रकल्पामध्ये ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा अत्यंत महत्त्वाचा सहभाग आहे. तसेच ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनीसुद्धा अत्यंत जिद्दीने या कामाच्या पाठीशी उभे राहून ’सगुणा रूरल फाऊंडेशन’च्या टीमला सतत धीर देऊन हे काम यशस्वी होण्यास प्रोत्साहन दिले आहे. ’उल्हास नदी बचाव कृती समिती’ आणि ठाणे जिल्ह्यातील पत्रकारिता यांचासुद्धा या यशामध्ये मोठा वाटा आहे. समाजामधील हे सर्व घटक जेव्हा एखाद्या ध्येयाच्या पाठीमागे एकत्रितपणे उभे राहतात त्यावेळी अशा प्रकारचे पराकोटीचे उत्तम काम हे बघण्यासारखे होते.
 
 
उल्हास नदीमधील जलपर्णीचा महाकाय प्रश्न २०१० पासून दिसू लागला. हे ‘गुगल’च्या फोटो वरून सिद्ध होते. २०१८ साली या प्रश्नाचे स्वरूप अत्यंत विक्राळ झाले. नदीच्या ३० किलोमीटर लांबीवरील आणि १३० मीटर रुंदीच्या क्षेत्रावरील पाणी दिसेनासे झाले होते. जलपर्णीचा थर इतका घट्ट होता की, त्यावरून कुत्रे पळून जाताना दिसत होते. कधीकधी हे कुत्रे मध्येच अडकून मरणसुद्धा पावलेले लक्षात आले. आपल्या देशामध्ये किंवा इतर देशांमध्येसुद्धा इतरत्र अशी वाढलेली जलपर्णी यंत्रांच्या साहाय्याने काढली जाते. परंतु, अशाप्रकारे ‘मेकॅनिकल’ पद्धतीने ही जलपर्णी काढल्यास त्या प्रत्येक जलपर्णीच्या झुडुपावर असलेली ९ ते १२ छोटी रोपे पाण्यामध्ये गळून पडतात. तेथे त्यांचे परत नवीन लागवड झाल्यासारखे होते आणि पुन्हा त्या जलपर्णीच्या वसाहती दिसू लागतात. त्यामुळे अशाप्रकारे मेकॅनिकल पद्धतीने जलपर्णी पाण्याबाहेर काढण्याची पद्धत ही सगळ्या ठिकाणी अगदीच कुचकामी ठरली आहे. अशाप्रकारे जलपर्णी काढल्यानंतर दोन ते तीन आठवड्यात पुन्हा त्याची मोठी वसाहत तयार होते आणि ती वसाहत जोमाने पुन्हा वाढते. ही पद्धत अत्यंत महागडीसुद्धा आहे.

 
जलपर्णी प्रश्नाची तीव्रता
 
१) जलपर्णी या अत्यंत त्रासदायक आणि घुसखोरी करणार्‍या प्रभावी वनस्पतीचा वाईट प्रभाव आता सगळीकडे दिसू लागला आहे. अत्यंत जलद गतीने वाढणारी वनस्पती आणि त्याच्यापासून निर्माण होणार्‍या ‘स्टोलन’ म्हणजेच कोवळ्या फांद्यांपासून नवीन रोपे निर्माण होतात. मग ही रोपे मोठी होऊन पुन्हा त्यांची नवीन प्रजोत्पत्ती करतात. मोठ्या झुडुपांमध्ये त्यांची लहान रोपे सहजपणे दिसून येत नाहीत. परंतु, या वनस्पतीला जरा धक्का दिला तरी ही रोपे पाण्यामध्ये सोडून नवीन वसाहत निर्माण करण्यासाठी मदत करतात.
२) या वनस्पतीला इंग्रजीमध्ये किलर वीड असेही संबोधले आहे. कारण जलपर्णी जिथे वाढते, तिथे तिच्या गालीच्याखालील पाणीसाठा ती मारून टाकते. त्याची चादर एवढी घट्ट असते की, त्याच्याखाली सूर्यप्रकाश पोहोचू शकत नाही किंवा हवेतील प्राणवायू पाण्यामध्ये विरघळण्याची नैसर्गिक प्रक्रिया बंद पडते. यामुळे पाण्यातील प्राणवायू संपून तेथे ऑक्सिजन विरहित परिस्थिती निर्माण होते. परिणामी, तेथील जलचर परागंदा होतात.
 
