समर्थांचे आत्मकथन

    23-Jun-2021
Total Views | 120

 


Samarth Ramdas edit_1&nbs



आध्यात्मिकतेपुढे स्वामींना आत्मचरित्राचे महत्त्व क्षुल्लक वाटले असेल. पण, तरीही त्यांचे आत्मानुभव , क्रांतिदर्शित्व , विचार ते आपल्या वाङ्मयातून प्रगट करतात. त्यातून आपल्याला त्यांच्या आत्मचरित्राचा बोध घेता येतो. या पार्श्वभूमीवर समर्थांच्या वाङ्मयातून त्यांच्या आत्मचरित्राचा काही बोध होतो का , हे पाहायचे आहे .



महाराष्ट्राला संतांची थोर परंपरा लाभली आहे. परंतु, संतांसारख्या महान व्यक्तित्त्वांची सांग चरित्रे लिहून ठेवण्याची प्रथा आपल्याकडे नव्हती. संतांच्या चरित्रासंबंधी आख्यायिकाच जास्त ऐकायला मिळतात. आज आपण स्वतःला कितीही ‘विज्ञाननिष्ठ’ म्हणवून घेत असलो, तरी आजही लोकांना संतांचे चमत्कार व त्यांच्या संबंधीच्या गूढ रम्यकथांचे आकर्षण आहे. संतचरित्र म्हणजे त्यांच्या आयुष्यात घडून आलेले चमत्कार असा लोकांचा समज आहे. ‘चमत्काराशिवाय नमस्कार नाही’ असे मानण्याचा एक परिपाठ आपल्याकडे आहे. त्यातून संतचरित्राकडे बघितले जाते. सर्वसाधारणपणे त्या त्या संताचे भक्त आपल्या संताला त्याच्या चरित्रातील अद्भुत कथेमधून ओळखत असतात. भक्तमंडळीत जेव्हा संतांच्या चरित्रावर चर्चा होते, तेव्हा प्रामुख्याने चमत्कारांवर चर्चा असते. एवढेच नव्हे, तर एखाद्या संताविषयी आपला अनुभव कथन करताना लोक त्या संताच्या चमत्काराचाच प्रामुख्याने उल्लेख करतात. त्यात काही गैर आहे, असे नाही. कारण, संतांविषयी अतिद्रिंय अनुभव येणे व तो त्यांच्या भक्ताने सांगणे शक्य असते. पण, संत म्हटले की, चमत्कार असे ठामपणे म्हणता येणार नाही किंवा चमत्कार ही संतांना ओळखण्याची खूण नव्हे. तथापि, संतांनी निर्माण केलेले आदर्श, त्यांची जीवनदृष्टी, त्यांचे मौलिक विचार, उद्धार करून घेऊन त्यांनी मोक्षप्राप्ती कशी मिळवली, हे विचार पुढील पिढ्यांना प्रेरणादायी होण्यासाठी, संतांची चरित्रे सांगितली गेली पाहिजेत, लिहिली गेली पाहिजेत, असा विचार फार थोडे करतात. संतांच्या समकालीन पंडितांनीही या दृष्टीने संतांची चरित्रे लिहून ठेवली नाहीत, याची खंत वाटते. संतांचे वागणे, बोलणे, लोकांशी संबंध ठेवणे कशा प्रकारचे होते, हे कळले पाहिजे.



संतांची विचार करण्याची पद्धत
, त्यांची लोकोद्धाराची तळमळ, त्यांच्या अडीअडचणी यावरही प्रकाश टाकला गेला पाहिजे. संतत्व प्राप्त करून घेताना परिस्थितीशी त्यांना कसे जुळवून घ्यावे लागले अथवा झुंजावे लागले, हेही समजून घेतले पाहिजे. शुद्धाचरण, चारित्र्य, नीतिमत्ता इत्यादी चांगल्या गुणांचा त्यांनी कसा अभ्यास केला, हे समजले तर ते समाजाला मार्गदर्शक होईल. या सार्‍यांचा ऊहापोह संतचरित्रात अपेक्षित आहे. संतांच्या वाङ्मयीन कृतींवरून यापैकी काही गोष्टींचा अंदाज बांधता येतो व त्यातूनच संतांचे खरे चरित्र आपल्या प्रत्ययाला येते. अशावेळी एक सहज विचार मनात येतो की, संतांनीच जर आत्मचरित्रे लिहिली असती, तर काय बहार झाली असती! संतांच्या वाङ्मयातून त्यांच्या चरित्राचा शोध घेताना टीकाकारांनी जी वैचारिक बाचाबाची होते, ती तरी निदान झाली नसती. पण, संतांनी लिहिलेले आत्मचरित्र संभवनीय नाही. याचे कारण संत हे मूलतः निरिच्छ असतात, त्यांना कसल्याही प्रसिद्धीचा हव्यास नसतो. त्याचप्रमाणे संतांनी जे आध्यात्मिक ध्येय गाठले किंवा भक्तीची परिसीमा साधून भगवंताला वश करून घेतले, यापैकी कुठल्याही गोष्टीचा सूक्ष्म अहंकारही त्यांच्या ठिकाणी नसतो. या साध्या कारणांनी संतांनी आपली जीवनचरित्रे अथवा आत्मचरित्रे लिहिली नसावीत. आध्यात्मिकतेपुढे त्यांना आत्मचरित्राचे महत्त्व क्षुल्लक वाटले असेल. पण, तरीही त्यांचे आत्मानुभव, क्रांतिदर्शित्व, विचार ते आपल्या वाङ्मयातून प्रगट करतात. त्यातून आपल्याला त्यांच्या आत्मचरित्राचा बोध घेता येतो. या पार्श्वभूमीवर समर्थांच्या वाङ्मयातून त्यांच्या आत्मचरित्राचा काही बोध होतो का, हे पाहायचे आहे.



वयाच्या बाराव्या वर्षी जांब गावाहून नाशिकला आल्यावर कठोर तपःसाधना, पुरश्चरणे, रामनामाचा जप इत्यादी साधनांद्वारा रामाचा साक्षात्कार हे उच्चतम आध्यात्मिक ध्येय स्वामींनी गाठले. साधकदशेतून त्यांना सिद्धावस्था प्राप्त झाली. पण, त्याचा यत्किंचितही गर्व किंवा ताठा त्यांच्या ठिकाणी नव्हता. ते लोकांत मिळून-मिसळून राहिले. लोकांना आत्मोद्धाराचा मार्ग सांगत राहिले. स्वामी एका विशिष्ट अर्थाने वैरागी, गोसावी, फकीर होते. स्वतःसाठी त्यांना काहीही मिळवायचे नव्हते. स्वामी विरक्त होते, तरी त्यांची राहणी प्रतिष्ठिताची होती. सृष्टीतील सर्व चांगल्या गोष्टींचा आस्वाद घेण्याची रसिकता स्वामींजवळ होती. परमेश्वराच्या चिदानंद स्वरुपाचा साक्षात्कार झाल्याने ते सदैव आनंदी असत. समाधान त्यांच्या चेहर्‍यावर विलसत असे. स्वामी कौपिनावरून पीतांबर कसीत, करांगुलीत मुद्रिका घालीत, पायात नेहमी पादुका असत आणि त्यांच्या हातात कुबडी असे. समर्थशिष्य गिरिधरस्वामी यांनी ‘समर्थप्रताप’ या ग्रंथात समर्थांच्या वैभवशाली राहण्याचे वर्णन केले आहे. हा वैरागी, फकीर त्यांच्या शिष्यमंडळीत प्रतिष्ठितपणे राहत असे. अव्यवस्थितपणा, बेशिस्त, वेंधळेपणा यांना समर्थांजवळ स्थान नसे. पुढे आलेल्या सर्व सुखांचा आस्वाद घेऊनही सुखवस्तूंपासून समर्थ वेगळे होते. क्षणार्धात सर्व सुखवस्तू सोडून स्वामी डोंगर-दर्‍यातील घळीत एकटे आनंदात राहात असत. ते मोहात कधी गुंतून पडले नाहीत. रसिकता हा त्यांचा स्थायीभाव असला तरी त्यांची वृत्ती अनासक्त होती. आसक्ती-विरक्तीच्या पलीकडे होती. स्वामींचे मत असे होते की, सृष्टीतील चांगल्या गोष्टींचा आस्वाद घ्यायचा तर त्यासाठी आपला देह चांगला असला पाहिजे. जीवनास्वादच कशाला, परमार्थातील उच्च ध्येय गाठण्यासाठी चांगल्या नरदेहाची आवश्यकता आहे. स्वामींना नरदेहाचे अपार कौतुक होते. त्याचे त्यांनी दासबोधात वर्णनही केले आहे.



धन्य धन्य हा नरदेहो। येथील अपूर्वता पाहो।
जो जो कीजे परमार्थ लाहो। तो तो पावे सिद्धीते॥


परमार्थ साधना सिद्धीस नेण्यासाठी चांगल्या धडधाकट नरदेहाची आवश्यकता असते. अशा या नरदेहाचे महात्म्य किती म्हणून सांगावे!