 
३) जलपर्णीमध्ये अडकून तेथे पोहायला गेलेल्या अनेक व्यक्ती मरण पावल्याची खूप उदाहरणे आहेत. खोपोली येथील रेस्क्युअर गुरुनाथ साटेलकर (7774812222) यांच्या म्हणण्याप्रमाणे पुणे ते कल्याण दरम्यान अशाप्रकारे दगावणार्‍या व्यक्तींची संख्या दरवर्षी ५० च्या जवळपास असू शकते.
 
 
४) गावोगावी शेतकर्‍यांना पाणीपुरवठा करणारे जलसिंचन कालवे हेसुद्धा या जलपर्णीच्या प्रभावामुळे बळी पडतात आणि त्यामुळे सिंचन विभागाकडून होणारा पाणीपुरवठा शेतकर्‍यांच्या शेतापर्यंत व्यवस्थितपणे पोहोचू शकत नाही.
 
 
जलपर्णीचे व्यवस्थापन कसे केले?
 
१) जलपर्णीचे शास्त्र व सुयोग्य उपायोजना : जलपर्णीच्या बुडामधून ‘स्टॉलन’ पद्धतीच्या फांद्या फुटतात आणि त्याला नवीन रोपे येतात. त्याची झुडुपे तयार होतात. ही झुडुपे पुन्हा नवीन रोपे तयार करतात. प्रत्येक झुडूप हजारो नवीन रोपांना जन्मदाते ठरतात. जलपर्णीचे शास्त्रीय नाव एळलहहेीपळर लीरीीळशिी असे आहे. ही वनस्पती तिच्या अत्यंत वेगाने वाढण्याच्या क्षमतेसाठी खूप कुप्रसिद्ध आहे. खूप जोरात वाढून ती पाण्यावर एक घट्ट असा गालिचा तयार करते. एक ते दोन आठवड्यात दुप्पट क्षेत्रावर पसरण्याची तिची क्षमता आहे. त्याच्या झुडुपांची संख्या २० ते २५ दिवसांत १०० टक्के वाढू शकते.
 
 
२) ’मी कल्याणकर’ संस्थेचे नितीन निकम आणि त्यांच्या सहकार्‍यांनी नदीमधील ही जलपर्णी काढून टाकावी, यासाठी १८ दिवस आंदोलन केले होते. त्यामुळे शासनाचे या प्रश्नाकडे लक्ष वेधले गेले.
 
 
३) कृषिरत्न चंद्रशेखर भडसावळे यांच्या नेतृत्वाखाली ’सगुणा रुरल फाऊंडेशन’ने एक जादुई रसायन मिश्रण तयार केले. त्यामध्ये सर्वसमावेशक सामान्य ‘हर्बीसाईड’ तसेच ‘हरबल एंझाइम’ मिश्रण, पानावर पसरणारे ‘इमल्सिफायर’ आणि त्या सर्वाचा ‘पीएच’ नियंत्रित करणारे औषध असे तयार केले. हे मिश्रण ’सगुणा फाऊंडेशन’च्या टीमने १९८८ पासून त्यांच्या शेतावर निरनिराळे प्रयोग करून नक्की केले आहे. हे औषध पानावर पडताच पानांच्या टोकामधून शोषण केले जाते आणि त्या वनस्पतीला मृत करायला सुरुवात करते. असे औषध वनस्पतींच्या पानाशिवाय इतर ठिकाणी पडल्यास ते आपोआप विघटन पावते. या औषधांविषयी ’सगुणा फाऊंडेशन’च्या टीमने जागतिक संशोधनाचा अभ्यास केला. तसेच नदीमधील एका कोपर्‍यात प्रायोगिक तत्त्वावर औषध फवारणी करून पुढील पाच दिवस तेथील शासकीय मान्यता असलेल्या उच्च दर्जाच्या प्रयोगशाळामधून या पाण्याचे नमुने तपासले. यामध्ये औषधांचे शिल्लक अंश सापडतात का? हे तपासले असता या औषधाचे थोडेही अंश सापडले नाहीत.
 
(लेखक कृषिरत्न आणि कृषीभूषण असून ’सगुणा राईस टेक्निक’ आणि ’सगुणा रूरल फाउंडेशन’च संस्थापक आहेत.)
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121