ऐसे सिद्ध साधू संत। स्वहिता प्रवर्तले अनंत।
ऐसा हा नरदेहो विख्यात। काय म्हणोनि वर्णावा॥


देहाची निंदा करण्यात धन्यता मानणारे काही आध्यात्मिक विचारवंत, साधुसंत त्या काळात होते. पण, समर्थांनी कधीही देहाची निंदा केली नाही अथवा उपेक्षाही केली नाही. नरदेहाला कमी लेखलेले त्यांना आवडत नसे. याचे कारण सांगताना स्वामी म्हणत की, नरदेह हे परमार्थ साधनेचे मुख्य अंग आहे. त्याची हेळसांड न करता अथवा त्याच्या आहारी न जाता परमार्थ साधन प्राप्त करून घेण्यासाठी या नरदेहाचा उपयोग करून घेतला पाहिजे, असा विवेक समर्थांनी सांगितला आहे.
समर्थवाङ्मयातून प्रकट झालेल्या त्यांच्या आत्मचरित्राचा काही भाग पुढील लेखांतून पाहू. (क्रमशः)

 

- सुरेश जाखडी



अग्रलेख
जरुर वाचा
क्रीडा विद्यापीठ: क्रीडा क्षेत्रातील एक महत्वपूर्ण पायरी

क्रीडा विद्यापीठ: क्रीडा क्षेत्रातील एक महत्वपूर्ण पायरी

भारतात केंद्रीय पातळीवर नवीन विद्यापीठ स्थापन करण्याची प्रक्रिया मुख्यत्वे शिक्षण मंत्रालय आणि त्याखालील उच्च शिक्षण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली केली जाते. यासंदर्भात विद्यापीठाच्या मान्यता आणि गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी ‘विद्यापीठ अनुदान मंडळ’ (णॠउ)देखील महत्त्वाची भूमिका बजावते. तसेच, जर एखादे विद्यापीठ राज्यस्तरीय किंवा खासगी स्वरूपाचे असले, तर संबंधित राज्याचा उच्च शिक्षण विभाग किंवा राज्य सरकारचा इतर संबंधित विभाग अथवा संस्था त्यांच्यासोबत समन्वयाच्या भूमिकेत आवश्यक मंजुरी व नियमनासाठी कार्य ..

ब्रिटिश पारतंत्र्याच्या काळातील भारतीय शिक्षणव्यवस्था

ब्रिटिश पारतंत्र्याच्या काळातील भारतीय शिक्षणव्यवस्था

प्राचीन भारतीय शिक्षणव्यवस्था कशा प्रकारची होती आणि सांस्कृतिक पुनरुज्जीवनासाठी त्या व्यवस्थेच्या विविध आयामांचे आकलन का महत्त्वाचे आहे, हे आपण पाहिले. अब्राहमिक विचाराधारांशी संघर्ष झाल्यावर या व्यवस्थेला उतरती कळा कशी लागली, याही विषयाचा थोडयात आढावा आपण घेतला. वसाहतवादाचा शिक्षणावरील परिणाम हा एक समग्र ८०० ते एक हजार वर्षांच्या कालखंडाचा इतिहास आहे. परंतु, ब्रिटिश वसाहतवाद हा एक प्रकारचा सैद्धांतिक वर्चस्ववादही असल्याने या कालखंडातील शैक्षणिक अधोगतीला अनेक पैलू जोडले जातात. ब्रिटिशांचे पारतंत्र्य व ..

मेट्रो व मोनोच्या ३१ स्थानकांलगत ई स्वॅप बॅटरी स्टेशन्स

मेट्रो व मोनोच्या ३१ स्थानकांलगत ई स्वॅप बॅटरी स्टेशन्स

जागतिक पर्यावरण दिनासाठी सगळे जग सज्ज होत असताना मुंबईभर विस्तारलेल्या मेट्रो व मोनोरेलच्या स्थानकांवर ई-स्वॅप बॅटरी स्वॅपिंग स्टेशन्स सुरू करण्यासाठी महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कॉर्पोरेशन लि.ने (एमएमएमओसीएल) जपानच्या होंडा मोटर कंपनी लिमिटेडची उप कंपनी असलेल्या होंडा पॉवर पॅक एनर्जी इंडिया प्रा. लि.शी भागीदारी केली आहे. या हरित उपक्रमांतर्गत २५ मेट्रो स्थानके व ६ मोनो रेल स्थानकांच्या ठिकाणी होंडाचे हे ॲडव्हान्स्ड बॅटरी स्वॅपिंग तंत्रज्ञान बसविण्यात येईल. यातून एमएमएमओसीएलला तिकीटाव्यतिरिक्त सुमारे ₹३० ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121